Monday, January 25, 2016

इसिसची वाढती विषवल्ली उखडून फेकण्यासाठी तपासयंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा 


मुंबई,ता.23 ः प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर इसिस या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍यासह चौदा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) सोबतीने अटक केल्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यात इसिसची पाळेमुळे खणायला सुरवात केली आहे.आज सकाळी औरंगाबादमधून इसिसशी संबंधित आणखी एकाला एटीएसने अटक केली.गेल्या चोवीस तासात एटीएसने केलेल्या धडक कारवाईतील ही चौथी तर,देशभरातली पंधरावी अटक आहे.याशिवाय संशयितांच्या चौकशीला सुद्धा सुरवात झाली आहे. 

इंडियन मुजाहिदीनच्या पाडावानंतर इसिसची वाढती विषवल्ली उखडून फेकण्यासाठी तपासयंत्रणांनी देशभरात धाडसी मोहिम हाती घेतली आहे.मुंब्रा येथून अटक केलेला या मोड्युलचा म्होरक्‍या तसेच स्वयंघोषित "आमिर' मुदब्बीर मुश्‍ताक शेख व त्याच्या साथीदारांचा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात सात ठिकाणी घातपात घडविण्याचा कट उघडकीला आला आहे.पॅरीस स्टाईल दहशतवादी हल्ला घडवित असताना धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याचा कट होता. 

इसिसशी संबंधित असलेल्यांविरूद्ध भारतीय सुरक्षायंत्रणांनी आपल्या कारवाईचा वेग वाढविला आहे. सिमी आणि इंडियन मुजाहिदीनसाठी काम करणाऱ्या स्लिपर सेल सुरक्षायंत्रणांच्या रडारवर आहेत.या देशव्यापी कारवाईत महत्वाची भूमिका बजालेल्या एटीएसने आज औरंगाबादच्या वैजापूर येथे कारवाई करून मोअझ्झम खान पठाण याला अटक केली.हा या मोड्युलचा तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर समजला जातो.काल सायंकाळी उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे रिझवान अहमद अली नवाजुद्दीन तर, रात्री उशिरा माझगाव येथे हुसैन खान ऊर्फ जमिल यांना अटक केली होती.माझगाव सर्कल येथील हार्बर बिल्डींगमध्ये राहणाऱ्या हुसैन खानच्या अटकेने या परीसरातील रहिवाशांना सुद्धा धक्का बसला आहे.रिझवान वगळता अन्य तिन्ही आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे.गेल्या चोवीस तासांत झालेल्या या प्रमुख कारवायांनंतर एटीएसने इसिसशी संबंधित आणखी काही संशयितांच्या चौकशीला सुरवात केली आहे.येत्या काही दिवसांत आणखी काहींच्या अटकेची शक्‍यता तपासयंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. 

- मुदब्बीर शेख सिरीयात शफी अरमारच्या होता संपर्कात. 
इसिससाठी भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी स्थापन झालेल्या "जनुद उल खलिफा ए हिंद' या मोड्युलचा "आमिर' असलेला मुदब्बीर सिरीयात शफी अरमार या इसिसच्या म्होरक्‍याच्या संपर्कात होता. मुळचा कर्नाटक मधील भटकळ येथील राहणारा शफी अरमार पूर्वी इंडियन मुजाहिदीनसाठी काम करत होता.त्याचा भाऊ सुलताना अरमार याला इसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी याने भारतातील कारवायांचा प्रमुख बनवले होते.इसिसचाच भाग असलेल्या अन्सार अल त्वाहिद या संघटनेचा तो प्रमुख होता.मात्र, मार्च-2015 मध्ये सिरीयात झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर शफी अरमार इसिससाठी काम करू लागल्याचे वृत्त सकाळ ने सर्वप्रथम दिले होते. हाच शफी सोशल नेटवर्कींग साईट्‌सवर युसुफ नावाने सक्रीय आहे.मुदब्बीरसोबत फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप, स्काईप आणि अन्य नेटवर्कींग साईटवरून संपर्कात होता. मुदब्बीर शिवाय शफी देशाच्या प्रमुख शहरांत सोशल नेटवर्कींग साईटवर सक्रीय असलेले तरूण तसेच जुन्या आयएम व सिमीच्या मोड्युलच्या संपर्कात होता, हे सुद्धा स्पष्ट झाल्याचे तपासयंत्रणांतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

- हवालाने आलेल्या पैशांचा शोध सुरू 
दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडणाऱ्या मुदब्बीरच्या खात्यात गेल्या काही महिन्यात सहा लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. ही सगळी रक्कम परदेशातून हवाला मार्गे त्याच्या खात्यात टाकली होती. एटीएसने आता हे पैसे पाठविणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.मुदब्बीरने इसिसच्या म्होरक्‍यांच्या मदतीने संघटनेत सामिल करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.नवे सदस्य मिळवित असतानाच त्यांना घातपात घडविण्यासाठी पैसे पुरविण्याचे तसेच प्रशिक्षणाला पाठविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 

- मालवणीच्या युवकांना रिझवानची फुस 
एटीएसच्या पथकाने उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून अटक केलेल्या रिझवान नवाजुद्दीनला मुंबईत आणण्यात आले आहे.मालवणी येथून बेपत्ता झालेल्या युवकांना देशाबाहेर पळून जाण्यासाठी रिझवाननेच मदत केल्याचा संशय एटीएसला आहे.त्या अनुषंगाने एटीएसने आपल्या तपासाला सुरवात केली आहे.या प्रकरणाचा सखोल तपास करणे बाकी असल्याने एटीएसने रिझवानचा ताबा आपल्याकडेच ठेवल्याचे या तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

Thursday, January 15, 2015

इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी अल्लाह मदत करो..


वांद्रे - कुर्ला संकूल येथील अमेरीकेसह वेगवेगळ्या देशांच्या ऍम्बेसीतील उच्चपदस्थांच्या मुलांच्या शाळेवर हल्ला घडविण्याचा कट आखण्यासंबंधीचा कट आखल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अनीस अन्सारीने उसारीम लोगन या नावाने ओमर इल्हाज या व्यक्तीसोबत केलेल्या चॅटींगचा हा सारांश. 

ओमर इल्हाज ः कधी काय आणि कसं करायचं याची तु मला हिंट दे. 

उसारीम लोगन ः येत्या दोन महिन्यांत जगाला त्याचा अनुभव येईल. हे जर यशस्वी झालं, तर मला काय म्हणायचंय ते तुला फार शोधावं लागणार नाही. 

ओमर ः अल्लाह हू अकबर..मी तुला काय मदत करू शकतो अखी (मित्रा) ? मला एक नमुना तरी दाखव. 

ओमर ः मित्रा, तु आहेस ना ? सर्व ठिक आहे ना ? 

उसारिम ः होय. मी यापूर्वीच बरंचसं बोललोय. मी एवढं बोलणं बरं नाही. ठरवलेल्या ऑपरेशनसाठी हे हानिकारक आहे. मला वाटतंय तुला ते कळत असेल. 
ओमर ः मी समजतोय मित्रा. तु मला तुझ्या कामाचा एखादा तरी नमुना दाखवू शकशील अशी आशा आहे. माझ्या इमेलवर लक्ष ठेव फक्त. हवं तर मला टेस्ट मेल पाठव.म्हणजे दुसऱ्या लाईनवरून सुद्धा मी तुझ्या संपर्कात असेन.पण, मला तुझ्यासोबत राहू दे. 

उसारीम ः दुर्दैवाने ही अमेरीकन जमिन नाही. पण, त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते असणारा हा देश आहे.त्यामुळेच इथे फार मोठ्या प्रमाणावर अमेरीकन ऍम्बेसी आणि शाळा आहेत. 

ओमर ः अमेरीकन असलं काय अन नसलं काय, काफीर सर्वत्र आहेत. ते सर्व सांडपाण्यातील उंदरं आहेत.इच्छा असेल तेथे मार्ग सापडतो.आपले प्रियजन सुद्धा मदत करतील.त्यामुळे मला बाहेर ठेवू नकोस मित्रा.मी तुझी मदत करीन 

उसारीम ः तु कुठला आहेस ? 

ओमर ः लबनॉन. पण, सध्या दार अल हर्ब येथे राहतो. 

उसारीम लोगन ः सौदी ? 

ओमर ः जर मी तुला सांगितलं तर तु मला अडचणीत तर आणणार नाहीस ना ? मी इथं माझ्या मर्जीने आलेलो नाही. 

उसारीम ः प्लीज.. तुझ्यासारखे खूप आहेत. तुम्हा सगळ्यांना इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी अल्लाह मदत करो.आता बोलत जा. 

ओमर ः मी क्रुर अशा युनायटेट स्नेक्‍स ( स्टेट्‌स) ऑफ अमेरीकेत आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या मर्जीनुसार नाही. आपण सर्व रयत-अल- उकाब या बॅनर खाली एकत्र राहू शकू. 

उसारीम ः सुभानअल्लाह.. तिथं तुला तुझं भवितव्य माहितीये ? 

ओमर ः तु माझी थट्टा करतोयस ? ज्या ठिकाणी राहणं मला पसंत नाही तिथं राहणं माझ्यासाठी कसं सुदैवी असेल ? 
मित्रा, तु माझ्यासोबत असावास असं मला वाटतं. 

उसारीम ः येमेन, सोमालिया ते अफगाणिस्तानमधील सर्व मुजाहिदीनांना आज अमेरीकेत असावं असं वाटतंय. तेथे ते स्वतःसोबत हौतात्म्याचे पट्टे घेऊन फिरतायत. आजच्या तारखेला या प्रत्येकाला अमेरीकेत असावं असंच वाटतंय. शत्रुला त्याच्या स्वतःच्या घरात शिरून मारावं, असं प्रत्येकाला वाटतंय. तुला लोन "वुल्फ ऍटॅक्‍स" बद्दल माहितीये ? असा हल्ला अमेरीकेत करण्याचं प्रत्येकच मुजाहिदचं स्वप्न आहे. आपण खूप लांब आहोत.फार कही करू शकत नाही. नईम इब्ने मसूद सारखं. आठवलं ? प्रेशितानं म्हटलंय, आमच्यासह तुम्ही "वन मॅन आर्मी' आहात. आता तुमच्याकडच्या लोकांपर्यंत जा आणि त्यांना आतून कमकुवत करा. या युद्‌धात हाच निर्णायक मुद्दा ठरला. 

ओमर ः त्यामुळेच तु मला तुझ्यासोबत ठेवावंस असं वाटतंय मित्रा. मला काही तरी करायचंय.तुलाही जर असंच वाटत असेल तर मी योग्य ठिकाणी आहे. 
उसारीम ः कोणाच्याही मदतीशिवाय तु स्वतःच खूप काही करू शकतोस. तु काय नियतकालिकं वाचून प्रभावित झालासं ? 

ओमर ः नजिकच्या काळात नाही. पण, मी याबाबत काही लिंक्‍स शोधल्या. मला त्या सापडल्या नाहीत. 

उसारीम ः शोध सुरू ठेव मित्रा. काही मार्ग असेही आहेत. ज्याने तु ओबामाच्या पायाखालची जमिन सरकवू शकशील. तेही केवळ शंभर डॉलरमध्ये. त्यासाठी फक्त धैर्य असायला हवं. तुला वाहनातील बॉम्ब, आयईडी किंवा प्रेशर कुकर किंवा थर्माईड बॉम्ब वगैरे माहित आहे ? 

ओमर ः होय नक्कीच. गरम रक्त असलेल्या कोणत्या मुजाहिदला या गोष्टी कशा माहित नाहीत ? 

उसारीम - मग, कशाची वाट पाहतोयस ? तुझ्या अवतीभोवती पुष्कळ टार्गेट्‌स आहेत. 

ओमर ः हो. तुला मला मदत करायची इच्छा आहे ? 

उसारीम ः मी कशी करू शकेन? मी अमेरीकेपासून खूप लांब आहे. 
ओमर ः तु कुठे आहेस ? 
उसारीम ः हिंद..भारत. 
ओमर ः ओहो..ओके.. माशाअल्लाह माशाअल्लाह.. काश्‍मिरवरून भारतीय भावंडांची स्वतःचीच लढाई सुरू आहे. 

उसारीम ः या युद्धात आता काश्‍मिरपासून श्रीलंकेपर्यंत अशा संपूर्ण भारतीय उपखंडावर कब्जा करण्याची आपली तयारी सुरू आहे. 

ओमर ः अल्लाह अकबर. आणि हे लवकरच शक्‍य होईल. 
उसारीम ः इन्शाअल्लाह 
ओमर ः पण, मला तुझा प्लॅन आवडला मित्रा. तु जन्मजात लीडर आहेस आणि प्रेरणा देणारा आहेस.मी तुझा सल्ला घेत राहिन.मी तशी तयारी करतो.पण, मला थोडी मदत लागेल. 

उसारीम ः अल्ला तुझ्या सोबत आहे. तु हवा तेव्हा माझा सल्ला घेऊ शकतोस. 

ओमर ः पण, तु तुझ्या नियोजित प्लॅन्सबद्दल पुन्हा एकदा विचार करावंस असं मला वाटतं.कृपया कृपया कृपया काळजी घे. आणि तु शाळांना टार्गेट का करू इच्छीतोस ? तिथं निष्पाप लहान मुले असतात.त्यांची काहीही चूक नसते.तुझ्या या कटाबद्दल तु खरंच विचार करावास. 
उसारिम ः अमेरीकन शाळा. या शाळांत अमेरीकेशी मित्रत्व असलेल्या फ्रान्स आणि इटलीसह दहा देशांची मुले असतात. शत्रुला यापेक्षा जास्त कुठे लागेल ? आणि निष्पाप मुलं..त्यांच्यापैकी कुणालाच निष्पाप म्हणता येणार नाही. इस्लामिक शरीयाप्रमाणे जी 13 वर्षाखालील आहेत अशा मुलांव्यतिरीक्त. 
ओमर ः मित्रा, मला काय म्हणायचंय ते तु समजत नाहीयेस. तुझ्या प्लॅन्सचा तु पुन्हा एकदा विचार कर. शाळेची मुलं किंवा शाळेला टार्गेट करण्याबाबत तुझ्या आमिर किंवा शेखचा सल्ला घे. 

उसारिम ः इथं आम्हीच आमचे आमिर आहोत. गुप्तपणे किंवा खुलेआम जिहादी कारवाया करू शकेल अशी कश्‍मिर शिवाय जिहादी संघटना इथं नाही. इथल्या काफीरांनी गेल्या सत्तर वर्षांपासून आपल्या महिला व बालकांवर अत्याचार केल्याचा इतिहास आहे.अमेरीका आणि युरोपचा विचार केलास तर, 1920 पासून आजपर्यंत तब्बल दहा लाख जणांचा हिशेब आपल्याला चुकता करायचाय. 

उसारीम ः शत्रुला जिथे जास्त लागेल तिथे मारायचं असतं. ते म्हणजे त्या देशाचे सामान्य नागरीक. सैनिक तर असेही मारले जातात.ते त्याचसाठी असतात. 
ओमर ः मला माहितीये मित्रा. तुझं म्हणणं पटतंय सुद्धा.पण, तुला भारतात असे टार्गेट्‌स कुठे सापडतील ? 

उरासिम ः मुंबईत. खूप आहेत. 

ओमर ः अल्लाह अकबर, तु किती वर्षे भारतात राहतोय ? 

उरासिम ः माझा जन्मच इथला आहे. 

ओमर ः माशाअल्लाह, मित्रा, तुझा कट आणि सूचना मला खूप आनंद देतोय. 

उसारिम ः जेव्हा, तुम्ही त्याची अंमलबजावणी कराल तेव्हाच ते आनंददायी असते. कदाचित तुला हे माहित नसेल की तुझे हे लहानसे कृत्य इस्लामिक राष्ट्र निर्मितीसाठी लढणाऱ्या मुजाहिदापेक्षा किती तरी जास्त परीणामकारक आहे. अमेरीकेने मध्य पूर्वेत सुरू केलेले युद्धा त्यांच्याच घरात पोचल्याचं लक्षात आल्यास जगभरात इस्लामिक राष्ट्रासाठी लढणाऱ्या मुजाहिदीनांचा हा विजय असेल. 
ओमर ः आमिन मित्रा. तुझ्याकडून किंवा आणखी कोणाकडून थोडीशी मदत मिळाली तर बरं होईल. तु तुझ्या ऑपरेशनसाठी फंडींगचा उल्लेख केलास. 

उसारीम ः त्यासाठी वाघाच्या काळजाचे आणि पर्वतासारखे पाठीशी उभे राहणारे मुस्लीम हवेत.होय. या कामासाठी फंड कमी पडतोय. 

ओमर ः मित्रा, मी तुला पुन्हा एकदा विनंती करतो, शाळांना टार्गेट करण्याबाबत तु पुन्हा एकदा विचार करावास. सिरीया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्कस्थान आणि तुर्कस्थानमधून निघालेले रेफ्युजी कुठ राहत असतील ? काही माहिती आहे ? अशाच रिकाम्या शाळांत ते राहतात. 

उरासिम ः माझ्या हिटलिस्टवर असलेली ही कोणतीही साधीसुधी शाळा नाही.अमेरीका आणि युरोपच्या वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची मुले शिकत असलेली ही व्हीआयपी शाळा आहे.शिवाय इथला स्टाफ, शिक्षक वगैर सगळेच हायप्रोफाईल आहेत.हे काही साधंसुध काम नाही.या शाळेला भारतीय सुरक्षायंत्रणांची अहोरात्र सुरक्षा असते. 

ओमर ः शाळांना टार्गेट करण्याचे हे चांगलं कारण आहे. 

उरासिम ः जसं मी आधीच म्हटलं, हे काही खायचं काम नाही.इथं सुरक्षायंत्रणांचा चोवीस तास सुरक्षेचा गराडा असतो. 

ओमर ः मित्रा, मी तुझ्या सोबत आहे. "डवला अल इस्लामिया' प्रमाणे तुझं धैय्य साध्य न झाल्यास मला खेद वाटेल. 

ओमर ः तुला जावंच लागेल मित्रा. अल्लाह आपल्यासोबत राहो आणि आपल्याला योग्य गोष्टी करण्यासाठी तो मार्गदाता होवो. 

ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल

 "अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल.ती सुद्धा अवघ्या शंभर डॉलर खर्चात.पण, त्यासाठी आपल्याकडे धैर्य असायला हवं,' हे फेसबुक चॅटींग आहे वांद्रे- कुर्ला संकुल येथील अमेरीकन ऍम्बेसीतील उच्चपदस्थांची मुले शिकत असलेल्या शाळेत स्फोट घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अनीस अन्सारीचे. सध्या तुरूंगात असलेल्या अन्सारीने "उरासिम लोगन' या नावाने एका समविचारी तरूणासोबत केलेल्या या चॅटींगचा संपूर्ण सारांश "सकाळ' चया हाती लागला आहे. 

अंधेरीच्या एका बहूराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या अनीस (24) ला एटीएसने ऑक्‍टोबर महिन्यात अटक केली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया (आयसीस) च्या कारवायांना समर्थन करणाऱ्या अनीसने बीकेसीतील शाळेवर पेशावर सारख्या हल्ल्याचा कट आखल्याचे फेसबुकवरील त्याच्या चॅटींगमधून स्पष्ट होते.स्वतःला अमेरीकेत राहत असल्याचे सांगणाऱ्या ओमर इल्हाज नावाच्या व्यक्तीसोबत त्याचे हे चॅटींग चालत होते.अवघ्या दोन महिन्यांत पूर्णत्वाला येणाऱ्या या कटामुळे जगाला हादरा देण्याचे वक्तव्य करणारा अनीस त्याच्या साथीदाराला बॉम्ब तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा सांगतो. व्हेईकल बॉम्ब, आयईडी, प्रेशर कुकर आणि थर्माईड बॉम्बबद्दल सुद्धा त्याची ओमर सोबत चर्चा झाली होती. अनिसने ओमर सोबत केलेले हे चॅटींग एटीएसने पकडले होते. वेळेत केलेल्या या कारवाईमुळे एटीएसने घातपाती कारवाईचा मोठा कट उधळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अनीसने ओमरला अमेरीकेत घातपाती कारवाई करण्याचा सुद्धा सल्ला दिला होता. 
आयसीसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी, लंडनमधील मौलाना नोमन अली खान आणि दक्षिण आफ्रीकेतील मौलाना अहमद बदक यांच्या जहाल वक्तव्याचे व्हीडीओ सुद्धा अनीसच्या फेसबुक अकाऊंटवर होते. 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसने काल (ता.14) अनीसविरूद्ध शिवडी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 778 पानांच्या च्या आरोपपत्रात फॉरेन्सिक सायन्स तज्ञांसह पन्नास साक्षीदार आहेत.याशिवाय एटीएसने सहा कॉम्प्युटर हार्ड डीस्क, व एका मोबाईल फोनचा चाळीस पानी फॉरेन्सिक सायन्सचा अहवाल जोडला आहे.या प्रकरणात एटीएस ओमर या आरोपीचा शोध घेत आहेत.

Sunday, January 11, 2015

ये करप्शन खतम हो सकता हेै..!





मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भ्रष्टाचारी आणि लाचखोरांची खैर नाही, असेच म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे भ्रष्ट लोकप्रतिनिधी, सरकारी बाबूंवर कारवायांची परवानगी मागणारी कितीतरी प्रकरणे शासन स्तरावर वेगवेगळ्या कारणांनी रखडली होती. या सगळ्या प्रकरणांचा कोणतीही दयामाया न दाखवता तितक्‍याच तत्परतेने निपटारा करायला सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) लाचखोर आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविरूद्ध चालविलेल्या धडाकेबाज मोहिमेला नवी धार आली आहे.पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्ता गोठवण्याच्या फाईलवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली परवानगी हे राज्य भ्रष्टाचारमुक्तीकडे नेण्याच्या दिशेने उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे. 

सजामाच्या सर्वच क्षेत्रांत बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनतेची कामे सहज होतील अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे भाबडेपणाचे ठरावे, अशी स्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. साध्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत कोणत्याही सरकारी कार्यालयात वैयक्तिक कामासाठी जाणाऱ्याने घरातून निघण्यापूर्वी कामाच्या किंमतीवरून ते तडीस नेणाऱ्याला किती पैसे मोजावे लागतील हे ठरवूनच निघावे लागते.कोणतीही लालसा न बाळगता सहज काम करून देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील असे अधिकारी व कर्मचारी सुद्धा आहेत.पण, आभाळ खायला दिले तरीही ते पुरणार नाही अशी हाव असलेल्यांच्या गर्दीत हा आकडा खूपच थोडा आहे.कार्यालयात सगळेच भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवत असताना त्यात भाग न घेणारा निव्वळ बावळट किंवा भित्रा म्हणून गणला जातो. आजच्या पैशांच्या या दुनियेत नोकरी करून मिळणाऱ्या पगाराने एखाद्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागतील. पण, त्या पैशातून इतरांप्रमाणे छानछोकी करता येणार नाही. झटपट श्रीमंत होत बंगला, महागड्या कार, मोठ्या बॅंक बॅलन्सचे असलेले स्वप्न पूर्ण करता येणार नाही, असा विचार करणारे भ्रष्टाचाराच्या या मार्गाला लागल्याचे एसीबीने गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवायांतून सहज स्पष्ट होते.आदीवासी, वंचित, अपंगांसह अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना मंजूर करण्यासाठीही त्यांच्याकडून पैसे उकळणारे आहेत. ज्यांच्याकडे अंगावरच्या फाटक्‍या कपड्यांशिवाय काही नाही, अशांकडून अनुदान मंजूर झाल्यावर त्या कामाचा मोबदला म्हणून लाचेचे पैसे उकळल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बलात्कारामुळे कुटुंब उध्वस्त झालेल्या मुली व तरूणींना निर्भया योजनेतून साडेतीन लाख रूपये देण्याची योजना सरकारने सुरू केली.या पिडीत मुलींकडून ही मदत मिळवून देण्यासाठी पैसे मागणारे सुद्धा येथील कार्यालयांत जागोजागी फिरताना दिसतात. त्यामुळेच राज्याच्या सरकारी कचेऱ्यांत वाढलेला हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारकडून केले जाणारे प्रयत्न आश्‍वासक वाटतात. गेल्या काही महिन्यांत सरकारकडे मालमत्ता गोठविण्याची परवानगी मागणारी 45 प्रकरणे प्रलंबित पाठविली आहेत.या सगळ्या प्रकरणांत सरकारी बाबूंनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेली 191 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची मालमत्ता गुंतली आहे.यातील सर्वात मोठी मालमत्ता उपजिल्हाधिकारी नितिश ठाकूर याची आहे.एसीबीच्या लेखी ठाकूरने त्याच्या पदाचा गैरवापर करून मिळवलेली मालमत्ता तब्बल 143 कोटी रूपये एवढी आहे.प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी मोठा आहे. म्हाडात वरीष्ठ पदावर काम केलेल्या नितीश ठाकूरने गोळा केलेली मालमत्ता शेकडो कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते.रायगडच्या पेण व अलिबाग पट्ट्यात शापूरजी पालोनजी या कंपनीला शेकडो एकर जमिन मिळवून देण्यासाठी नितेश ठाकूर व त्याच्या भावाने तब्बल 258 कोटी रूपये घेतले होते.तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी याविषयी विधीमंडळाच्या सभागृहात आर्थिक व्यवहाराचा हा मुद्दा उपस्थित करीत याबाबत चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. मालमत्ता गोठविण्यासाठी सरकारकडे गलेल्या यादीतील सर्वात कमी मालमत्ता 35 हजारांची आहे. गडचिरोलीच्या चिरमुर येथे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचा सचिव तसेच मुख्याध्यापक असेलला राजकुमार शेंडे याने गोळा केलेली ही मालमत्ता आहे. सरकारकडे प्रलंबित असलेल्या 45 पैकी आठ प्रकरणांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.मुख्यमंत्र्यांच्या कामाचा उरक लक्षात घेता येत्या काही दिवसांतच उर्वरीत प्रकरणांची सुद्धा मंजूरी मिळेल अशी चिन्हे आहेत. 


मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे गृह विभाग ठेवून घेतल्यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. अनेकदा एखाद्या विषयावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात एकमत होत नसल्याने प्रकरणे वर्षानुवर्षे पडून राहत. भ्रष्ट अधिकारी व लोकसेवकांवर कारवायांची परवानगी मागणाऱ्या फायलींचेही अनेकदा असेच व्हायचे.कारवाईला परवानगीच मिळत नसल्यामुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी सुद्धा चांगलेच सोकावले होते. सरकारला एसीबीकडून वारंवार पत्र धाडली जायची.पण, या पत्रांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जायचे नाही.फडणवीस यांनी गृह विभाग स्वतःकडे ठेवल्यामुळे कुणाच्या नाराजीचा प्रश्‍नच येत्या काळात येणार नाही. भ्रष्ट व्यक्तीवर कारवाईची परवानगी मागणारा प्रस्ताव गृहविभागाने पाठविल्यानंतर या प्रस्तावाच्या फायलींचा होणारा गृहमंत्री ते मुख्यमंत्री या प्रवास आता थांबला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे म्हटले होते.भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोकप्रतिनिधी अथवा सरकारी बाबू अशा कोणालाही आपले सरकार सोडणार नाही, असे ते म्हटले होते. त्याचीच प्रचिती सध्या दिसत आहे.निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर लाचलुचपत विरोधी पथकाला माहिती अधिकार कायद्यातून वगळण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. याला कारणे काहीही असली तरी हा प्रकार पुढे येताच हा निर्णय मागे घेण्यात आला. यावरूनच फडणवीस सरकारची भ्रष्ट व्यक्तींवर कारवाई करण्याची लाचलुचपत विरोधी पथकाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात केलेल्या कारवायांचा उल्लेख येथे प्रकर्षाने करावा लागेल. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे एसीबीत जणू नवचैतन्य आले आहे. लाच मागणाऱ्यांविरूद्ध कारवायांत शेकडो पटींनी वाढ झाल्यामुळे कोणता व्यक्ती लाच देण्याच्या बहाण्याने आपल्याला अडकवणार तर नाही ना, अशी भिती सरकारी बाबूंमध्ये निर्माण होऊ लागली आहे.लाचखोरीसंबंधी कोणत्याही तक्रारीसाठी त्यांनी राज्यभरात 1064 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. एसीबीची वेबसाईट, फेसबुकवरून ऑनलाईन तक्रारी करण्याची सोय आहे.एखाद्या भ्रष्ट व्यक्तीविरूद्ध तक्रार केली तर, आपले काम होणार नाही अशी भीती अनेकांच्या मनात असते. अशा व्यक्तींसंबंधीची माहिती द्या. तातडीने कारवाई केली जाईल, अशी हमी देत दीक्षित यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेली ही भीतीच काढून टाकली आहे.त्यामुळे लाचखोर आणि भ्रष्ट व्यक्तींविरुद्धच्या तक्रारी वाढल्या.लोकांनी निर्भीड होऊन पुढे यावे. तुमचे काम रखडणार नाही याची दक्षता एसीबी घेईल असे ठोस आश्‍वासनच दीक्षित यांनी दिले आहे. लाचखोरी आणि भ्रष्ट व्यक्तींसंबंधी न्यायालयात प्रलंबित असलेल्या 3081 खटल्यांचा निपटारा होऊन दोषसिद्धीसाठी त्यांनी प्रयत्नांना सुरवात केली आहे.एसीबीच्या खटल्यांत सध्या राज्याचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 30 टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांतील कारवायांचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वी "ये करप्शन कुछ ले देके खतम नही हो सकता', असे गमतीने म्हटले जायचे.पण, राज्य सरकारची प्रबळ इच्छाशक्ती आणि एसीबीत प्रवीण दीक्षित यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या सोबत असेल तर, "कुछ ले दिये बगैरही करप्शन खतम हो सकता है', असे म्हणता येईल. 

ज्ञानेश चव्हाण 
dnyaneshchavan@rediffmail.com 

Tuesday, November 25, 2014

सीसीटीव्ही प्रकल्प- एक दीवास्वप्न

" नाही..नाही..अजून बराच वेळ लागणार आहे.आमची एल ऍण्ड टीसोबत चर्चा सुरू झाली आहे.त्यांनी या प्रकल्पासाठी 1100 कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला आहे.काही ऑप्शनल आयटम वगळले तर ते 984 कोटी पर्यंत हे काम करू शकतील. पण, अजून बराच वेळ लागेल.' वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तीसाव्या माळ्यावर बसणाऱ्या गृह विभागातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने मोबाईलवर दिलेली ही माहिती.मुंबईचा बहूप्रतिक्षित सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी गेल्या सहा वर्षांत चौथ्यांदा निविदा काढल्यानंतर अजूनही या कामाची वर्क ऑर्डर निघालेली नाही.घोडं अडलंय तांत्रिक समित्यांच्या बैठका, वरीष्ठ पातळ्यांवरील चर्चा आणि कंपन्यांसोबत बोलणी करण्यात. सहा वर्षांपूर्वी अवघ्या शंभर कोटी रूपयांपासून सुरू झालेला सीसीटीव्ही प्रकल्पाचा हा प्रस्ताव आता अकराशे कोटी रूपयांपर्यंत गेला आहे.
ंमुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली. या सहा वर्षांच्या काळात सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली का, याकडे पाहिल्यास कित्येक महत्वाच्या विषयांवर गृह विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ वेळ मारून नेण्यापलिकडे फार काही केलं नाही.त्यामुळेच मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या हालचाली टीपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही सर्व्हिलंस प्रकल्प मुंबईकरांसाठी प्रतिक्षेच्या परीसीमा ओलांडणारा ठरला आहे. शहरातील घडामोडींची तत्काळ माहिती पोलिसांना मिळावी या उद्देशाने सीसीटीव्ही प्रकल्पाची आखणी केली. पण, त्यासाठी इंडियन मर्चंट्‌स चेंबरने पुढाकार घ्यायचे ठरवले. मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही बसवण्यासाठी काही बडे उद्योजक, कंपन्या आणि बॅंकांची मदत घ्यायचे ठरले. आयएमसीतील तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शंभर कोटी रूपये अशी या प्रकल्पाची किंमत ठरली. यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष, ऑप्टीकल फायबरच्या केबल बसवणे, देखभाल दुरूस्ती आणि आवश्‍यक मनुष्यबळाचा सुद्धा अंतर्भाव होता.इंडियन बॅंक असोसिएशनचे तत्कालिन अध्यक्ष एम.व्ही.नायर यांची मदत घेण्याचे सुद्धा ठरले. आयएमसी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारला या प्रकल्पाचे पूर्ण दायित्व देणार होते.पण, खासगी संस्थांनी हा प्रकल्प उभारल्यास त्याचा गैरवापर होण्याची भीती गृह विभागाच्या त्यावेळच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.त्यामुळे नाईलाजास्तव आयएमसीला या प्रकल्पाचा नाद सोडावा लागला. यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी प्राईस वॉटर हाऊस कुपर्स (पीडब्ल्यूसी) या संस्थेला कन्सल्टंट म्हणून नेमले. पंचेचाळीस लाख रूपये देऊन नेमलेल्या या कंपनीने या सीसीटीव्ही प्रकल्पाची किंमत साडेतीनशे कोटी रूपये अपेक्षिली.माहिती तंत्रज्ञान विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. पण, तो प्रस्ताव कॅबिनेटपुढे कधीच आला नाही. आयटी विभागाच्या सचिव लक्ष्मी बिदरी प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव तयार झाला होता.तीन वर्षे उलटली. मुंबईवर झालेल्या हल्ल्याची धग आता ओसरली होती.त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्पाचा प्रस्ताव काही बिग बजट प्रस्तावांप्रमाणे बाजूला पडला.अशातच 13 जुलै 2011 रोजी तीन शक्तीशाली स्फोटांनी मुंबई पुन्हा हादरली. झवेरी बाजारातील सीसीटीव्हीमुळे दहशतवाद्यांचे धागेदोरे हाती आल्याचे पाहून पुन्हा एकदा सीसीटीव्ही प्रकल्पाने उचल खाल्ली.यावेळी मुंबई फर्स्ट या संस्थेने सरकारपुढे सीसीटीव्ही प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले.मुंबई फर्स्टच्याच सोबतीने गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ लंडनला गेले. "फ्रेन्डली आय इन द स्काय' अशी ख्याती असलेल्या लंडनमधील प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवायचे ठरले.सरकारने या संपूर्ण प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा केली तेव्हा, पाच हजार सीसीटीव्ही बसवण्याचा हा खर्च सहाशे कोटी रूपये एवढा झाला.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत्या स्पर्धेमुळे सीसीटीव्हीच्या किमती घसरत असताना मुंबईच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम वाढली होती.आकड्यांमधील ही तफावत पाहून यात नक्कीच काही तरी गोंधळ आहे हे सहज स्पष्ट झालं होतं. सीसीटीव्हीमधल्या तज्ञ व्यक्तींना गाठलं.त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरही हा आकडा फुगल्याचेच जाणवले.यामागील तथ्य जाणून घेण्यासाठी तेव्हाचे गृह विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर फुगत चाललेल्या आकड्याबद्दल विचारलं. तेव्हा, पहिल्या टप्प्यात केवळ दोन हजार सीसीटीव्ही बसवायचे ठरले होते.त्यासाठी खर्च साडेतीनशे कोटींचा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. मग, या विषयावर थेट गृहमंत्री आर.आर.पाटील यांची त्यांच्या चित्रकुट बंगल्यावर भेट घेतली.त्यांनाही या फुगलेल्या आकड्याचे रहस्य विचारण्याचा प्रयत्न केला.त्यांनी फोनाफोनी करून माहिती घेतली.हा खर्च केवळ सीसीटीव्ही बसवण्याचा किंवा नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी नाही तर, सीसीटीव्हीत रेकॉर्ड होणाऱ्या व्हीडीओ फुटेजचे ऍनालिसीस करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे.तंत्रज्ञानासोबत मनुष्यबळ त्यांचे पगार यावर हा खर्च पाच वर्षे करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.पुन्हा एकदा सरंगींना फोन करून मला आवश्‍यक ती माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सरंगींनी ही जबाबदारी पीडब्ल्यूसीचेच एक तंत्रज्ञ सुभाष पाटील यांच्याकडे दिली. त्यांच्याकडून या प्रकल्पासंबंधी बहूसंख्य माहिती मिळाली. पण, वाढत्या खर्चाच्या आकड्याचे गणित काही केल्या कळत नव्हते. सरकारने हा प्रकल्प राबवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. गृह सचिव सरंगी यांनी सुद्धा हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यासाठी एक उपसमितीही स्थापन केली.या समितीत गृह विभाग, पो लिस दल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अधिकारी होते. त्यावेळी मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त असलेल्या विनित अग्रवाल यांचे आयटीतील कसब लक्षात घेता त्यांना सुद्धा या समितीत घेण्यात आले. या प्रकल्पासाठी पहिल्यांदा निविदा निघाली तेव्हा, दहा मोठ्या कंपन्यांनी त्यात स्वारस्य दाखवले. यात इसीआयएल. बीईएल, नाईस,एचसीएल.इन्फोसिस, सिमेन्स,विप्रो, सिस्को या कंपन्या सहभागी झाल्या.या कंपनी निवडीसाठी लावलेल्या निकषांवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.काही दिवसांत या कामाचे कन्सॉर्टीअम घेण्यावरून दोन भागीदार कंपन्यांत भांडण झाल्याने ही निविदा प्रक्रीयाच रद्द करण्यात आली.
यानंतर पुन्हा काही महिने गेले. यावेळी निविदा काढल्या. बंगळूरच्या एका कंपनीची निवड सुद्धा झाली. पण, पात्र कंपनीला या कामासाठी दहा टक्के आगावू रक्कम सरकारकडे भरणेच शक्‍य झाले नाही. त्यामुळे यावेळीही निविदा प्रक्रीया रद्द झाली. दोन प्रयत्नानंतर सरकारने तिसऱ्यांदा निविदा काढल्या. पण, दहा टक्के आगावू रक्कम सरकारकडे गोळा करणे तसेच अन्य जाचक अटींमुळे एकाही मोठ्या कंपनीने या कामात रस दाखविला नाही.सलग तीन वेळा या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सरकारला ठेकेदार मिळाला नाही.त्यामुळे जेरीस आलेल्या सरकारने या कामासाठीच्या अनेक जाचक अटी रद्दच करून टाकल्या.सध्याचे गृहसचिव अमिताभ राजन यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होऊ लागले.सीसीटीव्हींची संख्या पाच हजाराहून सहा हजार करण्यात आली.प्रकल्पाची किंमत सहाशे कोटी रूपयांहून साडेसातशे कोटींच्या घरात पोचली.या प्रकल्पासाठी पात्र ठरणाऱ्या कंपनीला काम देता क्षणीच बॅंकेतून कर्ज मिळावे यासाठी दहा टक्के आगावू रक्कम देण्याचेही गृह विभागाने ठरवले.या शिवाय प्रत्यक्ष प्रकल्प अस्तित्वात आल्यावर भांडवली खर्चाच्या ऐंशी टक्के रक्कम देण्याचे ठरले.आता या प्रकल्पासाठी ट्रायमॅक्‍स आणि एल ऍण्ड टी या दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले.टेक्‍निकल आणि कमर्शियल बिडींग मध्ये एल ऍण्ड टी ला उच्चस्तरीय समितीची पसंती मिळाली.या कंपनीला मुंबईत 1500 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम देण्याचे विचाराधीन आहे. पण, सध्या तांत्रिक समित्यांच्या बैठका सुरू आहेत.कंपनीने दिलेला अकराशे कोटी रूपयांच्या प्रस्तावावर घासाघिस सुरू आहे.तडजोड करायची झाल्यास एल ऍन्ड टी 984 कोटी रूपयांत हे काम मिळवू शकेल. आठवडाभरापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही प्रकल्पाचा आढावा घेतला होता. या प्रकल्पात येणाऱ्या अडचणींसंबंधी थेट आपल्याशी चर्चा करण्याचे आदेशही दिले.त्यामुळे 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सहावा स्मृतीदिन उजाडण्यापूर्वीच हे काम एल ऍण्ड टीला देण्याचे घोषित करण्यात आले.तब्बल सहा वर्षे राजकीय इच्छाशक्तीच्या लाटांचे हेलकावे खात, फुगत चाललेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे.पण, जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नाही तोपर्यंत तरी हा प्रकल्प मुंबईकरांसाठी एक दीवास्वप्नच आहे.

Monday, July 14, 2014

आता आपण जन्नतमध्येच भेटू ...

कल्याणमधील सुन्नी तरुण दहशतवादी कारवायांसाठी गेले इराकला इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने सुरू केलेल्या युद्धात सामील होण्यासाठी ठाण्यातील चार तरुणांना चिथावणी देऊन एका व्यापाऱ्याने इराकला नेल्याचे तपासात उघड झाले आहे. तपास यंत्रणा या व्यापाऱ्याला शोधत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातून काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अनेक तरुणांना स्वतंत्र राष्ट्रस्थापनेच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करण्यासाठी इराकला नेल्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे एका तरुणाने कुटुंबीयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ठाण्यातून 24 मे रोजी अरीब एजाज मजीद, सहीम फारूख तानकी, फहद तनवीर शेख व अमन नईम तांडेल हे तरुण बेपत्ता झाले होते. त्यांच्या पालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. सहीम वगळता उर्वरित तिन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत. दुर्गाडीच्या उर्दू हायस्कूलमधील बारावी अनुत्तीर्ण झालेला सहीम कॉम्प्युटर एक्‍स्पर्ट आहे. या चौघांकडील मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार ते मुंबई आणि ठाणे परिसरात ज्यांच्या संपर्कात होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न सुरू आहे. एका व्यापाऱ्याने या चार तरुणांना मुंबईहून इराकमध्ये नेण्याचा सगळा खर्च केला, असे समजले आहे. त्यांना अफगाणिस्तानच्या सीमेवर प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात येते. घरात काहीही न सांगता निघून गेलेल्या या तरुणांपैकी अरीब याने वडील डॉक्‍टर एजाज माजिद यांना पत्र लिहून आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे त्याने म्हटले आहे. चांगल्या घरातील सुशिक्षित तरुणांना चिथावणी देऊन, त्यांना "जिहाद'च्या नावाखाली घातपाती कारवायांत सामील करून घेतले जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. हे चारही तरुण सुन्नी राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली दहशतवादी कारवायांत सामील झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुन्नी पंथातील बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध पोलिस, दहशतवादविरोधी पथक, राज्य गुप्तचर विभाग व केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरू केला आहे, असे उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हे तरुण 24 मे रोजी बेपत्ता झाल्याचे पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले असले तरी ते आधीपासूनच "इसीस'च्या संपर्कात होते, असे समजते. पालक म्हणतात, दहशतवाद्यांशी संबंध नाही या तरुणांपैकी फहाद याचे काका इफ्तेकार खान माजी नगरसेवक आहेत. आपल्या पुतण्याची कोणीतरी दिशाभूल केली असून, त्याला मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नाही. त्यांना नाहक या संघटनांशी जोडले जात आहे, असे त्यांच्या पालकांनी सांगितले. ---------




 कोण आहेत हे तरुण? - अरीब एजाज माजिद (वय 22) ः कल्याण-पश्‍चिमेला "सर्वोदय रेसिडेन्सी'तील सी विंगमध्ये राहणारा अरीब नवीन हा पनवेल येथील काळसेकर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यापूर्वी त्याने वाशीच्या फादर ऍग्नेल पॉलिटेक्‍निकमधून डिप्लोमा केला आहे. तो फुटबॉलपटू आहे. कल्याण-पश्‍चिमेला अन्सार चौकात या कुटुंबाचे आणखी एक घर आहे. आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत तो राहत होता. 24 मे रोजी घरातून नमाजाला जात असल्याचे सांगून तो निघून गेला.


 - सहीम फारूख तानकी (वय 26) ः कल्याण-पश्‍चिमेला दुर्गाडी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमधून बारावी अनुत्तीर्ण झालेल्या सहीम याला हिंदी, इंग्रजी, उर्दू व मराठी लिहिता-वाचता येते. नवी मुंबईत कोपरखैरणे येथे रिलायन्स फर्स्ट सोर्स कॉल सेंटरमध्ये तो नोकरीला होता. गफूर डॉन चौकातील एक चायनीज पदार्थांची गाडी, तसेच दुर्गाडी येथील चायनीज गाडीवर तो नेहमी मित्रांसोबत दिसत असे. बंदर रोड येथील दूध नाक्‍यावरील घरात दोन भावांसोबत तो राहत होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. 24 मे रोजी कुणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेला.



 - फहद तनवीर शेख (वय 24) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडी येथे राहणाऱ्या फहदचे वडील डॉ. तन्वीर मकबूल शेख भिवंडी परिसरात नावाजलेले डॉक्‍टर आहेत. मूळचा आझमगढ येथील फहद पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयातून बी.ई. मेकॅनिकलचा डिप्लोमा करीत होता. त्यापूर्वी तो आसनगावच्या शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात शिकत होता. सहीमप्रमाणेच गफूर डॉन चौकात तो दिसत असे. आई-वडील, चार बहिणी आणि भाऊ अशा कुटुंबात राहणारा फहद घरातून न सांगता 24 मे रोजी निघून गेला.



 - अमन नईम तांडेल (वय 20) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडीत आई-वडिलांसोबत राहणारा अमन कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात बी.ई.च्या दुसऱ्या वर्षाला होता. उत्तम क्रिकेटपटू असलेल्या अमनचे वडील परळ येथे "युरेका फोर्ब्स'मध्ये नोकरीला आहेत. तोसुद्धा गफूर डॉन चौक, कोटबार मशीद येथे मित्रांसोबत दिसत असे. अमन आणि अरीब यांची शाळेत शिकत असल्यापासून मैत्री होती. ------------

Sunday, September 15, 2013

डॉन को पकडना मुश्‍किल नही...!

"डॉन को पकडना मुश्‍किलही नही, नामुमकिन है' हा डायलॉग कोणे एके काळी प्रचंड गाजला... परंतु "समय बडा बलवान' असतो, हेही लक्षात ठेवायला हवं. भारतानं प्रयत्नांची शिकस्त केल्यास, दांडगी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीनं पावलं उचलल्यास दाऊद इब्राहिम भारतातल्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं दिसलं तर आश्‍चर्य वाटायला नको. "दाऊदला खेचून आणू,' असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या आठवड्यात म्हटलंच आहे!
संघटित गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांमुळे जगभरातल्या "मोस्ट वॉंटेड' दहशतवाद्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरला अटक करून भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्रीय तपासयंत्रणांनी सुरू केले आहेत. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या दाऊदला अटक करण्यासाठी "एफबीआय' या अमेरिकी गुप्तचर संघटनेशी बोलणी सुरू आहेत. दाऊदच्या मुसक्‍या आवळायला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे ऍटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी सहमती दर्शवल्याचं वक्तव्यसुद्धा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठवडाभरापूर्वीच केलं. प्रत्यक्षात गेली 20 वर्षं देशाबाहेर राहून मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आजही अबाधित वर्चस्व ठेवणारा दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या हाती इतक्‍या सहजासहजी लागेल का, हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला दाऊद "आयएसआय' या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संरक्षणात पाकिस्तानात ऐषारामात जगत आहे. इंटरपोलशी संबंधित असलेल्या जगभरातल्या प्रत्येक राष्ट्राच्या सुरक्षायंत्रणांना दाऊद पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचं माहीत आहे; पण भारतीय सुरक्षायंत्रणांचा हा दावा पाकिस्तान सरकारनं दरवेळी फेटाळून लावला. "रॉ' आणि "आयबी' या भारतीय गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तानातल्या दाऊदच्या वास्तव्याचे घराच्या क्रमांकासह ठोस पुरावे पाकिस्तानला कळवले. मात्र, दाऊद इब्राहिम नावाची अशी कोणतीही व्यक्ती आपल्याकडे राहत नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारत, पाकिस्तान, येमेन आणि दुबईतून मिळवलेले 11 पासपोर्ट; तसंच 16 नावं असलेला दाऊद हा पाकिस्तानातल्या बड्या उद्योजकांपैकी एक आहे. ज्याच्या गुंतवणुकीवर कराची स्टॉक एक्‍स्चेंज आजही उभं आहे, त्या दाऊदला संरक्षित ठेवण्यासाठी अल्‌ कायदा, लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर सदैव सज्ज असतं. गेली अनेक वर्षं दाऊद इब्राहिमच्या मागावर असलेल्या "रॉ'नं त्याच्या कराचीतल्या दोन आणि इस्लामाबाद इथल्या घरांचे पत्ते मिळवले. पाकिस्तानी नौदल, लष्कर व आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी; तसेच बडे उद्योजक व व्यावसायिक राहत असलेल्या कराचीतल्या "क्‍लिफ्टन' या पॉश वसाहतीत दाऊद, त्याची पत्नी मेहजबीन, विश्‍वासू साथीदार छोटा शकील, टायगर मेमन, आफताब बटकी, येडा याकूब, फहीम मचमच यांच्यासह अनेक वर्षं वास्तव्याला आहे; पण पाकिस्ताननं त्याचं अस्तित्वच नाकारल्यामुळे भारतीय सुरक्षायंत्रणांपुढे असलेला पेच अनेक वर्षं कायम होता. पाकिस्तानच्याच अबोटाबाद इथल्या एका घरात लपून बसलेला अल्‌ कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या "नेव्ही सील'च्या कमांडोंनी एका कारवाईत ठार केलं. यावरून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तान आश्रय देत असल्याची वस्तुस्थिती जगापुढे आली. एरवी, "आम्हीच तालिबानी आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी हैराण झालो आहोत,' असा बनाव करून कानाला हात लावणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा लादेनच्या हत्येनंतर समोर आला. पाकिस्तानच्या लष्करानंच लादेनसाठी अबोटाबाद इथल्या घराला सुरक्षा मिळेल, अशी व्यवस्था करून दिली होती. या घराला तारेचं मोठं कुंपण घालण्याचं कामही पाकिस्तानी लष्करानंच केल्याचंही स्पष्ट झालं होतं. अल्‌ कायदाच्या या प्रमुखाला आश्रय देणारा पाकिस्तान दाऊदसारख्या संघटित गुन्हेगारीकडून दहशतवादी कारवायांकडे वळलेल्या अंडरवर्ल्ड डॉनला सहज आश्रय देऊ शकतो, हे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे स्पष्ट झालं. असं असलं तरी पाकिस्तानवरचा दबाव वाढवून दाऊदला आपल्या ताब्यात घेण्यात त्या वेळीसुद्धा भारत कमी पडला. लादेनच्या हत्येनंतर बिंग फुटण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं दबावाखाली येऊन दाऊदला त्याचा पुतण्या मोईन याच्या नैरोबीत होणाऱ्या लग्नालासुद्धा उपस्थित राहण्यास मनाई केली होती. एवढंच नव्हे, तर केवळ वास्तव्याचं ठिकाणी उघड होऊ शकेल, या भीतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नवदांपत्याला आशीर्वाद देणंही त्यानं टाळलं होतं. यानंतरच्या काळात स्वतःला लपण्यासाठी "सेफ हेवन'च्या शोधात दाऊदनं सोमालिया, झिंबाब्वे, कांगो आणि सुदानसारख्या ठिकाणांचा पर्यायदेखील नेहमी खुला ठेवला. मात्र, परिस्थिती निवळल्यानंतर दाऊदनं कराचीत क्‍लिफ्टन परिसरात राहायला पसंती दिली. या वेळी त्यानं फक्त घराचा पत्ता बदलला. त्यापूर्वी दाऊदसोबत दुबई आणि कराची इथं राहिलेल्या करीमुल्ला खान याला ऑगस्ट 2008 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. त्याच्या चौकशीत दाऊद कराचीच्या क्‍लिफ्टन इथं आयएसआयच्या संरक्षणात राहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 1993 च्या साखळी बॉंबस्फोटांच्या वेळी शेखाडी बंदरात आरडीएक्‍स आणि शस्त्रांचा साठा उतरवण्यात करीमुल्लाचा महत्त्वाचा वाटा होता. स्फोटांनंतर तोसुद्धा दाऊदसोबत दुबईत आणि नंतर पाकिस्तानात वास्तव्याला होता. त्याच्या चौकशीतसुद्धा दाऊद पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दाऊद पाकिस्तानात असल्याचं सगळ्या जगाला माहीत असलं, तरी "तो आपल्याकडे नाही', असा दावा पाकिस्तानकडून वारंवार केला जात आहे. यामागची कारणमीमांसा पूर्णतः वेगळी आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच दाऊदच्या पैशावर आजही अवलंबून आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. काही वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या पाकिस्तानी रेल्वेला सावरण्यासाठी सरकारनं दाऊदची मदत घेतल्याचंही सांगण्यात येतं. विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या भारतात घातपाती कारवाया घडवून इथल्या विकासाला खीळ बसवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. भारतात बनावट चलनी नोटा, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांचे साठे वितरित करण्यासाठी आयएसआयच्या माध्यमातून अल्‌ कायदानंसुद्धा दाऊदचं संघटित गुन्हेगारी टोळीचं मोठे नेटवर्क वापरलं. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशासह पश्‍चिम आशियाई देश; तसंच आखाती देशांत दाऊदची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. नेपाळ स्टॉक एक्‍स्चेंज; तसंच तिथल्या काही बॅंकांतही त्याचे पैसे आहेत. नेपाळमधले कॅसिनो आणि डान्सबारमध्येही दाऊदचा पैसा आहे. भारताविरोधी कारवाया करण्यासाठी दाऊदनं नेपाळमधील माओवाद्यांशी संधान साधून त्यांच्या मदतीनं शस्त्रास्त्र, बनावट चलनी नोटांचं वितरण करायला सुरवात केली. त्यामुळं दाऊद हा पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. दुबई पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेला दाऊद टोळीचा कुख्यात गॅंगस्टर मुन्ना झिंगाडा याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा प्रयत्न करत आहे. मात्र, मुन्ना पाकिस्तानी नागरिक असल्याचे पुरावे पाकिस्तानी प्रशासनानं सादर करून त्याचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली आहे. यावरूनच दाऊदची पाकिस्तानी प्रशासनावर असलेली हुकमत सिद्ध होते. वयाच्या साठीकडे झुकलेला दाऊद आता पूर्वीसारखा कार्यरत नाही. हृदयाच्या आजारामुळे आशिया खंडात पसरलेल्या आपल्या अवैध धंद्यांची सर्व सूत्रं त्याचे भाऊ; तसंच अतिशय विश्‍वासू समजला जाणारा छोटा शकील यांच्याकडे सोपवली आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या रिअल इस्टेटच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यानं लहान भाऊ इक्‍बाल कासकरला भारतात धाडलं होतं. दुबईच्या "इंडियाना पब'मध्ये गोंधळ घातल्यानंतर तिथल्या सुरक्षायंत्रणांनी इक्‍बालला अटक केली. मग, इक्‍बाल कासकरसंबंधीची माहिती भारतीय यंत्रणांना कळवून त्याचं अधिकृतरीत्या प्रत्यार्पण घडवून आणण्यात आलं. नागपाड्याच्या पाकमोडिया स्ट्रीट इथं असलेल्या दाऊदच्या कुटुंबाच्या घरात इक्‍बालचं वास्तव्य आहे. दाऊदचा मुंबईतला रिअल इस्टेटचा व्यवसाय तो सांभाळत असल्याचं सांगण्यात येतं. गेल्या 20 वर्षांत परदेशात राहून आपली टोळी चालवणाऱ्या दाऊदच्या भारतातल्या नेटवर्कचा वापर आता आयएसआयनंसुद्धा घेणं बंद केलं आहे आणि आमिर रझा, रियाज आणि इक्‍बाल भटकळसारखे दहशतवादी तयार करायला सुरवात केली. या घडामोडींकडे डोळसपणे पाहिल्यास गेल्या काही वर्षांत आयएसआयनं दाऊदचं भारतातलं नेटवर्क वापरणं बंदच केल्याचं स्पष्ट जाणवतं. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला (26-11) लष्करे तैयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे हल्ला केला. त्या वेळीसुद्धा आयएसआय अथवा लष्करे तैयबानं दाऊदची मदत घेतली नाही, असं तपासात स्पष्ट झालं. भारतात वाढत असलेल्या इंडियन मुजाहिदीन, बांगलादेशमधील हरकत उल जिहाद इस्लामी (हुजी) व पाकिस्तानातली लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनांनी आपले स्लिपर सेल वाढवायला सुरवात केली आहे. 2005 नंतर झालेल्या घातपाती कारवाया इंडियन मुजाहिदीनच्या म्होरक्‍यांनी घडवल्या. त्यासाठी या दहशवाद्यांनी "सिमी'च्या जुन्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. यावरूनच आयएसआयला असलेली दाऊदची गरज आता संपुष्टात आली आहे, असं म्हणता येऊ शकेल. मात्र, सध्याच्या घडीला त्याचं पाकिस्तानातलं स्थान आणि महत्त्व यांचा विचार करता ते अनन्यसाधारण आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीनं त्याचा ताबा भारताकडं सहजासहजी मिळेल, अशी सुतरामही शक्‍यता नाही. सध्या पाकिस्तान सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानात अमेरिकेचं सैन्य आहे. 2013 अखेरपर्यंत हे सैन्य टप्प्याटप्प्यानं काढून घेतलं जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला थांबलेली तिथली तालिबानी चळवळ पुन्हा एकदा कार्यरत होऊ शकेल. परिणामी पाकिस्तानाला मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवायांना सामोरं जावं लागण्याची भीती आहे. पाकिस्तानला काही पातळ्यांवर अमेरिका आणि विशेषतः भारताकडून ठोस आश्‍वासनं आणि प्रत्यक्ष मदत मिळाल्यास दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या ताब्यात यायला कसलीही हरकत नसावी.