Friday, December 5, 2008

सीएसटी येथे आरडीएक्‍स सापडल्याने खळबळ

मुंबईत खळबळ : मुख्यमंत्र्यांकडून स्थानकाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 3 ः मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बॉम्बस्फोट घडविण्यासाठी ठेवलेले सात किलो आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक टायमर आज सायंकाळी पोलिसांना सापडल्याने एकच खळबळ उडाली; मात्र आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक टायमरची योग्य जोडणी झाली नसल्याने या आरडीएक्‍सचा स्फोट झाला नाही आणि मोठा घातपात टळल्याची माहिती रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली. बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट देऊन स्थानकाची पाहणी केली.

मुंबईत दहा अतिरेक्‍यांनी 26 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणावर घातपात घडविला. अतिरेक्‍यांच्या एका गटाने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर हल्ला चढविला होता. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी स्थानकावरील प्रवाशांनी सामान सोडून पळ काढला. रेल्वे पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे सगळे सामान गोळा करून रेल्वे पोलिसांच्या एका स्टोअर रूममध्ये ठेवले होते. आज दुपारी या सामानातील पिशव्यांची पोलिस तपासणी करीत होते. या वेळी एका पिशवीत पोलिसांना सात किलो वजनाच्या आरडीएक्‍सला इलेक्‍ट्रॉनिक्‍स टायमर जोडल्याचे आढळले. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शक्तिशाली स्फोट घडविण्याच्या उद्देशाने ठेवलेला हा साठा पाहून पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली. या कर्मचाऱ्यांनी तातडीने बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाला बोलावून हा साठा त्यांच्या ताब्यात दिला.
मुंबईत घातपात घडविण्यासाठी आलेल्या अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये पोलिसांनी केलेल्या प्रतिकारानंतर रेल्वे स्थानकातून पळ काढला होता; मात्र पळून जाताना त्यांनी हा स्फोटक साठा रेल्वे स्थानकात ठेवला. या अतिरेक्‍यांनी विलेपार्ले आणि वाडीबंदर येथे टॅक्‍सीत ठेवलेल्या बॉम्बचे स्फोट होऊन मोठी हानी झाली होती. याशिवाय हॉटेल ताजबाहेर आठ किलो वजनाचे दोन व हॉटेल ओबेरॉयबाहेर एक असे तीन बॉम्ब ठेवले होते. पोलिसांनी स्फोटकाचा साठा निकामी केल्याचे रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसची पाहणी केली. या वेळी पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, पोलिस आयुक्त ए. के. शर्मा हे घटनास्थळी उपस्थित होते.

Wednesday, December 3, 2008

मुंबईची "सुपारी' 15 लाखांची

महम्मद अजमल कसाबची माहिती; "कुबेर'च्या मालकाला मुंबईत आणणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 3 ः मुंबईवर दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या अतिरेक्‍यांच्या कुटुंबीयांना कामगिरी पूर्ण झाल्यानंतर "लष्कर ए तैय्यबा'कडून प्रत्येकी दीड लाख रुपये दिले जाणार होते, अशी माहिती पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने त्याच्या चौकशीत दिली.
दरम्यान, अतिरेक्‍यांनी सागरी मार्गाने प्रवास करताना वापरलेल्या कुबेर जहाजाच्या मालकाला गुजरात येथून चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांपैकी अटक केलेल्या महम्मद अजमल कसाब (वय 21) याच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे. या संपूर्ण हल्ल्याचे नेतृत्व अजमलसोबत असलेला अतिरेकी इस्माईल खान करीत होता. या हल्ल्याच्या सुरुवातीला प्रत्येक दहशतवाद्याला पाच हजार चारशे रुपये देण्यात आले होते. अतिरेकी कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना किमान दीड लाख रुपये देण्याचे कबूल करण्यात आल्याचेही कसाब याने सांगितले आहे. पाकिस्तान येथील फरीदकोटचा राहणारा कसाब याचे वडील मोहम्मद आलम (48) फेरीवाल्याचा व्यवसाय करतात. आई नूर इलाही (32), दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत राहणारा कसाब मजुरीचे काम करीत होता. यानंतर काही दिवसांनी तो लाहोर येथे राहणाऱ्या मोठ्या भावाकडे राहायला गेला. त्याचा मोठा भाऊ शेतात काम करीत असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. लष्कर ए तैय्यबाच्या संपर्कात आल्यानंतर त्याला अतिरेकी प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवादी कारवाईसाठी मुंबईत उतरलेल्या कसाबला दिनेशकुमार नावाचे विद्यार्थ्याचे बनावट ओळखपत्र देण्यात आले होते. वाडीबंदर येथे जाणाऱ्या टॅक्‍सीतही कसाबनेच बॉम्ब ठेवला होता, असेही उघडकीस आले आहे.
अतिरेकी कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व्हावी, यासाठी या अतिरेक्‍यांनी हॉटेल ताजबाहेर आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स टायमर असलेले प्रत्येकी आठ किलोचे दोन बॉम्ब ठेवले होते. या बॉम्बना चार तास 57 मिनिटांचा टायमर बसविण्यात आला. कारवाई सुरू असताना पोलिस आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा होतील, त्याच वेळी या बॉम्बचा स्फोट होईल, अशी या अतिरेक्‍यांची योजना होती; मात्र बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने हे दोन्ही बॉम्ब वेळीच निकामी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या हल्ल्यासाठी स्थानिकांनी केलेल्या मदतीचादेखील पोलिस शोध घेत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले.

Tuesday, December 2, 2008

तीन महिन्यांपूर्वीच दिली होती "ताज'ला हल्ल्याची कल्पना

"ताज'ला हल्ल्याची कल्पना
पोलिसांची माहिती ः सुरक्षेसाठी 22 सूचना केल्या होत्या

ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 2 ः जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक हॉटेल ताजवर अतिरेकी हल्ला होण्याची आगाऊ कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तीन महिन्यांपूर्वीच दिली होती. हा हल्ला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधीच्या 22 सूचना ताज व्यवस्थापनाला पोलिसांनी दिल्या होत्या; मात्र या सूचनांकडे ताज व्यवस्थापनाने पुरते दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या हॉटेल समूहाने सुरक्षिततेबाबत जागरूकता दाखविली असती, तर कदाचित हॉटेलवर 26 नोव्हेंबरला झालेला हल्ला टळला असता, अशी धक्कादायक माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या 10 अतिरेक्‍यांनी 26 नोव्हेंबरपासून सतत तीन दिवस मृत्यूचे थैमान घातले. या हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 183 जण ठार; तर 300 हून अधिक जण जखमी झाले. दक्षिण मुंबईत असलेले ऐतिहासिक हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाऊस या तीन इमारती अतिरेकी हल्ल्याचे प्रामुख्याने लक्ष्य ठरल्या. 59 तासांच्या थरारक चकमकीनंतर हॉटेल ताज अतिरेक्‍यांच्या ताब्यातून मुक्त करीत असताना दोन पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) एका कमांडोने प्राणांची आहुती दिली. अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यात 105 वर्षांची परंपरा असलेल्या हॉटेल ताजचे 500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले; मात्र हॉटेल ताजवर होणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याची कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला 29 सप्टेंबरलाच दिली होती. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरला जगभरात प्रसिद्ध असलेल्या
ताज हॉटेल समूहाचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक महावीर सिंग कांग, तसेच व्यवस्थापक सुनील कडी, श्रीमती जेनेट यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर तब्बल सहा तास हॉटेलच्या सुरक्षेसंबंधी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनासोबत पाहणी केली. या वेळी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत हॉटेलवर अतिरेकी हल्ला करणार असून, मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बहल्ला होण्याची शक्‍यताही वर्तविली. हा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तब्बल 22 लहान-मोठ्या सूचना केल्या. 26 नोव्हेंबरला ज्या प्रवेशद्वाराने अतिरेकी हॉटेलमध्ये शिरले, तो दरवाजा कायमस्वरूपी बंद करून, तेथे ग्रील लावण्याची सूचना पोलिसांनी केली. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त हॉटेलमधील अन्य दरवाजे बंद केले जावेत. हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहू दिले जाऊ नये, असे सांगण्यात आले असतानाही गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये पाच पाकिस्तानी नागरिक राहून गेल्याचे हा अधिकारी म्हणाला. हॉटेलमध्ये थांबणाऱ्या कोणत्याही नागरिकाला इंटरनेट सुविधा व वायफाय तंत्रज्ञानाचा पुरवठा करू नये; तसेच हॉटेलमध्ये शस्त्रधारी पोलिस, श्‍वानपथक ठेवावे, आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी हॉटेलचा "ले-आऊट मॅप' दिला जावा असेही पोलिसांनी या वेळी सुचविले; मात्र पोलिसांच्या कोणत्याच सूचनेकडे ताज हॉटेल व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट तेथे ठेवलेले शस्त्रधारी पोलिस आणि श्‍वान पथक हॉटेल व्यवस्थापनाने काढून टाकले होते. परिणामी 26 नोव्हेंबरला अतिरेक्‍यांनी या हॉटेलचा ताबा घेऊन तीन दिवस प्रचंड नरसंहार घडविल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

एफबीआय, स्कॉटलंड यार्डची पथके मुंबईत दाखल

हल्ल्याचा तपास : अतिरेक्‍यांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) व स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, मुंबईत दहशतवादी हल्ल्यासाठी आलेले अतिरेकी कराची येथून "अल-हुसैनी' जहाजातून गुजरातच्या पोरबंदरपर्यंत आले. मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर प्राणहानी व्हावी यासाठी अतिरेक्‍यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय येथे कत्तली केल्यानंतर मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरल्याची माहिती उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईत घडविलेल्या अतिरेकी हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह तब्बल 183 जणांनी प्राण गमावले; तर सुमारे 300 जण जखमी झाले. "लष्कर-ए-तैय्यबा'ने घडविलेल्या या मृत्यूच्या तांडवात 22 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने आता जगभरातील पोलिस या हल्ल्याच्या चौकशीसाठी मुंबईत येत आहेत. त्यानुसार "एफबीआय'चे पथक रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. या पथकाने आज राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, पोलिस आयुक्त हसन गफूर, गुप्तचर विभागाचे आयुक्त डी. शिवानंदन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव दयाळ, दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत पोलिस आणि एफबीआयच्या पथकांनी दहशतवाद्यांसंबंधी त्यांच्याकडे असलेल्या माहितीची देवाण-घेवाण केली. स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथकही या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर या पथकांनी अतिरेक्‍यांच्या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज, ओबेरॉय व नरिमन इमारतींना भेट दिली.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी अजमल कासाब याने कराची येथून "अल हुसैनी' जहाजातून अतिरेकी आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पाकिस्तानी सागरी हद्द ओलांडल्यानंतर पोरबंदर येथून हे अतिरेकी "कुबेर' जहाजाने मुंबईच्या दिशेने आले. या जहाजात पोलिसांना मिळालेला सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीम तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे. या अतिरेक्‍यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर घातपात व्हावा यासाठी मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरून ठेवले होते. हॉटेलमधील मृतदेह उचलताना ही बाब स्पष्ट झाल्याचे मारिया यांनी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी अतिरेक्‍यांनी त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचीही चौकशी करण्यात येत आहे. अतिरेक्‍यांनी हॉटेल लिओपोल्ड आणि ताज या ठिकाणी आठ किलोचे दोन बॉम्ब ठेवले होते. या दोन्ही बॉम्बना डिटोनेटर्स बसविण्यात आले होते; मात्र पोलिसांनी हे बॉम्ब निकामी केल्याचे मारिया या वेळी म्हणाले.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट "लष्कर ए तैय्यबा'चा

राकेश मारिया : लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या निवडक तरुणांचाच वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः संबंध देशाला हादरविणाऱ्या मुंबईवरील दहशती हल्ला हा लष्कर ए तैय्यबाचा मोठा कट होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली आहे. या कटासाठी लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या काही निवडक तरुणांचाच वापर करण्यात आला. हा संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची मदत घेत आहेत. या पूर्वनियोजित हल्ल्याकरिता अतिरेक्‍यांना स्थानिकांची अथवा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कची मदत झाली का, याची तपासणी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

समुद्रमार्गे 26 नोव्हेंबरला आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईवर तब्बल तीन दिवस अतिरेकी हल्ला चढविला. या घातपाती हल्ल्यात 186 जणांचा बळी गेला, तर 300 हून अधिक जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी गिरगाव येथे अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने त्याच्या चौकशीत तो लष्कर ए तैय्यबाचा सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. दीड वर्षांपूर्वी लष्कर ए तैय्यबा संघटनेत दाखल झालेल्या कसाब याच्यासह निवडक दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. त्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले. कसाब याने पाकिस्तानमध्ये झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याचीही कबुली दिल्याचे यावेळी मारिया यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश केल्यानंतर हॉटेल ताज, ओबेरॉय व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शिरून तेथील लोकांना ठार मारायचे. पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी काहींना ओलिस ठेवायचे. या ओलिसांच्याच जोरावर जेवढे दिवस जगता येईल तेवढे दिवस जगायचे आणि पुढे मरायचे, अशी कार्यपद्धती या अतिरेक्‍यांकडून वापरण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हल्ल्याचे सीसीटीव्हीत झालेले रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे. ज्या छोट्या नावेतून हे अतिरेकी कुलाब्याच्या मच्छीमार कॉलनीत उतरले, त्यात पोलिसांना सापडलेल्या सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीमवरून त्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग पोलिस तपासत आहेत. या नावेच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. अतिरेक्‍यांनी ठार मारलेला नावेचा चालक अमरसिंग तांडेल दोन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात होता. त्याच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक गुजरात येथेही गेले असल्याची माहिती मारिया यांनी यावेळी दिली. पोलिसांना या अतिरेक्‍यांची नावे मिळाली असून त्यांची पडताळणी सुरू आहे. हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन इमारतीत शिरलेल्या सर्वच अतिरेक्‍यांचे एकमेकांशी मोबाईलवर सतत संपर्क सुरू असल्याची बाब पडताळून पाहिली जात आहे. शिवाय या अतिरेक्‍यांनी पाकिस्तानमधील अतिरेक्‍यांशी केलेल्या कथित संभाषणाचीही पडताळणी सुरू असल्याचे मारिया यांनी सांगितले.

हेमंत करकरेंना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

हजारोंची उपस्थिती ः सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
ंमुंबई, ता. 29 ः मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना धारातीर्थी कोसळलेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख व सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर आज सकाळी दादरच्या हिंदू स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह राजकीय नेते, ज्येष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच हजारो सामान्य नागरिकांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्‍यांशी प्राणपणाने लढताना 26 नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेमंत करकरे यांना वीरमरण आले. आज सकाळी करकरे यांच्या पार्थिवावर दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात जतन करण्यात आलेला करकरे यांचा मृतदेह दादर पूर्वेला हिंदू कॉलनीत असलेल्या त्यांच्या युरोपियन बंगलो या निवासस्थानी अंत्यदर्शनाकरिता आणण्यात आला. त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ पोलिस अधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी व पोलिस कर्मचारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास राजशिष्टाचार विभागाच्या पोलिसांनी करकरे यांचा राष्ट्रध्वजात गुंडाळलेला मृतदेह अंत्ययात्रेसाठी उचलला. पुढे पोलिसांचे बॅण्ड पथक "धीरे चल' या दुखवटा धूनवर हळुवार पावले टाकत पुढे जात होते. अंत्यदर्शनासाठी आलेले पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेला खांदा दिला. फुलांची आकर्षक रचना केलेल्या मोठ्या ट्रकमध्ये त्यांचा मृतदेह अंत्ययात्रेसाठी ठेवण्यात आला. या मृतदेहावर करकरे यांचा पोलिसी गणवेष, कॅप व तलवार ठेवण्यात आली होती. दादरच्या हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकला बांधण्यात आलेल्या दोरखंडाला राज्य पोलिस दलातील सर्व वरिष्ठ व माजी पोलिस अधिकाऱ्यांनी हात लावल्याचे चित्र होते. दादर परिसरात करकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे मोठमोठे होर्डिंग्ज अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे लक्ष वेधत होते. दादर प्लाझा, शिवाजी नाट्य मंदिर, शिवसेना भवन, शिवाजी पार्क या मार्गे स्मशानभ
ूमीकडे जाणाऱ्या या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने जमलेले लोक करकरे यांच्या पार्थिवावर फुलांची उधळण करीत होते. ट्रकवर पोलिसांच्या गणवेशात असलेली करकरे यांची मोठी तसबीरही लावण्यात आली होती. "हेमंत करकरे अमर रहे', "भारत माता की जय'सारख्या घोषणांत पुढे सरकणारी ही अंत्ययात्रा साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत पोचली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी करकरे यांच्या पत्नी कविता, सायली व जुई या दोन मुली तसेच मुलगा आकाश यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले होते. स्मशानभूमीत सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, जलसंपदा मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री नारायण राणे, शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार रामदास आठवले, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार विनायक मेटे, आमदार जितेंद्र आव्हाड, कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजीव दयाळ, रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करकरे यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पोलिस अधिकारी, साहित्य, सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात आली.

हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानातूनच आले

राकेश मारिया : महम्मद कासाबच्या चौकशीतून कट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः अतिरेकी हल्ला करण्यासाठी कराचीहून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी थेट संबंध आला आहे. प्रत्येकी दोन जण याप्रमाणे पाच गटांनी शहरात हा अतिरेकी हल्ला चढविला. पोलिसांनी गिरगाव येथून अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल महम्मद कासाब व त्याच्या साथीदारानेच दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि चकमकफेम पोलिस अधिकारी विजय साळसकर यांना गोळीबारात ठार मारल्याची कबुली कासाब याने चौकशीत दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी गेले तीन दिवस मुंबईत घातपाती कारवाया घडविल्या. 26 नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथील मच्छीमारनगरमध्ये उतरलेल्या या अतिरेक्‍यांचे प्रत्येकी दोन अशा पाच गटात विभाजन झाले. हे पाचही गट लिआपोल्ड कॅफे, हॉटेल ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा पाच ठिकाणी टॅक्‍सीने गेले. लिओपोल्ड कॅफे येथे गोळीबार करण्यासाठी गेलेला गट नंतर हॉटेल ताजमध्ये गेलेल्या गटात सामील झाला. महम्मद अजमल कासाब (21) या पाकिस्तानच्या फरीदकोट जिल्ह्यातून आलेल्या अतिरेक्‍याने त्याच्या साथीदारासोबत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शिरून तेथे गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्याचे कळताच ते कामा रुग्णालयात लपले. त्यानंतर काही क्षणातच तेथे पोहोचलेले सह पोलिस आयुक्त करकरे, अतिरिक्त आयुक्त कामटे आणि पोलिस निरीक्षक साळसकर असलेल्या गाडीवर त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तिघा अधिकाऱ्यांसह आणखी दोघे पोलिस शिपाई मरण पावले. त्यानंतर अतिरेक्‍यांनी त्यांचे मृतदेह खाली फेकून गाडी घेऊन पलायन केले होते. त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी गिरगाव येथे त्यांना अडविले. त्यातील एकाला तेथेच चकमकीत ठार मारले, तर महम्मद अजमलला अटक केली. पोलिसांच्या अटकेत असलेल्या अजमलने पोलिसांना हल्ल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती द्यायला सुरुवात केली आहे. कराचीहून समुद्र मार्गाने येत असताना पोरबंदर येथे एका बोटीतून हे अतिरेकी आले. त्यातील तिघा खलाशांना वाटेतच मारून फेकून दिले, तर दुसऱ्याला घेऊन हे अतिरेकी मुंबईत आल्याचे मारिया यांनी सांगितले. या संपूर्ण गटाला उच्च प्रतीचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुलीही अजमलने दिली आहे. या अतिरेक्‍यांकडून पोलिसांना 10 एके-56 रायफल्स, 1
0 पिस्तुले, हातबॉम्ब, दोन बॉक्‍समध्ये भरलेली 16 किलो स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठविण्यात आली आहेत. वाडीबंदर आणि विलेपार्ले येथे झालेले स्फोट हे टॅक्‍सीत राहिलेल्या स्फोटक साठ्यामुळेच झाल्याची शक्‍यता आहे. या कृत्यात त्यांना कोणत्या स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले का, याचा पोलिस शोध घेत असल्याचेही मारिया यांनी सांगितले. या सर्व अतिरेकी 19 ते 28 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना बोगस ओळखपत्रेही सापडली आहेत.