Sunday, February 8, 2009

रॉय जाणार की सरकार त्यांना तारणार?

दिवसभर चर्चा ः गृहमंत्र्यांचे सबुरीचे धोरण

पोलिस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर या निर्णयाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, की रॉय यांना पायउतार व्हावे लागेल, याविषयी आज पोलिस आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. दरम्यान, रॉय यांच्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत आजच आपल्याकडे आली आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच यासंबंधी राज्य सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

सेवाज्येष्ठतेत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर ए. एन. रॉय यांची गेल्या वर्षी फेब्रुवारीत नेमणूक झाली होती. या प्रकरणी प्रथम "कॅट' आणि नंतर उच्च न्यायालयात रॉय यांच्याविरुद्ध निर्णय देण्यात आला. या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल किंवा रॉय यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार नवीन महासंचालकाची नियुक्ती करावी लागेल. या प्रकरणी रॉय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. ते नवी दिल्ली येथे पूर्वनियोजित बैठकीसाठी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. रॉय आजपासून दीर्घ रजेवर गेल्याची चर्चाही आज पोलिस आणि मंत्रालयीन वर्तुळात होती. मात्र त्याला कसलाच दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, रॉय प्रकरणात राज्य सरकार पुढे काय भूमिका घेणार, यासंबंधी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीचा तपशीलवार अभ्यास करणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी कायदेशीर सल्लाही घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले. रॉय यांच्या प्रकरणात यापूर्वी झालेले सर्व निर्णय सरकारने घेतले आहेत, यापुढचे निर्णयही सरकार योग्य वेळी घेईल, असे पाटील या वेळी म्हणाले.

(sakal,6 feb)

अतिरेकी हल्ल्यात पितृछत्र हरपलेल्या शीतलच्या शिक्षणासाठी चार लाख

मुंबईकरांचा गौरव ः आय लव्ह मुंबईचा मदतीचा हात

तीन महिन्यांच्या मुलीला बनारस येथे तिच्या आजी-आजोबांकडे पहिल्यांदाच घेऊन जाण्यासाठी उपेंद्र आणि सुनीता यादव हे दांपत्य 26 नोव्हेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून जायला निघाले; मात्र अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्यात या लहानशा कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हास्य हरपले. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात उपेंद्र यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी सुनीता आणि अवघ्या तीन महिन्यांची मुलगी शीतल यांचा आधारच निखळला. "त्या' दोघींना सरकारकडून मदत तर मिळालीच, पण सामाजिक जाणिवेतून "आय लव्ह मुंबई' या संस्थेने लहानग्या शीतलच्या शिक्षणाकरिता मदत निधी गोळा करायला सुरुवात केली. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला अन्‌ तिच्या शिक्षणासाठी तब्बल चार लाख 65 हजार रुपयांचा निधी गोळा झाला. या निधीचे वितरण काल (ता. 4) आय लव्ह मुंबईने घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिस आणि नागरिक यांचे कुटुंबीय तसेच प्रसंगावधान दाखविणाऱ्या मुंबईकरांचा गौरवही करण्यात आला.

आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये आय लव्ह मुंबई, जायन्टस्‌ इंटरनॅशनल आणि बार्कलेज बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर, पोलिस निरीक्षक शशांक शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व शहीद पोलिसांचे कुटुंबीय, प्रसंगावधान दाखवीत शेकडो लोकांचे जीव वाचविणारे सामान्य मुंबईकर यांचा गौरव करण्यात आला. यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे अनेकांचे प्राण वाचविणारे मोहम्मद तौफिक शेख ऊर्फ छोटू चहावाला, कॅप्टन तमिलसेल्व्हम, रेल्वे कर्मचारी विष्णू झेंडे, सुरेश कुशवाह, विवेक शर्मा, यू. एम. पाटील, एस. डी. वाघ, जे. एस. झिंपरीकर, व्ही. वाघमारे, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. पी. एल. तिवारी, जे. जे. रुग्णालयाचे डीन सबनीस यांनाही त्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत सन्मानित करण्यात आले.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुंबई हल्ल्यातील जखमी अफरोज अन्सारी या लहान मुलाने केलेल्या मागणीनुसार त्याला संगणक पुरविण्यात आल्याची माहिती आय लव्ह मुंबईच्या विश्‍वस्त शायना एन. सी. यांनी उपस्थितांना सांगितले. या वेळी आय लव्ह मुंबईचे संस्थापक नाना चुडासामा, सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, बार्कलेज बॅंकेचे समीर भाटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(sakal,5 feb)

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारवर अवलंबून

चित्कला झुत्शी ः विर्क यांच्या नियुक्तीची दाट शक्‍यता

उच्च न्यायालयाने पोलिस महासंचालक अनामी राय यांनी नियुक्ती रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी असून लवकरच त्याबाबतचा निर्णय सरकार घेईल, अशी माहिती गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कला झुत्शी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय झाल्यास सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालकपदी एस. एस. विर्क यांची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राय यांची नियुक्ती रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही झुत्शी यांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आजच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार किंवा स्वतः महासंचालक राय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात. याबाबत राय यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अपील सादर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास अथवा लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास महासंचालकपदी नवीन नियुक्ती होण्याबाबत पोलिस वर्तुळात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी-2008 मध्ये राय यांना तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून महासंचालक पदावर नेमण्यात आले. राज्य सरकार व राय या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यास पोलिस महासंचालक पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार सरकारला पुन्हा राबवावी लागेल. या पदासाठी एस. एस. विर्क, जीवन वीरकर आणि सुप्रकाश चक्रवर्ती या तिघा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार करावा लागणार आहे.

(sakal,5 feb)

अतिरेकी हल्ल्याप्रसंगी कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई ?

शिशुपाल यांची बदली ः पोलिसांकडून प्रशासकीय बाब असल्याचे स्पष्ट

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा सर्वत्र सन्मान होत असतानाच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर आता कारवाईला सुरवात झाली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून की काय आझादमैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल यांची स्थानिक शस्त्र (एलए) विभागात बदली करण्यात आली. हल्ल्याच्या वेळी दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांची बदली झाल्याचे बोलले जाते. मात्र, या बदलीमागे 26 नोव्हेंबरचा हल्ला हे कारण नाही. प्रशासकीय कामकाजाचा एक भाग म्हणून ही बदली करण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाचे सह पोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दिली.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या रात्री अतिरेक्‍यांनी आझादमैदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घातपात घडविला. अशा आणीबाणीप्रसंगी आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल मात्र कर्तव्यावर उपस्थित नव्हते. हल्ल्याच्या वेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीची चौकशी करण्याची मागणी "सकाळ'ने यापूर्वी एक शून्य शून्य सदरातून "नेभळटपणाची चौकशी व्हावी' या मथळ्याखाली केली होती. केवळ दुर्दैव म्हणून 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची घटना समजण्यासाठी फार उशीर लागल्याची खंत शिशुपाल यांनी "सकाळ' कडे व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याने 26 नोव्हेंबरच्या रात्री 8.40 वाजल्यापासून आपण रजेवर गेलो. सकाळी लवकर निघायचे असल्याने त्या रात्री आपण लवकर झोपलो. त्या रात्री आपला मोबाईल फोन देखील दुसऱ्या खोलीत राहिल्याने पहाटेपर्यंत बाहेर घडत असलेला प्रकार लक्षातच आला नाही. पहाटे पावणेतीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच आपण पोलिस ठाण्यात पोचलो. तेव्हापासून या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आपण होतो असेही ते म्हणाले.
प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळे आपल्याला तीन महिन्यांपूर्वीच एक नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारीपासून आपली बदली झाली. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याचा आणि बदलीचा दुरान्वयेही संबंध नाही असे शिशुपाल यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणाला प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दुजोरा दिला. स्थानिक शस्त्र (एलए) शाखेशी संलग्न झालेले शिशुपाल आजारपणाच्या रजेवर गेले आहेत.

(sakal,5 feb)

--------------



अमेरिकी तरुणीचा जुहू येथे विनयभंग


देश-विदेशातील कृष्णभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जुहू येथील इस्कॉन मंदिराच्या निवासी संकुलात राहणाऱ्या अमेरिकन तरुणीचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. धार्मिक स्थळी झालेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली.
महिनाभरापूर्वी भारतात आलेल्या या अमेरिकन युवतीने इस्कॉनच्या निवासी संकुलात राहत असताना रविवारी सकाळी जुहू पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याची तक्रार दिली. या वेळी बलात्काराची शक्‍यताही व्यक्त झाल्याने पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने वैद्यकीय तपासणी करायला नकार दिला. या प्रकरणी मंदिर व्यवस्थापनदेखील त्यांच्या पातळीवर चौकशी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक काथकाडे यांनी दिली. ही तरुणी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या तिच्या मित्र-मंडळींना भेटायला आली होती, असेही ते म्हणाले.

(sakal,4 feb)

रशियन एअरलाईन्स कर्मचाऱ्याची "ओबेरॉय'मध्ये आत्महत्या

"एअरलाईन एरोफ्लोट' या रशियन एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्याने हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री उशिरा घडली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अलेक्‍झांडर हेन्रीआनो ( 22) असे या आत्महत्या केलेल्या रशियन तरुणाचे नाव आहे. एअरलाईन एरोफ्लोटच्या विमानाने मुंबईत आलेला अलेक्‍झांडर काल रात्री त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत हॉटेल ओबेरॉयमध्ये थांबला होता. रात्री उशिरापर्यंत सहकाऱ्यांसोबत मद्यपान केलेल्या अलेक्‍झांडरच्या मोबाईलवर एक वाजण्याच्या सुमारास फोन आला. फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर आलेल्या मानसिक तणावामुळे तो खोलीबाहेर निघून गेला. यानंतर त्याने रागाच्या भरातच हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरील खिडकीतून स्वतःला खाली झोकून दिले. त्यात तो जागीच ठार झाला, असा जबाब त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिला आहे.

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे. जे. रुग्णालयात नेला असून या घटनेची रशियन दूतावासामार्फत त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
-------------


थरारक पाठलागानंतर चोरट्यांना अटक
चेन खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनाच धडक देऊन पळणाऱ्या दोन मोटरसायकलवरील चौघांना माहीम पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केल्याची घटना आज पहाटे घडली. या वेळी मोटरसायकलस्वाराच्या धडकेने एक पोलिस जखमी झाला असून, त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करून पाठविल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली.
मोटरसायकलवरून आलेल्या दोन चेनस्नॅचरनी शिवाजी पार्क येथील पादचाऱ्याचे सोन्याचे दागिने पळवून ते माहीमच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांच्या गस्ती वाहनाने माहीम पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस माहिम जंक्‍शनजवळ पॅडल रोड येथे उभे राहिले. तोपर्यंत मोटरसायकलवरून भरधाव आलेल्या चौघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे नाकाबंदीसाठी उभे असलेले पोलिस शिपाई जॉंबाज खान पठाण (32) यांना धडक देऊन या चोरट्यांनी धूम ठोकली; त्यात पठाण गंभीर जखमी झाले.
पठाण यांना जखमी करून पुढे निघालेल्या या चौघांचा माहीम पीटर-वनच्या गाडीने थरारक पाठलाग केला. एका मोटरसायकलने रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळेही उडविले. त्यानंतर कुमार वैद्य मार्गावर या चौघांना सहायक पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. विजय परमार (19), महेश वाघेला (18), विवेक मोरे (18) व राजेश गोहिल (22) अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शिवाजी पार्क परिसरात चेन स्नॅचिंग केली आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत. सध्या त्यांच्यावर अपघाताचा, तसेच सरकारी कामात अडथळा अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली. अटक केलेल्या चारही आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून पाहिली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

--------


"सिनेमॅक्‍स'च्या व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या

अंधेरी येथील सिनेमॅक्‍स चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मंदार जयराम पाटील (वय 33) यांची अनोळखी मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत वर्सोवा पोलिस ठाण्यात अनोळखी मोरकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी-पश्‍चिमेला वर्सोवा गावात असलेल्या सर्वोदय सोसायटीच्या मैदानात मंदार यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने खोलवर जखमा केल्या गेल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.


(sakal,3 feb)

प्रीतीच्या वाढदिवसाला शेजाऱ्यांचे "जागरण'

कर्णकर्कश संगीत : कायदा धाब्यावर बसविल्याचा आरोप


वाढदिवसाच्या "पर्वणी'वर पहाटे उशिरापर्यंत मोठ्या आवाजात "डीजे' वाजवून शेजाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिला स्थानिक नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास बंदी असताना प्रीतीने केलेल्या कायद्याच्या उल्लंघनाबाबत तिच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त "यूएनआय'ने दिले आहे.

पाली हिल येथे वास्तव्य असलेल्या प्रीतीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घरात वाढदिवसानिमित्त एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत "डीजे'च्या तालावर प्रीतीचे मित्र-मैत्रिणी बेधुंद होऊन नाचले. पहाटे चार वाजल्यापर्यंत मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या या "म्युझिक'मुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या झोपेचे मात्र खोबरे झाल्याची तक्रार आहे. पहाटे उशिरापर्यंत चांगलेच जागरण झालेल्या नागरिकांनी या प्रकरणाची माहिती खार पोलिसांना दिली. त्यापूर्वी काही नागरिकांना ही बाब पोलिस नियंत्रण कक्षालाही कळविली होती.

पोलिसांची डोळेझाक?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याने पोलिस या ठिकाणी आले; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न करता तेथून काढता पाय घेतला, असा आरोप आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीतीने पहाटे उशिरापर्यंत हा गोंधळ घातला असला तरी स्थानिक पोलिसांनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. नागरिकांच्या तक्रारीनंतरही या घटनेची खार पोलिस ठाण्यात नोंदच नसल्याचे समजते.
(sakal,2 feb)

Sunday, February 1, 2009

अतिरेकी हल्ल्यानंतर..!

देशावर आजवरचा झालेला सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याकडे पाहिले जाते. सागरी मार्गाने दक्षिण मुंबईत उतरलेल्या अवघ्या 10 अतिरेक्‍यांनी या देशातील सगळ्याच सुरक्षा यंत्रणांना हलवून सोडले. तब्बल 59 तास पोलिस, नौदल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षायंत्रणांनी या अतिरेक्‍यांना यमसदनी पाठवून मुंबईला सुरक्षित ठेवले, मात्र त्यासाठी या देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली. साध्या होमगार्डपासून सहपोलिस आयुक्तपदाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 164 निष्पापांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. यात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोघा कमांडोंनी दिलेले बलिदानही तितकेच महत्त्वाचे. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांतील त्रुटींमुळे हा अतिरेकी हल्ला अधिक जहरी वाटत असला तरी अशा प्रकारच्या घटना पचविण्याचा मोठा आत्मविश्‍वास सामान्य मुंबईकरांत या घटनेनंतर निर्माण झाला. दहशती हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा भारतात घडू नयेत याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि आश्‍वासनांची खैरात केली. प्रत्यक्षात त्यातील कितींची नजीकच्या काळात पूर्तता होतेय याकडेच सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लष्कर-ए-तैय्यबाच्या अतिरेक्‍यांनी 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत घडविलेल्या थराराने संबंध जगाचे लक्ष वेधून घेतले. 105 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेले हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाउस या दक्षिण मुंबईतील तीन महत्त्वाच्या ठिकाणांना अतिरेक्‍यांनी लक्ष्य केले. कालपरवापर्यंत नरिमन हाऊसबाबत दक्षिण मुंबईत राहणाऱ्या फारच कमी लोकांना माहिती होती, मात्र "ज्यू' धर्मीयांचे वास्तव्य असलेली ही इमारत अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर ठळकपणे होती हेच या हल्ल्यानंतर स्पष्ट झाले. केलेल्या हिंसाचाराचे पडसाद जगभरात पडतील याची काळजी घेत अतिरेक्‍यांनी तब्बल 22 परदेशी नागरिकांचे बळी घेतले. यात ज्यूंची संख्या सर्वाधिक. 164 जणांचे जीव घेणाऱ्या आणि तीनशेहून अधिक नागरिकांना जखमी करणाऱ्या या अतिरेक्‍यांच्या कृत्याचा जगभरातून निषेध झाला. हा निषेध भारतीयांच्या अंतर्मनावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी लावणारा असला तरी प्रत्यक्षात भारतीय सुरक्षायंत्रणा व गुप्तचर खाते या प्रकरणात कमी पडले हे सूर्यप्रकाशाइतके ढळढळीत सत्य आहे. मुंबईवर हल्ल्यासाठी आलेल्या 10 अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अजमल कसाब याला डी.बी.मार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी प्राणाची आहुती देऊन पकडले. या हल्ल्यासंबंधी कसाबने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळेच अनेकदा विश्‍वासघातकी राजकारण करणाऱ्या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली मोठ्या होणाऱ्या लष्कर-ए-तैय्यबाचा सहभाग या हल्ल्यात स्पष्ट झाला. सुरुवातीला कसाब आपल्या राष्ट्राचाच नसल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली. कसाबच्या वडिलांनी त्याची ओळख पटविल्यानंतर कुठे तो पाकिस्तानी असल्याबाबतची कबुली पाकिस्तानने दिली. मुंबई पोलिसांनी दाखविलेले शौर्य वाखाणण्याजोगे आहेच, मात्र अतिरेक्‍यांच्या एमपी-5 सारख्या अत्याधुनिक शस
्त्रांचा सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाचे शस्त्र, ते चालविण्याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळाले असते; तर काही ठिकाणी पोलिसांनी कच खाल्ल्याच्या घटना घडल्या नसत्या. उलट हातात काठी असलेल्या पोलिसांनी निधड्या छातीने अतिरेकी हल्ल्याचा मुकाबला केला हे इथे नमूद करावे लागेल. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या सामान्य नागरिकांत नव्याने आत्मविश्‍वास निर्माण व्हावा यासाठी काही दिवसांतच शहरात ठिकठिकाणी संवेदनशील "पॉईन्ट्‌स'वर शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले. शहरात चारशे ठिकाणी खंदक बनवून तेथे एके-47 रायफलधारी पोलिस अहोरात्र ठेवण्यात आल्याने नागरिकांतील भीतीचे वातावरण कमी झाले. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी या चारशे ठिकाणांवर कायमस्वरूपी शस्त्रधारी पोलिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणावर आठ शस्त्रधारी पोलिस ठेवण्यात येणार असल्याने येत्या काही महिन्यांतच चार हजार पोलिसांची पदे भरण्याची शक्‍यता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

तत्परता सरकारची.

अचानक झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर संबंध पोलिस यंत्रणा काही क्षणातच खडबडून जागी झाली. हॉटेल ताज, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय या ठिकाणांसह छत्रपती शिवाजी टर्मिनसवर 26 नोव्हेंबरला रात्री साडेनऊ नंतर सुरू झालेल्या थराराचे सुरुवातीचे काही तास अतिशय महत्त्वाचे होते. पोलिसांनी उपलब्ध कुमक घेऊन अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला कडवा प्रतिकार केला. गर्दीच्या ठिकाणांवर संबंध पोलिस दल लगेचच "इन ऍक्‍शन' झाल्याने अतिरेक्‍यांना त्यांचे मनसुबे मोठ्या प्रमाणावर साध्य करता आले नाहीत. अन्यथा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मोठा घातपात करून तेथे किमान पाच हजार नागरिकांना मारण्याचा त्यांचा बेत होता. उपलब्ध शस्त्रसाठा आणि साधनसामग्रीच्या मदतीने अतिरेक्‍यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या सोळा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्यामुळे अधिक हानी टळली. या शहिदांच्या कुटुंबीयांची झालेली हानी भरून निघणे अशक्‍य असले तरी त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. प्रत्येकी पंचवीस लाख रुपये; तसेच म्हाडाचे घर असे पॅकेज या शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. सारस्वत बॅंकेने पाच शहिदांच्या वारसांना त्यांच्या बॅंकेत दिलेली नोकरीही बॅंक व्यवस्थापनाच्या सजगतेचे उत्तम उदाहरण ठरावे. या हल्ल्यात मरण पावलेल्या सामान्य नागरिकांनाही राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख; तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. राज्य सरकारने जखमींना प्रत्येकी 50 हजार; तर केंद्राने प्रत्येकी एक लाख रुपये दिले असून, त्यांच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकारने केला. याशिवाय रेल्वेनेही मृतांना लाखो रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. हल्ल्यातील पीडितांना 31 डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारची आर्थिक मदत देण्याच्या केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांची पूर्त
ताही झाली आहे. अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्या 39 पोलिसांना त्यामानाने सरकारकडून कमी मदत मिळाली. 16 मार्च 2008 मध्ये झालेल्या एका सरकारी निर्णयानुसार अशा प्रकारच्या आपत्कालीन स्थितीत कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची तरतूद आहे.

गरज सक्षम सागरी सुरक्षेची

कराचीच्या समुद्र किनाऱ्याहून 23 नोव्हेंबरला लष्कर-ए-तैय्यबाच्याच मालकीच्या अल-हुसैनी जहाजातून मुंबई हल्ल्यासाठी हे अतिरेकी निघाले. शेकडो मैलांच्या सागरी प्रवासानंतर 26 नोव्हेंबरला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कुलाबा येथे असलेल्या मच्छीमार कॉलनीत उतरणाऱ्या या दहाही अतिरेक्‍यांना संपूर्ण प्रवासात भारतीय सुरक्षायंत्रणापैकी कोणीच हटकले नाही याचेच नवल अधिक आहे. 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत आरडीएक्‍सचा साठा आणण्यासाठी अरबी समुद्रातील सागरी मार्गाचाच वापर करण्यात आला. बॉम्बस्फोटांचा अनुभव गाठीशी असतानाही भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी सीमांवर म्हणावे तसे लक्ष दिलेच नसल्याचे नुकत्याच मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. अरबी समुद्रात नौदलाचा सराव सुरू असताना त्यांच्या नजरेखालून अतिरेक्‍यांना वाहून नेणारी बोट निसटणे हा हलगर्जीपणाचा कळसच. पाकिस्तानची सागरी हद्द ओलांडत असताना त्यांच्या हद्दीत गेलेल्या एमव्ही कुबेर या मासेमारी करणाऱ्या भारतीय बोटीला अतिरेक्‍यांनी हायजॅक केले. या बोटीतून मच्छीमारांसारखा वेश परिधान करून हे अतिरेकी मुंबईकडे निघाले. नौदल, तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांना संशय येऊ नये यासाठी त्यांनी कुबेर बोटीच्या तांडेलला जिवंत ठेवले. याशिवाय दहाही अतिरेक्‍यांनी त्यांच्या कपाळावर लाल टिळा आणि हातात दोरे बांधले. त्यामुळे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना ते मच्छीमार असावेत असेच वाटत होते. भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या या अतिरेक्‍यांच्या बोटीला नौदल, तटरक्षक दल अथवा सागरी पोलिसांनीही हटकले नाही. मुंबईपासून तीन नॉटीकल माईल्स अंतरावर बोटीचा तांडेल याला ठार मारून पुढील प्रवास एका लहानशा डिंगीतून करणाऱ्या या अतिरेक्‍यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे कोणीच नव्हते. 93 च्या बॉम्बस्फोटा
ंनंतर देशभरात 72 सागरी पोलिस ठाणी सुरू करण्यात आली. त्यापैकी एक सागरी पोलिस ठाणे मुंबईच्याही वाट्याला आले. 114 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा असलेल्या मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी अवघे एक पोलिस ठाणे मिळाले असले तरी आजपर्यंत ते कार्यान्वित झालेले नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 14 सागरी पोलिस ठाण्यांपैकी 13 पोलिस ठाणी यापूर्वीच कार्यान्वित झाली आहेत. सागरी गस्त छोट्या बोटींशिवाय हायस्पीड बोटींतूनही व्हावी म्हणून कोट्यवधी खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात मुंबईसाठी देण्यात आलेल्या हायस्पीड बोटीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून गोवा शिपयार्डात सुरू आहे. यावरूनच सरकार मुंबईच्या सुरक्षिततेबाबत कितपत सजगपणे विचार करीत होते याचा प्रत्यय येऊ शकेल. मुंबईच्या या ढिसाळ सुरक्षायंत्रणांचा गैरफायदाच अतिरेकी संघटना किंबहुना पाकिस्तानने घेतला म्हटल्यास वावगे ठरू नये.

गुप्तचर खाते आणि सुरक्षायंत्रणांतील समन्वय महत्त्वाचा

मुंबई हल्ल्याच्या तीन महिन्यांपूर्वी गुप्तचर खात्याने अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्‍यता वर्तविली होती ही बाब हल्ल्यानंतर आत्मपरीक्षण करणाऱ्या सुरक्षायंत्रणांना जाणवली. गुप्तचर खात्याच्या या "इनपुट'वर वेळीच दखल घेतली गेली असती; तर हा हल्ला टळला असता असे आता जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे. गुप्तचर खात्याकडून आलेल्या एका "इनपुट'नंतर अतिरेकी हल्ल्यात क्षतीग्रस्त झालेल्या हॉटेल ताजच्या व्यवस्थापनाला अशा प्रकारच्या हल्ल्याच्या शक्‍यतेची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती, मात्र काही दिवसांतच या सूचनेवर म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. अतिरेकी हल्ल्याच्या शक्‍यतेच्या माहितीकडे डोळेझाक करण्याचा मोठा फटका सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर खात्याला या घटनेनंतर बसला. या दोन्ही विभागांत असलेल्या त्रुटी केंद्र सरकारनेही मान्य केल्या आहेत. शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत आलेले गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पहिल्याच मुंबई भेटीत त्यांनी या दोन्ही खात्यांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतर गुप्तचर यंत्रणांतील कमतरतेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा, गुप्तचर खाते आणि सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर अग्रक्रम देण्याचा सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने केंद्र तसेच राज्य सरकारने तातडीने यासंबंधी पावले उचलायला सुरुवातही केली असून, राज्य सरकारने गुप्तचर खात्यात अधिकारीपदांच्या थेट भरतीला सुरुवातही केली आहे. केंद्राने तर आपत्कालीन स्थितीत दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी मुंबईसारख्या महानगरांत राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे कायमस्वरूपी तळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एजीच्या तळाला जागा देण्यासाठी राज्य सरकार जागा देणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर "फोर्सवन' नावाचे स्वतंत्र कमांडो पथक स्थापन करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. साडेतीनशे कमांडोंच्या या पथकाचा तळ मुंबईतील विमानतळानजीक ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचू शकेल. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत तो कार्यान्वित करण्यावर सरकारचे लक्ष आहे. याशिवाय आणखी दीडशे पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी तसेच अत्याधुनिक शस्त्रसाठा, उपकरणे, वाहने, सागरी सुरक्षेसाठीच्या बोटींची खरेदी यांच्यासाठी 90 कोटी रुपयांहून अधिक निधी राज्य सरकार खर्च करीत आहे. जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याशिवाय काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकणे कठीण असल्याने सर्वप्रथम त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या विषयांवर सर्वाधिक लक्ष दोन्ही सरकारांनी द्यायला सुरुवात केली आहे.
एकंदरीतच मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर समान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करण्याची चर्चा प्रामुख्याने होत असली तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकार किती गंभीर आहे, याकडे सामान्यांचे लक्ष अधिक आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी 93 च्या बॉम्बस्फोटानंतरही योजना आखण्यात आल्या होत्या, मात्र त्यातील कित्येक योजना कागदावरच राहिल्याने मुंबईवर 26 नोव्हेंबरला हल्ला करणे अतिरेक्‍यांना शक्‍य झाले. या अनुभवांतून बऱ्यापैकी शहाणे झालेले सरकार सुरक्षिततेविषयीच्या सर्व योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी आता बाळगायला हरकत नाही.

दिलेली आश्‍वासने अन्‌ पाळलेले वायदे

अतिरेकी हल्ल्यानंतर राज्य सरकारने शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिलेली मदतीची आश्‍वासने व त्यांची झालेली पूर्तता
पुढीलप्रमाणे ः-

1) 25 लाख रुपयांची आर्थिक मदत - सर्व शहिदांना आर्थिक मदत दिल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा.
2) कर्मचारी व अधिकारी यांच्या श्रेणीप्रमाणे 600 ते 1000 चौरस फुटांचे घर - घरे देण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू.
3) निवृत्तीपर्यंतचे पूर्ण वेतन - मासिक वेतन देण्याची प्रक्रिया सुरू. शहीद अधिकारी- कर्मचारी निवृत्त होण्याच्या तारखेपासून त्यांना निवृत्तिवेतन देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
4) कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - अद्यापपर्यंत कोणत्याही शहिदाच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी दिलेली नाही; मात्र सारस्वत बॅंकेने पाच शहिदांच्या वारसांना नोकरी दिली.

सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी सरकारने दिलेली आश्‍वासने पुढीलप्रमाणे ः-

1) पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देणार.
(आजवरचा खर्च - 941 कोटी)
2) राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर राज्याच्या सुरक्षिततेसाठी "फोर्स वन' कमांडो पथकाची स्थापना करणार.
3) "फोर्स वन'साठी स्वतंत्र हेलिकॉप्टर, 36 अत्याधुनिक बोटींची खरेदी करणार. त्यापैकी 12 बोटी पोलिस दलात तातडीने रुजू होणार.
4) एमपी-5 एमपी-15 सारख्या अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी करणार.
5) राज्य गुप्तचर विभागाच्या सक्षमीकरणासाठी 85 अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणार.
6) पुणे येथे इंटेलिजन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करणार.
7) सागरी सुरक्षा सक्षम करण्यावर प्रामुख्याने भर.
8) दहशती कृत्यांचा प्रभावी व परिणामकारक तपास करण्यासाठी नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (एनएसए) ची स्थापना करणार.
9) जखमींना सरकारकडून पुरेपूर आर्थिक सहकार्य. विमा कंपन्यांनी जखमी व मृतांच्या विम्याचे परतावे 31 डिसेंबरपर्यंत देण्याचे निर्देश.


आश्‍वासनानंतर सरकारने पाळलेले वायदे


1) पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 90 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता.
2) राज्य सुरक्षा दल (फोर्स वन) साठी अद्ययावत शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा व साधनसामग्रीकरिता 16 कोटी 7 लाख रुपये (खरेदी प्रक्रिया सुरू)
3) 12 वेगवान बोटींसाठी 48 कोटी रुपयांचा निधी, हेलिकॉप्टरबाबत निर्णय नाही. बोटींची खरेदी प्रक्रिया सुरू होणार.
4) मुंबई पोलिस दलासाठी आवश्‍यक साधनसामग्री व सुरक्षिततेच्या उपकरणांसाठी 36 कोटी 63 लाख 30 हजार रुपयांचा निधी (खरेदी प्रक्रिया सुरू)
5) गुप्तवार्ता विभागात 85 पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात.
6) राज्य गुप्तवार्ता विभागात सायबर मॉनिटरिंग सेल व सायबर कनेक्‍टिविटी सेल सुरू होणार.
7) सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी 18 ट्रॉलर्स (प्रक्रिया सुरू), सागरी सीमा सुरक्षा दलाकरिता 24 वेगवान बोटी मागविण्यात आल्या. 2011 पर्यंत 109 बोटी मिळणार.
8) दहशतवादी कृत्यांचा तपास करण्यासाठी "एनआयए'ची स्थापना, केंद्राकडून विधेयकाला मान्यता.
9) जखमींना आर्थिक मदत व उपचार देण्याची प्रक्रिया सुरू. पोलिस खात्यातील जखमींना तीन लाखांपर्यंतची मदत देण्याची तरतूद असताना त्यांची 50 हजारांवर बोळवण.
------------------