Tuesday, March 17, 2009

कॉंग्रेसनेते केशवराव भोसलेंचा स्वतःच्याच मुलांवर गोळीबार

मालमत्तेचा वाद ः एकाचा मृत्यू; दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

पहिल्या पत्नीच्या दोघा मुलांसोबत मालमत्तेच्या विभागणीवरून झालेल्या वादात कॉंग्रेसचे नेते केशवराव भोसले आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी परस्परांवर रिव्हॉल्व्हर आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक मुलगा ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी मलबार हिल येथे घडली. या वेळी तलवार हल्ल्यात जखमी झालेले भोसले आणि गोळ्या लागलेला एक मुलगा या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या पत्नीच्या श्राद्धाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे भोसले यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाळकेश्‍वर येथील बाणगंगा परिसरात असलेल्या "पार्श्‍व' अपार्टमेंटमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केशवराव यांच्या पहिल्या पत्नीच्या आज असलेल्या वर्षश्राद्धासाठी त्यांची दोन मुले राजेश (28) आणि गणेश (30) हे उपस्थित होते. श्राद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर केशवराव त्यांच्या दोघा मुलांसोबत बसले होते. या वेळी मालमत्तेच्या विभागणीवरून बाप-लेकांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान काही क्षणातच हाणामारीत होऊन मुलांनी भोसले यांना मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी एकाने घरात असलेल्या तलवारीने भोसले यांच्यावर वार केला. त्यानंतर रागाच्या भरात भोसले यांनी स्वतःकडील रिव्हॉल्व्हर काढून गणेश आणि राजेशच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. दोन गोळ्या गणेशच्या छातीत आणि डोक्‍यात शिरल्या, तर राजेशच्या पोटात आणि गालाला गोळ्या लागल्या. "पार्श्‍व' इमारतीत पहिल्या व सहाव्या मजल्यावर त्यांचे एकूण तीन फ्लॅट आहेत. येथील एका बंद खोलीत घडलेली ही घटना इमारतीतील रहिवाशांना कळण्यास फारसा वेळ लागला नाही. जखमी अवस्थेतील तिघांनाही नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. गोळ्या लागलेल्या गणेशचा सेंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर जखमी राजेशवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांच्या तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या केशव भोसलेंवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसले यांच्या उजव्या हातावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. भोसले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. भोसले यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा परवाना खेड येथून मिळविलेला असून, पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खेड येथून 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविलेले भोसले मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. 1984 मध्ये राजभवन परिसरात झालेल्या एका तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या भोसले यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेलेले भोसले गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला सारले गेले होते. काही वर्षांपूर्वी भोसले यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही मुलांची लग्ने महालक्ष्मी रेसकोर्सवर थाटामाटात केली होती. आज त्यांनी याच मुलांवर मालमत्तेच्या वादातून गोळीबार केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी दिली.

(sakal,6 march)

गुन्हेगारीचे बदलते चित्र मन हेलावणारे

राकेश मारिया : पोलिसांसोबत नागरिकांचा पुढाकार गरजेचा

बाबरी मशिदीच्या पतनानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डला धार्मिक रेषेने विभागले. यापूर्वी घातपाती कारवायांकरिता अशिक्षित आणि गरजूंचा वापर केला जात असे; मात्र इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना अटक केल्यानंतर या कारवायांसाठी उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील तरुणांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेगारीविश्‍वाचे हे बदलते चित्र मन हेलावणारे असून, शांतता प्रस्थापित होण्यासाठी आता पोलिसांसोबत नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्‍यक झाल्याचे मत गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केले.

"प्रेस क्‍लब ऑफ मुंबई'च्या वतीने "मुंबईतील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राकेश मारिया बोलत होते. गेल्या दोन दशकांपासून मुंबई दहशतवाद्यांचे मुख्य टार्गेट झाले आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर झालेला हल्ला सर्वसामान्यांच्या विचारापलीकडचा आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी जगतात झालेल्या बदलांमुळे गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांसमोरही बरीच आव्हाने निर्माण होत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले.
...............
रामपुरी ते एके-47
1960 पासून रामपुरी चाकूने सुरू झालेला मुंबईतील गुन्हेगारीचा अध्याय आता एके-47 पर्यंत पोहोचल्याचे विशद करताना हाजी मस्तान, करीम लाला, युसूफ पटेल यांच्या गुन्हेगारी टोळ्यांची माहितीही त्यांनी दिली. 22 व 23 नोव्हेंबर 1969 च्या मध्यरात्री पहिल्यांदा गुन्हेगारी विश्‍वात रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला. त्या वेळी दारू, वेश्‍याव्यवसाय, मटका यांसारख्या व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी दादागिरी सुरू असायची. यानंतरचा काळ वरदराजन, दाऊद, शरद शेट्टी, बडा राजन, करीम लाला यांसारख्या गुन्हेगारांनी गाजविला. 1990 मध्ये मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी खंडण्या उकळायला सुरुवात केली. 1992 नंतर मात्र गुन्हेगारीचे स्वरूप पुरते बदलून गेल्याचे मारिया यांनी सांगितले.
..............
धार्मिक दुही
6 डिसेंबर 1992 ला झालेले बाबरी मशिदीचे पतन आणि त्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डचे धार्मिक दुहीत विभाजन केले. मार्च 93 ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर मुंबईवर दहशतवादी कारवायांना सुरुवात झाली. या कारवायांसाठी सीमेपलीकडे बसलेल्या घातपाती शक्तींनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचाच वापर केला. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी आणि दहशतवादी घडामोडींत आमूलाग्र बदल झाले. आता अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये खबऱ्यांची संख्याही कमी झाल्यामुळे अनेकदा पोलिसांना पक्की माहिती मिळत नसल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

(sakal,5 march)

भारतीय नौदलाचा "सिंदबाद' जगप्रवासाला

लाटांवर स्वार ः 15 ऑगस्टपासून समुद्र सफरीला प्रारंभ

भारतात तयार करण्यात आलेल्या बोटीतून खवळलेल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होत पृथ्विप्रदक्षिणा करण्यासाठी भारतीय नौदलाचा एक अधिकारी सज्ज झाला आहे. गोव्याहून मुंबईतील नौदलाच्या पश्‍चिम विभागीय नौदल तळावर पोचलेला दीपक दोंदे हा नौदल अधिकारी आवश्‍यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर येत्या 15 ऑगस्टपासून मुंबईतूनच जगप्रवासाला निघणार आहे.

भारतीय नौदलाच्या "सागर परिक्रमा' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर सागरी मार्गाने एकट्याने प्रवास करणारा दीपक दोंदे पहिला भारतीय नौदल अधिकारी ठरणार आहे. तीन वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पासाठी गोवा येथे "म्हादाई' ही बोट बनवून आज याच बोटीने दीपक दोंदे मुंबईत पोचले. नौदलाचे पश्‍चिम विभागीय प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी एका कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा केली. मुंबईत असलेल्या नौदल तळावर दोंदे प्रवासाकरिता आवश्‍यक असलेले प्रशिक्षण घेणार आहेत. नऊ महिन्यांच्या या प्रवासात दोंदे ऑस्ट्रेलियाच्या फ्रेमेन्टस, न्यूझीलंडच्या ख्रिस्तचर्च, दक्षिण अमेरिकेत पोर्ट सॅटन्ली आणि दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन या चार ठिकाणी थांबणार आहेत. या प्रवासात खाण्याचे साहित्य, प्रथमोपचारसासाठी आवश्‍यक ती औषधे, आपत्कालीन वेळी बोटीची दुरुस्ती करण्यासाठीची उपकरणे यांच्यासह खूपशी पुस्तके नेण्याचा आपला मानस असल्याचे दोंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
सुमारे एकवीस हजार नॉटिकल मैलांच्या या जगप्रवासाच्या प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या बोटीसाठी परदेशातूनही आवश्‍यक ते साहित्य मागविण्यात आले आहे. मुंबईतील प्रशिक्षण काळात दोंदे मॉरिशस येथे बोटीने जाऊन परत मुंबईत येणार आहेत. यापूर्वी नौदलाच्या आयएनएस - तारांगिनी या बोटीसह ते अमेरिकेला गेले होती, अशी माहितीही पश्‍चिम विभागीय नौदलाचे प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी पत्रकारांना दिली. दोंदे यांच्या या प्रवासाची इत्थंभूत माहिती व्हावी, यासाठी बोटीवर कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही बेदी या वेळी म्हणाले.

(sakal,5 march)

नग्नावस्थेतील छायाचित्रांद्वारे डॉक्‍टर तरुणीला ब्लॅकमेलिंग

सायबर क्राईम ः आयटी तंत्रज्ञाला पुण्यातून अटक

इंटरनेटवर ओळख झालेल्या मुंबईतील डॉक्‍टर तरुणीला लग्नाच्या आमिषाने पुण्यात बोलाविल्यानंतर तिला मद्यातून गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेत तिची छायाचित्रे काढणाऱ्या बड्या आयटी कंपनीच्या सहायक उपाध्यक्षाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. समीर परीजा (40) असे या तंत्रज्ञाचे नाव आहे.

नोकरीसाठी पुण्यात वास्तव्याला असलेल्या समीर परीजा याला वार्षिक साडेसतरा लाख रुपये पगार होता. आर्थिक मंदीमुळे दीड महिन्यापूर्वी त्याला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. इंटरनेटवर चॅटिंग करताना मुंबईतील एका एमबीबीएस डॉक्‍टरशी त्याची ओळख झाली. या तरुणीशी राज नावाने चॅटिंग करणाऱ्या समीरने तिला लग्नाची मागणी घालत तिचे अर्धनग्न छायाचित्र इमेलवर पाठविण्यास सांगितले. फक्त चॅटिंगवरून झालेल्या ओळखीमुळे सुरवातीला तिने स्वतःऐवजी एका मॉडेलचे अर्धनग्न छायाचित्र त्याला पाठविले. आपल्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुण्यात भेटायला त्याने बोलावले. एप्रिल 2008 मध्ये ही तरुणी राजची सर्व माहिती घेण्यासाठी समीरला भेटायला पुण्यात गेली. पुण्यात एका प्रसिद्ध तारांकित हॉटेलमध्ये दोघेही एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. या वेळी त्याने डॉक्‍टर तरुणीच्या मद्यात गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध केले. यानंतर त्याने तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून समीर या तरुणीला या छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करीत होता. अखेर या तरुणीने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी समीर याला बंगळुरू येथून अटक केली. समीरचे दहा वर्षांपूर्वीच लग्न झाले असले, तरी त्याने यापूर्वी अशा प्रकारे अनेक तरुणींना फसविल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले

(sakal,3 march)

पोलिस महासंचालकाचे नाव आज जाहीर होणार

जयंत पाटील : रॉय यांचे नावही चर्चेत

राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालकांच्या नावाची घोषणा उद्या (ता. 4) करण्यात येणार आहे. या पदाकरिता गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असले, तरी विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांचेदेखील नाव चर्चेत असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. खुद्द गृहमंत्री जयंत पाटील यांनीही या पदासाठी उद्या घोषणा करणार असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.
तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्य सरकारने अनामी रॉय यांची गेल्या वर्षी पोलिस महासंचालकपदावर निवड केली. उच्च न्यायालयाने ही निवड बेकायदा ठरवीत या पदावर नव्या अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली. या आदेशानंतर सरकारकडून पुढील निर्णय होईपर्यंत राज्याचे विद्यमान पोलिस महासंचालक दीर्घ रजेवर गेले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या पदावर तातडीने नियुक्ती होणे आवश्‍यक असल्याचे लक्षात घेता या पदावर नवीन अधिकाऱ्याची उद्या घोषणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन पोलिस महासंचालक पदासाठी रॉय यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात या पदाकरिता फक्त गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क आणि विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांच्यातच स्पर्धा असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले

(sakal,3 march)

सुरक्षित मुंबईसाठी "जागृत मुंबईकर' मोहिमेला सुरुवात

गुन्हेगारीबाबत प्रबोधन : पोलिस, अग्निशमन दल, युरोका फोर्ब्सचा उपक्रम

"ये सरकार का प्रॉब्लेम है.. मेरे घर को तो कोई छू भी नही सकता..! ' सामान्य नागरिकांच्या डोळ्यात त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी जळजळीत अंजन घालणारी ही जाहिरात वाहिनीवर नेहमीच झळकताना दिसते. स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी बेफिकीर असणाऱ्या सामान्य नागरिकांना शहरातील वाढती गुन्हेगारी आणि घातपातांच्या घटनांची जाणीव करून त्या रोखण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या "जागृत मुंबईकर' या उपक्रमाची आज सुरुवात झाली. मुंबई पोलिस, अग्निशमन दल आणि युरेका फोर्ब्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात युरेका फोर्ब्सचे सात हजार कर्मचारी (युरोचॅम्प) मुंबईकरांना सुरक्षिततेचे धडे देणार आहेत.

स्वतःच्या घराबाहेर घडणारे गुन्हे, अतिरेकी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, आगीसारख्या घटनांबाबत सामान्य नागरिक उदासीन असतात. हा प्रकार स्वतःबाबत झाल्यावर त्यांचे गांभीर्य लक्षात येते. या घटनांबाबत नागरिकांमध्ये दक्षता निर्माण होण्यासाठी युरेका फोर्ब्सचे "युरोचॅम्प' मुंबईतील किमान शंभर घरे असलेल्या प्रत्येक सोसायटीत पोचणार आहेत. या सोसायट्यात तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या असामाजिक घटना रोखण्यासंबंधी मार्गदर्शन करतील. "निश्‍चितपणे सुरक्षित राहा' असे घोषवाक्‍य घेऊन मुंबईकरांना त्यांच्या सुरक्षिततेचे धडे देणाऱ्या या युरोचॅम्पसोबत अनेकदा मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान असतील. घरात नोकर ठेवताना घ्यायच्या दक्षता; तसेच रस्त्यावर फिरताना कान आणि डोळे उघडे ठेवून एखाद्या घातपाती कारवाईला आळा कशा प्रकारे घालावा यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाईल. पोलिस आयुक्त हसन गफूर, अग्निशमन दलाचे प्रमुख पी. डी. करगोप्पीकर व युरेका फोर्ब्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एल. गोकलानी यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून सामान्य नागरिकांपर्यंत सुरक्षिततेचा संदेश दिला जाणार आहे. अनेकदा दैनंदिन गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांना प्रबोधन करणे गरजेचे असते. युरेका फोर्ब्सच्या माध्यमातून हा प्रयत्न पूर्ण होईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी व्यक्त केला.आयपीएल'साठी कडक


---------


मुंबईतील क्रिकेटपटूंची सुरक्षितता वाढविणार

कराची येथे श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांकरिता येणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेसंबंधी अधिक कडक उपाययोजना करण्यात येतील. याशिवाय मुंबईत राहणाऱ्या क्रिकेटपटूंच्या संरक्षणात आवश्‍यकता भासल्यास वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली.
मुंबईत होणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच प्रचंड गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेच्या वेळी हजारहून अधिक गणवेशधारी पोलिस मैदानात तैनात केले होते. साध्या वेशातील पोलिस प्रेक्षकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी नेमले होते. क्‍लोज सर्किट टीव्हीच्या मदतीने मैदान आणि परिसरातील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांचे लक्ष होते. या प्रकारच्या अत्युच्च दर्जाची सुरक्षितता मुंबईत होणाऱ्या आयपीएलच नव्हे, तर अन्य आंतरराष्ट्रीय आणि प्रचंड गर्दी असणाऱ्या स्पर्धांकरिता दिली जाणार असल्याचे गफूर यांनी सांगितले.

कसाबचे संरक्षण

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस दलाच्या पोलिसांना त्याच्या सुरक्षिततेसाठी पाचारण केले जाणार आहे. पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत कसाबच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आवश्‍यक ती खबरदारी घेत असल्याचे सांगितले. कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात हलविण्यापूर्वीच येथील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचेही गफूर या वेळी म्हणाले.


(sakal,3 march)

खंदकांचे जड झाले ओझे...

कमी पोलिस बळ ः खंदक झाले सायकलींचे स्टॅण्ड


मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यांसारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत; तसेच अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून मुंबई व ठाणे शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या खंदकांत पोलिसच तैनात नसल्याने हे खंदक आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ आणि रेल्वेस्थानकांवर असलेल्या या खंदकांमुळे नागरिकांना साधे चालणेही शक्‍य होत नाही.

सागरी मार्गाने आलेल्या "लष्कर-ए-तैयबा'च्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत थैमान घातले होते. तीन दिवस चाललेल्या अतिरेक्‍यांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांत आत्मविश्‍वास निर्माण व्हावा; तसेच अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या वेळी तातडीने कारवाई करणे शक्‍य व्हावे, यासाठी मुंबई शहरात 400 ठिकाणी कायमस्वरूपी खंदक उभारण्यात आले आहेत. या खंदकांमध्ये दिवसरात्र शस्त्रधारी पोलिस तैनात करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन पोलिसांनी दिले होते. मुंबईतील हल्ल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रेल्वेस्थानके, विमानतळ, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे यांच्यासह शहरात असलेल्या संवेदनशील ठिकाणी रेतीने भरलेल्या गोण्यांच्या साह्याने उभारण्यात आलेल्या या खंदकांमध्ये शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले; मात्र काही दिवसांतच बहुतांश ठिकाणी असलेल्या खंदकांत पोलिसांनी उभे राहणेच बंद केले आहे. खंदकांमध्ये पोलिसांनी थांबणे बंद केल्यामुळे काही ठिकाणी खंदकांची दुरवस्था झाली आहे. या खंदकांसाठी वापरलेल्या गोणी रस्त्यात अस्ताव्यस्त पडल्या आहेत. काही ठिकाणी या खंदकांचा उपयोग सायकली उभ्या करण्यासाठी होताना दिसतो. एका खंदकासाठी दिवस आणि रात्रपाळी असे मिळून प्रत्येकी आठ पोलिस ठेवण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना किमान चार शस्त्रधारी पोलिस या खंदकांमध्ये कायमस्वरूपी दिसत असत. डोळ्यांत तेल घालून मुंबईत पहारा करणारे हे पोलिस पाहून नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती; शिवाय गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांनाही या पोलिसांचा धाक निर्माण झाला होता. मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत निर्माण झालेली भीती ओसरल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असलेल्या या खंदकांत पोलिस तैनात करणे बंद करण्यात आल्याचे समजते. न
ागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध आहोत; मात्र शहरातील संवेदनशील ठिकाणी उभारण्यात आलेल्या या खंदकांत दिवसरात्र पोलिस तैनात करणे कमी मनुष्यबळामुळे शक्‍य होत नसल्याचे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-------

मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत असलेली भीती दूर करण्यासाठी हे खंदक उभारण्यात आले; त्यात आता 24 तास पोलिस उभे राहण्याची आवश्‍यकताही नाही. घातपाती कारवाया करणाऱ्यांसोबत मुकाबला करताना खंदक बांधणे शक्‍य होत नाही. अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांना तातडीने "पोजिशन' घेता यावी यासाठी संवेदनशील ठिकाणी हे खंदक उभारण्यात आले आहेत. तसेच अल्प मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे चार हजार नवीन पदे भरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- विजयसिंग जाधव (पोलिस उपायुक्त, मुख्यालय)

(sakal,2 march)