Monday, January 4, 2010

विश्‍वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार


निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर



मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.

चेंबूरच्या एका खासगी क्‍लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव याच्यासोबत राजन टोळीचे सराईत गुंडही उपस्थित होते. छोटा राजन टोळीचा खास हस्तक तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मुंबई पोलिस दलात विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करणारे विश्‍वास साळवे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश वाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुळशीदास काकड, ठाणे येथील एक पोलिस निरीक्षक खळतकर आणि एक पोलिस शिपाई साळुंखे अशा पाच पोलिसांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. गेली तेरा वर्षे खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगल्यानंतर तब्बल 30 गुन्ह्यांतून मुक्त झालेल्या डी. के. राव याच्यासोबत पार्टीला राजन टोळीचा सराईत गुंड फरीद तनाशा, सुनील पोतदार यांनीही हजेरी लावली होती. गुंडांसोबत झालेल्या या पार्टीला पोलिसांची उपस्थिती क्‍लबमध्ये बसविण्यात आलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेऱ्याने टिपली. पहाटेपर्यंत गुंडांच्या हजेरीत पाहुणचार घेणाऱ्या या पोलिसांच्या चौकशीचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल दिले होते. या पार्टीचे व्हिडीओ क्‍लिप्स, छायाचित्रे व्यक्तिशः पाहिल्यानंतर या पाचही जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. या पोलिसांची चौकशी होईपर्यंत या पोलिसांना निलंबित ठेवण्यात यावे, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या सर्व पोलिसांविरुद्ध सबळ पुरावे असल्यानेच शिवानंदन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य उपस्थितांचे जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात येणार असून त्यांना साक्षीदार बनविले जाणार असल्याचेही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, चेंबूरच्या जिमखान्यात झालेल्या त्या पार्टीला मी उपस्थितच नव्हतो. माझा त्या पार्टीशी आणि त्यातील लोकांशी कसलाच संबंध नाही. मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. यासंबंधी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास साळवे यांनी सांगितले. तर, आपण त्या जिमखान्याचे सदस्य आहोत. तेथे आपण पत्नीसोबत जेवण घेण्यास गेलो होतो. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेले वृत्त हे आपल्याविरुद्धचे षड्‌यंत्र असल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्त प्रकाश वाणी यांनी केला आहे.

(sakal,3rd january)

नववर्षाच्या स्वागतात थिरकली मुंबई!

"थर्टी फर्स्ट'चे जमके सेलिब्रेशन

ंमुंबई ः नववर्षाचे स्वागत अवघ्या मुंबईने मोठ्या जल्लोषात केले. "मद्य'रात्रीच्या नशेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सरकारनेही पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यशाला सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तळीरामांची चांगलीच सोय झाली. छोटीमोठी हॉटेल्स, बार आणि ढाबेही खचाखच भरून गेले होते. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदागणिक मध्यरात्रीकडे जसा सरकरत होता तशी तरुणाई बेभान होत होती. डीजे-म्युझिक सिस्टीम्सच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होती. पर्यटकांच्या फेव्हरीट गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा या परिसरांत अवघ्या मुंबापुरीचा आनंद ओसंडून वाहत होता. पंचतारांकित हॉटेलांतील "हाय प्रोफाईल' सेलिब्रेशनही चांगलेच रंगले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या "न्यू ईयर सेलिब्रेशन'वर दुःखाची किनार होती. यंदा मात्र मुंबईकरांनी जमके सेलिब्रेशन केले. मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्याने गुलाबी थंडीतला "थर्टी फर्स्ट' सोहळा जल्लोष, रोषणाई, आतषबाजी आणि पार्ट्यांच्या माहोलात निर्विघ्नपणे पार पडला.
मोठमोठ्या हॉटेलांपासून रस्त्यावरील गल्लोगल्ल्यांमध्ये जल्लोषाची धुंदी होती. रंगीबेरंगी कपड्यांतील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष काही औरच होता. घड्याळाचा काटा बाराच्या जवळ येत होता तस तसे उत्साहाला उधाण येत होते. बारा वाजायला अवघे एक मिनीट शिल्लक असताना तरुणाईने आनंदाने काऊंटडाऊनला सुरुवात केली. चार... तीन... दोन आणि "हॅप्पी न्यू इअर' असे म्हणताच सगळ्यांनीच "चिअर्स' केले. प्रत्येकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशात फटांक्‍यांची आतषबाजी झाली. "बाय बाय 2009' असा संदेश असलेले असंख्य फुगे सोडण्यात आले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना आलिंगन देत असतानाच, फटाक्‍यांचा कडकडाट, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजराने पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या नववर्ष स्वागताने अवघी मुंबापुरी सुखावली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या वर्षी नववर्ष स्वागताचे कार्यक्रमच रद्द झाले होते. यंदा आनंदाची बेसुमार उधळण करीत गेल्या वर्षीची कसरही मुंबईकरांनी पुरती भरून काढली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर यंदा मोठ्या संख्येने बाहेर पडणार याची कल्पना असल्याने मोठमोठे हॉटेल्स, बार, रिसॉर्ट आणि पब्समध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. "थर्टी फर्स्ट' पार्ट्यांत ग्रुपसोबत सामील व्हायचे असल्याने खासगी कंपन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापली कामे उरकून सायंकाळपासूनच पार्ट्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
मोठमोठी हॉटेल्स आणि पब्समध्ये डिक्‍सथेकच्या तालावर तरुणाईने अक्षरशः बेधुंद होत नववर्षाचे स्वागत केले. गेल्या वर्षी अतिरेकी हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या कुलाब्याच्या "लिओपोल्ड कॅफे'तही हा उत्साह ओसंडून वाहत होता.
पूर्व उपनगरांतही थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची कसलीच वानवा नव्हती. काही ठिकाणी सोसायट्या आणि वसाहतींतच नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत धमाल केली जात होत होती. "थर्टी फर्स्ट'ला गुरुवार आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत नववर्षाचे साधेपणाने जंगी स्वागत केले. बार वा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा अनेकांनी घरीच नववर्ष स्वागताचा बेत केला होता. मित्रमंडळींसह घरीच पार्टी साजरी करीत शहराच्या रस्त्यांवर उशिरापर्यंत मनमोकळे फिरत अनेकांनी "2010'चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. आगामी वर्ष सुखसमृद्धीचे असेल, अशी आशा मनात ठेवत पहाटेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरूच होते.


"थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'
वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे अतिशय चांगल्या प्रकारे नियमन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती. अतिशय कडाक्‍याच्या थंडीत "थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'ची आठवण असलेला सामान्य पोलिस सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार सायंकाळपासूनच ठिकठिकाणी तैनात होता. नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत यापूर्वी मुलींच्या छेडखानीच्या घडलेल्या प्रकारांमुळे मुंबईला शरमेने मान खाली घालावी लागल्याचे प्रकार घडले होते. यंदा असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाइंट आणि मरीन ड्राईव्हपासून गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू व अक्‍सा अशा सर्वच चौपाट्यांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीही पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी दिसणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांचा वचक गर्दीत वावरणाऱ्या काही मद्यधुंद तरुणांत होता. गर्दीत संशयास्पद वावरणाऱ्यांना ताब्यात घेणे तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची पोलिसांची मोहीम बुधवार रात्रीपासूनच सुरू झाली होती. महिला वाहनचालकांचीही कसून तपासणी केली जात होती. "ब्रेथ ऍनालायजर'च्या साहाय्याने मद्यधुंद वाहनचालकांचा वाहतूक पोलिस शोध घेत होते. प्रसंगी नुसत्या वासानेच "तळीरामां'ना गाडीबाहेर काढले जात होते.


(sakal,2nd january)

720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई

पाच हजार जणांनी मोडले वाहतुकीचे नियम

मुंबई, ता. 1 ः नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर मद्याचे प्याले रिचवून वाहने चालविणाऱ्या 720 तळीरामांवर; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आजवर अवघ्या एका रात्रीत वाहनचालकांवर झालेल्या कारवाईचा हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी नववर्ष स्वागताच्या रात्री 544 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

नववर्ष स्वागताच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काल रात्री शहरात ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्‍यांसह आडवाटांवरूनही मद्यपी वाहनचालक हातून सुटून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तयारीत होते. रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींविरुद्ध सुरू झालेल्या या मोहिमेत 720 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा धाक राहावा यासाठी काही ठिकाणी "स्पीड चेकगन' हातात घेऊन कारवाईसाठी सज्ज असलेल्या पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी असलेल्या उपस्थितीमुळे यावर्षी नववर्ष स्वागताच्या दिवशी शहरात अपघाताची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही बर्वे यांनी सांगितले.

कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी 170 वाहनचालकांच्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला. त्यापैकी 141 वाहनचालकांना एक ते दहा दिवसांपर्यंत साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, तर एका वाहनचालकाला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुनावणीला अनुपस्थित असलेल्या 28 जणांवर न्यायालयाने वॉरंट बजावले. कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांपैकी दोघांना पोलिसांनी दुसऱ्यांदा पकडले. त्यातील एकाला दोन दिवसांची साधी कैद आणि सहा महिन्यांकरिता वाहतूक परवाना निलंबित करण्याची, तर दुसऱ्याला तीन हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने परवाना निलंबित करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आज सुनावणी झालेल्या वाहनचालकांपैकी 157 जणांचा परवाना सहा महिन्यांकरिता, तर तीन जणांचा परवाना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

यंदा गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, जुहू, वर्सोवा येतील समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी मुंबईकरांची उसळणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. पहाटे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची वाहनचालकांविरुद्धची ही मोहीम सुरू होती. यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या नसल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त बर्वे यांनी सांगितले.

(sakal, 1st january)

बुलेटप्रूफ जॅकेटच्या गहाळ फाईलचे भूत घालणार धुमाकूळ


आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस


मुंबई, ता. 31 ः पोलिस आयुक्त कार्यालयातून गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीच्या फाईलचे भूत नव्या वर्षातही पोलिस दलातील आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. या जॅकेट खरेदीचा व्यवहार झाल्याच्या 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त, तसेच मुख्यालयाचे उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ अधिकाऱ्यांना ही फाईल जपून न ठेवल्याप्रकरणी गृह खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक, तसेच सहपोलिस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट गहाळ झाले होते. पोलिसांना देण्यात आलेले हे जॅकेट निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते गहाळ करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांना पुरविण्यात आलेल्या या बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारात या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी व्यवहाराच्या फाईलची मागणी करण्यात आली होती; मात्र ही फाईल गहाळ झाल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या संशयाला बळकटी आली होती. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रशासन विभागातून गहाळ झालेली ही फाईल गेल्या आठवड्यात आश्‍चर्यकारकरीत्या सापडली. अर्धवट व अस्ताव्यस्त अवस्थेत सापडलेल्या या फाईलमधील अनेक महत्त्वपूर्ण पाने बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयातून 2008 मध्ये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात ही फाईल असणे अपेक्षित होते, त्या तिघांची चौकशी करून, त्यासंबंधीचा अहवाल गृह खात्याला पाठविण्यात आला. गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी या अहवालावर कारवाई करीत असतानाच 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त व मुख्यालय-1 चे पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. 2002 मध्ये या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने तेव्हापासून आजपर्यंत या पदांवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडून गहाळ झालेल्या या फाईलबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या नोटिशीबाबत 2 जानेवारीपर्यंत या अध
िकाऱ्यांनी आपली उत्तरे द्यायची आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीची फाईल हाताळण्याबाबत केलेल्या हलगर्जीपणाबाबत आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशा आशयाची ही नोटीस असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी दिली. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव व 2003-05 या काळात सहपोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहणारे प्रेमकृष्ण जैन, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुभाष आवटे (2005-07), विद्यमान सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांचा समावेश आहे. मुख्यालयाचे विद्यमान पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांच्यासह पाच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांतून सहपोलिस आयुक्तपदी असलेले व पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले माजी आयपीएस अधिकारी धनंजय जाधव (2001-02), कायदा व सुव्यवस्था विभागाचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व सध्या दीर्घ रजेवर असलेले संजीव दयाळ (2002-03) यांना आश्‍चर्यकारकपणे वगळण्यात आले आहे. जाधव निवृत्त झाल्यामुळे; तर दयाळ प्रदीर्घ रजेवर असल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अय्यंगार यांनी दिले.


(sakal,1st january)