Thursday, July 24, 2008

पोलीस घरे

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.24 ः पोलिस वसाहतींतील लहान आणि अपूर्ण खोल्यांत सेवाकाळातील अर्ध्याहून अधिक काळ घलविणाऱ्या 620 पोलिस कर्मचाऱ्यांना शीवच्या प्रतिक्षानगर येथे म्हाडाच्या माध्यमातून मालकी हक्कांची घरे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजूरी न मिळाल्याने दोन वर्षांपासून तसाच पडून आहे.साध्या पोलिस शिपायापासून सहाय्यक पोलिस आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांना घरे देण्याच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची अद्याप सही न झाल्याने घरे वापराशिवाय पडून आहेत.
मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी म्हाडाने शीव येथील प्रतिक्षानगर परीसरात बांधलेली घरे घेण्याचा निर्णय पोलिस गृहनिर्माण विभागाच्या 28 डिसेंबर 2005 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.प्रत्येकी 475 चौरस फुट क्षेत्रफळांची ही घरे घेण्यासाठी पोलिसांना स्टेट बॅंक ऑफ इंडिया 7.25 टक्के दराने अर्थसहाय्य द्यायला तयार होती.पोलिसांना ही घरे देण्यासाठी म्हाडाच्या 31 जानेवारी 2006 रोजी झालेल्या बैठकीत 6145 क्रमांकाच्या ठरावाने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या घरांसाठी 1750 रूपये प्रति चौरस फुटांचा दर ठेवण्यात आला.ही घरे खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एक हजार अर्जदारांपैकी 620 पोलिस कर्मचाऱ्यांच्या अर्जांची निवडही करण्यात आली.मात्र दोन वर्षांच्या कालावधीनंतरही ही घरे पोलिसांना देण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ही घरे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या पोलिसांपैकी काही सेवानिवृत्तही झाले आहेत.
पोलिस दलात काम करणाऱ्या 4783 अधिकाऱ्यांपैकी 2082 तर 36160 अंमलदारांपैकी 18530 अंमलदार वरळी, नायगाव, दादर , चुनाभट्टी, मरोळ येथील सरकारी निवासस्थानांत राहतात.यापैकी 1400 निवासस्थाने क्षेत्रफळाच्या मानाने लहान ,नादुरूस्त तसेच पुरेशा प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने अद्याप रिक्त आहेत.या घरांचे मासिक भाडे येथे राहणाऱ्या पोलिसांच्या पगारातून कपात करण्यात येते.
म्हाडाने प्रतिक्षानगर येथे बांधलेल्या या घरांची मालकी पोलिसांना मिळावी यासाठी वारंवार वरीष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार करण्यात येत आहे.मात्र हा प्रस्ताव अंतिम मंजूरीकरीता मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याने या पत्रव्यवहाराला सरकार पातळीवरही फारसा प्रतिसाद मिळात नसल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------------------

पोलिस वसाहतींचे नव्याने बांधण्यात येणारे प्रकल्प
- घाटकोपर गुलीस्तान कंपाऊंड - 502 घरे
- वाकोला कोले कल्याण - 1742
- सांताक्रुझ - 324
- वाडीबंदर - 150
- वरळी - 400
- मलबार हिल - 30
- घाटकोपर कामराजनगर - 992

Monday, July 14, 2008

सरन्यायाधीश यशवंतचंद्रचूड निधन

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.15 ः नरीमन पॉईंटच्या जनरल भोसले मार्गावरील समता बिल्डींग,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील बड्या व्यक्तींचा नेहमीच राबता असलेल्या या इमारतीचा नुर आज काही वेगळाच होता.या इमारतीतली वर्दळ तशी नेहमीपेक्षा जास्तच,मात्र सबंध इमारतीत शुकशुकाट.देशाचे निवृत्त सरन्यायाधिश यशवंत चंद्रचूड यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय,सामाजिक,न्यायपालिका क्षेत्रातील बड्या व्यक्ती अतिशय शोकाकूल अवस्थेत या इमारतीखाली जमल्या होत्या.
समता इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणारे माजी सरन्यायाधिश चंद्रचुड यांच्या निधनामुळे सबंध इमारतीवर शोककळा पसरली होती.चंद्रचूड यांनी निवृत्तीनंतरही समाजिक,शैक्षणिक आणि वृत्तपत्रसृष्टीशी आपले नाते कायम ठेवले.त्यामुळेच ते राहत असलेल्या घरी नेहमी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील बड्या व्यक्तींचा नेहमीच वावर असायचा.आजचा हा वावर त्यांना अखेरचे पहायला येणाऱ्यांचा होता.चंद्रचुड यांच्या पार्थिवाशेजारीच त्यांचे सुपुत्र डॉ.धनंजय उभे होते.अंत्यदर्शनानंतर त्यांच्या प्रति सहानुभुती व्यक्त करणाऱ्याचा हात धनंजय यांच्या हातात जात होता.तर कधी दुःखीत अवस्थेत अलिंगन दिले जात होते.देशाच्या सरन्यायाधिशपदी सर्वाधिक काळ राहून न्यायव्यवस्थेची सेवा करणारा तपस्वी चंद्रचुड यांच्या रूपाने आज निपचीत पडला होता.
सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव इमारतीखाली तयार केलेल्या एका चबुतऱ्यावर ठेवण्यात आले.तोपर्यंत इतस्ततः पसरलेला जनसमुदाय यशवंतरावांच्या पार्थिवाभोवती गोळा झाला.वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅशही क्षणात लकाकले.इमारतीखाली उपस्थित असलेल्या मंडळींनीही चंद्रचुड यांच्या पार्थिवावर आदरांजली वाहिली.शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने तेथे उपस्थित असलेल्या राजशिष्टाचार विभागातील पोलिसांच्या पथकाने त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळले.यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या देहाला शस्त्रसमाली देत शोक व्यक्त केला.शोक व्यक्त करणारी धून पोलिस बॅन्डवर वाजविण्यात येत होती. पोलिसांच्या या पथकातील अधिकाऱ्यांनी चंद्रचुड यांचे पार्थिव उचलून शववाहिनीत ठेवले.पुत्र डॉ.धनंजय,नातवंडे,नातेवाईक आणि मित्रमंडळी या पार्थिवासोबत होते.गाड्यांच्या ताफ्यातून निघालेली सरन्यायाधिश चंद्रचुड यांची अंत्ययात्रा पहाण्यासाठी जनरल भोसले मार्गावर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.ही अंत्ययात्रा पुढे चंदनवाडी स्मशानभूमीत नेण्यात आली.नुकतीच वयाची 88 वर्षे पुर्ण केलेल्या चंद्रचुड यांच्या वृद्धापकाळाने झालेल्या निधनाबद्दल प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता.

Friday, July 11, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.11 ः मोलकरणीने दिलेल्या माहितीवरून चोरीच्या उद्देशाने ते तीघे महागड्या कारची आयात करणाऱ्या खार येथील व्यवसायिकाच्या घरात शिरले.घरात झोपलेला व्यवसायिक आणि त्याच्या नोकराला कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण करून दोघांचेही हातपाय बांधले.या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून उशीखाली ठेवलेली चावी घेऊन त्यांनी कपाट उघडले,तेंव्हा कपाट भरून असलेल्या एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटांची बंडले पाहून त्यांचे डोळे अक्षरशः दिपले.घरातला बेडही पुर्णतः नोटांच्या बंडलांनीच भरलेला.आयुष्यात पहिल्यांदा एवढी " माया ' पाहिलेल्या या तीघा दराडेखोरांनी चोरी करून बाहेर पडताना कोणाला संशय येऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या सात पिशव्यांत मावतील एवढ्याच नोटा घेऊन तेथून पलायन केले.या दरोडेखोत्यांनी एक कोटी दहा लाख रूपयांच्या नोटा चोरल्या होत्या.व्यवसायिकाने मात्र अवघे पाच लाख रूपये चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.
गुन्हे शाखेचे पोलिस या व्यवसायिकाकडे असलेल्या बेहिशेबी नोटांसंबंधी त्याची चौकशी करीत आहेत.
खार पश्‍चिमेला असलेल्या डायगो इमारतीत अजय बजाज (49) या व्यावसायिकाच्या घरात 27 ऑक्‍टोबरला हा दरोडा पडला.यावेळी दरोडेखोरांनी बजाज आणि त्याचा नोकर हरीलाल यादव यांना चाकूच्या धाकाने बेदम मारहाण करून घरातील एक कोटी दहा लाखांची रोख चोरून नेली.मात्र बजाज यांनी घरात असलेल्या कोट्यवधी रूपयांची माहिती पोलिसांना होऊ नये यासाठी फक्त पाच लाख रूपयेच चोरीला गेल्याची तक्रार खार पोलिसांना दिली.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण वर्षा कोडेकर हिच्यासह गोरेगावच्या "व्ही लाऊंज' हॉटेलमध्ये बारटेंडरचे काम करणाऱ्या ऍलन राजू मर्चंट (21), व्हॅलेंटाईन विन्सेन्ट जन्सीटो (20) आणि सूरज शशिकांत हडावले (20) या तिघांना अटक केली. चौकशीअंती या तीघांनी बजाज याची मोलकरीण वर्षा कोडेकर (29) हिने पुरविलेल्या माहितीवरून बजाज यांच्या घरावर दरोडा घातल्याचे स्पष्ट झाले.दरोड्याच्या दिवशी वर्षा इमारतीखाली उभी राहून आरोपींना मोबाईल फोनवरून चोरीसंबंधीचे निर्देश देत होती.
चोरी केलेल्या पैश्‍यांची सुरजची मैत्रिण सबिना हिच्या वांद्रे येथील घरात वाटणी झाली.त्याच रात्री वर्षाव्यतिरिक्त सगळे गोव्याला तीन महिने मौज करायला गेले.सबिना आणि तिच्या बहिणीने गोव्यात टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला.कपडे,तारांकित हॉटेलमध्ये राहणे, महागड्या गाड्यांतून फिरणे,वेश्‍यागमन अशात पैसे संपल्यानंतर राजू, सुरज आणि व्हॅलेंटाईन मुंबईत परतले.त्यांनी होंडा ऍकॉर्ड,ह्युंडई सॅन्ट्रो आणि ऍसेंट सारख्या महागड्या गाड्या खरेदी केल्या.घरात पालकांना सांगताना गोव्यात एका जमिनीच्या व्यवहारात मिळालेल्या पैश्‍यांतून या गाड्या खेरदी केल्याची माहिती त्यांनी दिली होती.घरात झालेल्या चोरीनंतर बजाज मुंबईतील त्याची सगळी मालमत्ता विकून पुण्याला राहायला गेला आहे.त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चाकैशीसाठी बोलविल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.
कोट्यवधीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक
गुन्हे शाखा ः व्यावसायिकाच्या मोलकरणीची करामत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः "तिजोरी दिखाके गलती कर दी ठाकूर..!' हा शोले चित्रपटातला गाजलेला डायलॉग आठवतोय? घरकाम करणाऱ्या मोलकरणीला नकळतपणे कपाटातली कोट्यवधींची रोकड दाखविणे खार येथील व्यावसायिकाला चांगलेच नडले. काम सोडून या मोलकरणीने व्यावसायिकाच्या घरात तीन साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दरोड्यात तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या या मोलकरणीला तिच्या तीन साथीदारांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. व्यावसायिकाने मात्र या प्रकरणात अवघ्या पाच लाख रुपयांच्या चोरीची तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
अजय बजाज (49) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. तो राहत असलेल्या खार पश्‍चिमेच्या डायगो इमारतीत 27 ऑक्‍टोबरला हा दरोडा पडला. चाकूच्या धाकाने घरात शिरलेल्या तीन चोरट्यांनी बजाज व त्यांचा नोकर हरीलाल यादव यांना कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली. यानंतर दोघांचे हातपाय बांधून घराच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी बजाज यांनी खार पोलिस ठाण्यात पाच लाख रुपयांच्या चोरीची फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खार परिसरात ह्युंदाई सॅन्ट्रो कारमधून फिरणाऱ्या ऍलन राजू मर्चंट (21), व्हॅलेंटाईन विन्सेन्ट जन्सीटो (20) आणि सूरज शशिकांत हडावले (20) या तिघांना अटक केली. चौकशीअंती बारटेंडरचे काम करणाऱ्या या तिघांकडेही होंडा ऍकॉर्ड व ह्युंदाई ऍसेंटसारख्या कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गाड्या खार येथील व्यावसायिक बजाज यांच्या घरात केलेल्या चोरीच्या पैशांतून खरेदी केल्याचे उघडकीस आले. ही चोरी बजाज यांची मोलकरीण वर्षा कोडेकर (29) हिने दिलेल्या माहितीवरून केल्याचे त्यांनी सांगितले. दरोड्याच्या दिवशी वर्षा इमारतीखाली उभी राहून आरोपींना मोबाईल फोनवरून चोरीसंबंधीचे निर्देश देत होती.
बजाजकडे सहा महिने काम केलेल्या वर्षाकडे सबिना नावाच्या महिलेने व्याजाने पैशांची मागणी केली होती. या वेळी वर्षाने सबिनाचा मित्र सूरज याला बजाज यांच्याकडे आपले वीस लाख रुपये अडकले आहेत. ते काढण्याकरिता बजाज यांच्या घरात असलेले कोट्यवधी रुपये चोरण्याची योजना आखली. दरोडा घातल्यानंतर आरोपींनी कपाटातील रोकड प्लॅस्टिकच्या सात बॅगांमध्ये भरून नेली. ही रोख रक्कम एक कोटी दहा लाख रुपये एवढी होती. या पैशांचे सबिनाच्या घरात वाटप झाले. पैशांच्या वाटपानंतर वर्षाव्यतिरिक्त सगळे गोव्यात तीन महिने मौज करायला गेले. सबिना आणि तिच्या बहिणीने गोव्यात टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. याच वेळी अवघ्या पाच लाखांच्या चोरीची नोंद करणारा व्यावसायिक बजाज यालाही पोलिसांनी पुण्याहून चौकशीसाठी बोलावल्याचे मारिया यांनी सांगितले.

Archive Yes

Friday, July 4, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.4 ः मटकाकिंग सुरेस भगत याच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज त्याची घटस्फोटीत पत्नी जया भगत हिला घाटकोपर येथून अटक केली.भगतच्या हत्येकरीता पंचेचाळीस लाख रूपयांच्या सुपारीचे पैसे तिनेच दिल्याचे उघडकीस आले. हत्येच्या कटासाठी एकदा ती कुख्यात डॉन आमदार अरूण गवळीलाही भेटल्याचे तिच्या चौकशीत उघड झाल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.न्यायालयाने तीला 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेकडो कोटी रूपयांचा कल्याण मटका व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी जया हिने मुलगा हितेश व गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्येसोबत सुरेश भगतच्या हत्येचा कट रचला.13 जूनला झालेल्या या अपघाती हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुहास रोग्येसह सहा जणांना यापुर्वीच अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत सहभाग स्पष्ट होताच पोलिसांनी जया व तिचा मुलगा हितेश यांचा शोध घ्यायला सुरवात केली.पोलिस मागावर असल्याचे ओळखून जयाने तिच्या पंतनगर येथील घरात राहणे बंद केले.शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये दरदिवशी हजारो रूपयांचे भाडे भरून ती राहत होती.पोलिसांना तिच्या हॉटेल्समधील वास्तव्याची माहिती मिळताच ती गुजरातला पळून गेली. तीच्या शोधार्थ पोलिस तिच्या पाठोपाठ गुजरात येथे गेले होते.जुने कपडे घेण्यासाठी ती घाटकोपर येथे आल्याचे समजताच आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीला तिच्या घरातून अटक केली.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भगतच्या हत्येचा कट आखणाऱ्या जयाने गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्ये,हरीष मांडवकर व किरण पुजारी यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या.यातील पहिली बैठक तिच्याच घरात, दुसरी बैठक सुहास रोग्ये राहत असलेल्या हॅंगिंग गार्डन परीसरात तर तीसरी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे कारमध्ये झाली.या प्रकरणी एकदा तीने कुख्यात डॉन आमदार अरूण गवळी याचीही भेट घेतल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मारिया यांनी दिली. हत्येसाठी देण्यात येणारी सुपारीची पंचेचाळीस लाख रूपयांची रक्कमही तीनेच काही हिश्‍श्‍यांत दिली. भगत सह सहा जणांच्या खूनाच्या या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस तिचा मुलगा हितेश याचाही शोध घेत आहेत.या प्रकरणी "मोक्का' लावण्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचेही मारिया म्हणाले.
ज्ञानेश

"नेट' वर तुमचा मुलगा करतोय काय...?
---------------------------

शाळा अथवा महाविद्यालयात जाणारा तुमचा मुलगा कॉम्प्युटर सॅव्ही असल्याचं तुम्हाला फार अप्रुप वाटत असेल. पण रात्री-अपरात्री नेट सर्फिंग करणारा तुमचा मुलगा नक्की करतो काय, याचा ढुंढाळा कधी पालक म्हणून घेतलायत? सध्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कळत नकळत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत.लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य पालक चिंतेत आहेतच शिवाय जगभरातून कुठूनही अशा प्रकारचे गुन्हे करणे शक्‍य असल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच दोषींना शिक्षा देण्याचे पोलिस दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जगभरात सर्वाधिक इंटरनेट कनेक्‍टिवीटी असलेल्या देशांत भारत चौथ्या स्थानावर आहे.या देशातील पाच कोटी जनता कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या मदतीने एकमेकांशी जोडलेले आहेत.यात बारा ते पस्तीस वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गेल्या काही वर्षांत नोंद झालेल्या तक्रारींपैकी बहूसंख्य तक्रारी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नावावर आहेत.सायबर गुन्हेगारीच्या विश्‍वात हॅकिंग , पोर्नोग्राफी व लहान मुलांची पोर्नोग्राफी,इमेलच्या माध्यमातून अश्‍लिल मजकूर प्रसारित करणे, पायरसी, सायबर स्टॉकिंग ऑनलाईन बॅंकींग फ्रॉड सारख्या गुन्ह्यांची प्रचंड चलती आहे. इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या "ऑर्कुट' या कम्युनिटी वेबसाईटचा वापर विद्यार्थी वर्गात प्रचंड आहे. याच "ऑर्कुट'वर एकमेकांना स्क्रॅप करता करता झालेल्या ओळखीतूनच अंधेरी येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा आदनान पत्रावाला याची त्याच्या "नेटफ्रेन्ड्‌स'नीच हत्या केल्याच्या प्रकाराने शहरात खळबळ माजली होती. वेबसाईटवर उपलब्ध असलेले आत्महत्येचे प्रयोग पाहून एका कॉन्व्हेन्ट शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकारही शिवाजी पार्क परिसरात काही महिन्यांपूर्वी उजेडात आला. सोबत शिकणारी मैत्रीण, शेजारी राहणाऱ्या तरूणी तसंच महिलांचे अश्‍लिल प्रोफाईल्स तयार करून ते इंटरनेटवर पोस्ट करण्याचे प्रकार आता नित्याचेच होवू पहात आहेत.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य उध्द्‌वस्त होण्याची भीती असल्याने अनेकदा पोलिस अल्पवयीन मुलांकडून झालेल्या सायबर गुन्ह्यांकडे सहानुभूतीने पहात असल्याचे चित्र आहे.गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींपैकी अवघ्या चारच प्रकर
णात लहान मुलांवर गुन्हे दाखल होवून त्यांना अटक झाली आहे.यात अंधेरी व वांद्रे रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटांनी उडविण्याच्या धमकीचे मेल पाठविणाऱ्या कोल्हापुर येथील दोन विद्यार्थ्यांचा,डोंगरी परीसरातील एका महिलेचे अश्‍लिल प्रोफाईल बनविणाऱ्या मुलाचा तसेच मुलुंड येथे मैत्रिणीचेच अश्‍लिल प्रोफाईल तयार करणाऱ्या महाविद्यालयीन तरूणीचा समावेश आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून होत असलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे पालकांत खऱ्या अर्थाने आकृष्ठ झाले. ऑर्कुटसारख्या कम्युनिटी साईट चालविणाऱ्या कित्येक कंपन्यांनी त्यांच्या "युजर्स'ना सावधगिरी बाळगण्याचे सल्ले दिले आहेत.
विद्यार्थ्यांत इंटरनेटच्या वापराबाबत प्रबोधन व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी "गुगल' सोबत एक अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.येत्या काही दिवसांत शहरातील शाळांमध्ये सायबर गुन्हे शाखेचे पोलिस विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करताना घ्यायच्या दक्षतेची तसेच इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती पटवून देणार आहेत.
माहितीचा अखंड स्त्रोत म्हणून ओळखला जाणाऱ्या कॉम्प्युटरचा अल्पवयीन मुले व महाविद्यालयीन तरूण,तरूणींकडून होत असलेल्या गैरवापरामुळे पालकात चिंतेचे वातावरण आहे. तासनतास कॉम्प्युटरसमोर बसणारा आपला पाल्य माहितीच्या या महाजालात "क्‍लिक' करून नक्की कसली माहिती मिळवतोय याकडे पालकांचे लक्ष असावे.तरूण पिढीत सर्वाधिक वेगात पसरत असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात आपल्याही घरातील लहान मुले,तरूण ओढले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.



चौकट
-----------
मुलांनो, चॅटिंग करताना हे टाळा...

1) अनोळखी व्यक्तीशी चॅट करताना त्याला आपले खरे नाव, घर अथवा शाळेचा पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक देणे कटाक्षाने टाळा.
2) पालकांचा सल्ला घेतल्याशिवाय इंटरनेटवरून कोणालाही आपले छायाचित्र पाठवू नका.
3) अनोळखी व्यक्ती अथवा इ मेल ऍड्रेसवरून आलेल्या अश्‍लील तसेच धमकीच्या मेल्सनी घाबरून न जाता आपले पालक तसेच पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
4)पालकांचा सल्ला घेतल्याशिवाय अथवा त्यांना कळविल्याशिवाय इंटरनेटवर ओळख झालेल्यांशी थेट भेट टाळा.
5)लक्षात ठेवा, ऑनलाईन असणारी व्यक्ती आपल्याला हवी असणारीच असेल असे नाही.
.........

Tuesday, July 1, 2008

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.1 ः शहरातील वाहतुक व्यवस्था नियंत्रित करण्यात वाहतुक शाखेच्या पोलिसांना सर्वसामान्य नागरीकांची मदत मिळावी यासाठी "वाहतुक रक्षक' नावाची अभिनव योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेत स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या नागरीकांना आठवड्यातून किमान चार तास रस्त्यावर उभे राहून पोलिसांच्या मदतीने वाहतूकीचे नियमन करता येणार आहे.
रस्त्यावर वाहने चालविताना होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या मुंबईकरांना नवीन नाही.बऱ्याचदा वाहतूक नियंत्रणात होणाऱ्या थोड्याश्‍या ढिलाईमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर " पिकअवर्स ' मध्ये होणाऱ्या खोळंब्यामुळे वाहनचालकांना तासनतास ताटकळत रहावे लागते.पावसाळ्याच्या दिवसांत वाहतुक कोंडीची तसेच विस्कळीत होण्याची समस्या आणखीनच गंभीर होते.दिवसेंदिवस वाढत असलेली वाहन संख्या आणि त्यामानाने अपुर्ण पडणाऱ्या रस्त्यावर उद्भवणाऱ्या या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतुक पोलिसांनी वाहतुक रक्षक योजनेच्या माध्यमातून चांगला तोडगा काढला आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 45 वर्षे वयोगटातील नागरीकाला स्वेच्छेने वाहतुक रक्षक होता येणार आहे.किमान तीन वर्षांपूर्वीचा वाहतुक परवाना असणाऱ्या नागरीकांना या योजनात सहभागी होता येणार आहे.या वाहतुक रक्षकांना दररोजच्या कामातून वेळ काढून आठवड्यातून किमान चार तास रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांच्या सोबतीने प्रत्यक्ष वाहतुक नियमनाचे काम करावे लागणार आहे.या कामाच्या मोबदल्यात त्यांना वाहतुक पोलिस विभागाकडून मात्र कसलाही भत्ता अगर मानधन देण्यास नकार दिला आहे.तसेच रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही नाकारण्यात आले आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्यांना आवश्‍यक असणारे आर्म बॅन्ड,शिटी देखील स्वतःच विकत घ्यावी लागणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे सह पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.रस्ते वाहतुक नियमनात पोलिसांना सामाजिक जाणिव असणाऱ्या नागरीकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.या वाहतुक रक्षकांना नेमणुकीपूर्वी एक छोटेखानी अभ्यासक्रम
पुर्ण करावा लागणार असून ही निवड तीन वर्षांकरीता राहणार आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरीकांना अर्जाचे वितरण ऑनलाईन करण्यात येत असून त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे बर्वे म्हणाले.