Thursday, June 26, 2008

ज्ञानेश
--------------------
प्रवेश घेताय; पण जरा जपून...!
आयुष्यभर कष्ट करून जमविलेला पैसा आणि पाल्याच्या शैक्षणिक जीवनातील मौल्यवान वर्षे वाया गेल्यावर होणाऱ्या दुहेरी नुकसानाचा किंचितसा विचार करून बघा. कल्पना करवत नाही ना..? चांगले करिअर आणि परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देणारे अभ्यासक्रम शिकविण्याच्या नावाखाली मुंबईसारख्या महानगरांत एका रात्रीत उभ्या राहणाऱ्या काही खासगी शिक्षण संस्थांचे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू झाले आहे. आपल्या पाल्याची महत्त्वपूर्ण वर्षे आणि पै-पै करून गोळा केलेला पैसा वाया जाऊ नये असे वाटत असेल, तर पाल्याला खासगी शिक्षण संस्थांच्या विलोभनीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना त्या अभ्यासक्रम व संस्थेची इत्यंभूत माहिती मिळविणे अत्यावश्‍यक झाले आहे.
आयुष्याचा "टर्निंग पॉईंट' समजल्या जाणाऱ्या बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. कला व वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची मान्यता असणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतले. मात्र गेल्या काही वर्षांपासून "सीईटी'च्या निकालांवर भवितव्य अवलंबून असणारे विज्ञान शाखेचे विद्यार्थी चांगले गुण मिळाल्यानंतर प्रगतीच्या नव्या वाटा चोखळण्याच्या प्रयत्नात असतात. मिळालेल्या डिक्‍स्टींग्शनच्या जोरावर मरीन इंजिनिअरिंग मर्चंट नेव्ही, एव्हिएशन, केबीन क्रू, एअरहोस्टेस, हॉटेल मॅनेजमेंटसारख्या आकर्षक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना दिसत आहेत. खासगी शिक्षण संस्थांनी सुरू केलेल्या या "डायसी' कोर्सेसना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळेच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया दरवर्षीप्रमाणे लांबत असल्याचे चित्र यंदाही आहे. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संख्या त्या मानाने कमी आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागण्याच्या सुमारास नव्याने सुरू झालेल्या शिक्षण संस्था वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती देतात. लाखो रुपयांची वार्षिक फी भरून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जगभरात कुठेही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याचा दावा या खासगी शिक्षण संस्था करतात. काही शिक्षण संस्था, तर परदेशातील नामांकित विद्यापीठांशी संलग्न असल्याची खोटी माहिती विद्यार्थी व पालकांना बिनदिक्कतपणे देतात. अभ्यासक्रमाचे एक वर्ष अथवा सहा महिने परदेशात शिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्याच्या आश्‍वासन देणाऱ्या संस्थांचे पेव सध्या सर्वत्र आहे. शेकडो विद्यार्थ्यांकडून गोळा झालेली अभ्यासक्रमाची कोट्यवधी रुपयांची फी घेऊन एखाद्या दिवशी हे संस्थाचालक आपला गाशा गुंडाळतात. पालक आणि विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न क्षणात धुळीला मिळाल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या फसवणुकीमुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांना प्रवेश देताना जपून पावले टाकणे आवश्‍यक झाले आहे. खासगी शिक्षण संस्थांमार्फत सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांची चौकशी न करता फक्त चांगले परतावे मिळण्याच्या लालसेपोटी या विद्यार्थी आणि पालकांची घोर फसवणूक होते.
गेल्यावर्षी उरणच्या बॉम्बे सायन्स मरीन इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यवधींना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. अमरावतीच्या शासकीय तंत्रशिक्षण केंद्रात एका खासगी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट आणि एअर होस्टेसच्या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील या बाजारूपणामुळे पालकांनी त्यांच्या पाल्याला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या संस्थेची काळजीपूर्वक चौकशी करणे कधीही हितावहच.

Wednesday, June 25, 2008

ज्ञानेश चव्हाण/सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.25 ःउच्चभ्रु समाजातील तरूणाईला बसणारा अंमली पदार्थांच्या सेवनाचा विळखा सोडविण्याकरीता या समाजात कार्यरत असणारे "संघटीत रॅकेट्‌स' नष्ट करण्यासाठी खबऱ्यांचे जाळे तयार करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.येत्या काळात शहरातील डिस्को थेक, पब्ज, मोठ्या हॉटेल्समध्ये रंगणाऱ्या लेट नाईट पार्ट्या,तसेच रेव्ह पार्ट्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर राहणार आहे.याशिवाय उच्चभ्रु समाजात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाया करीत असतानाच त्यांच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास पोलिस करणार आहेत.
रात्री-अपरात्री होणारे जागरण,काम अथवा अभ्यासामुळे येणाऱ्या प्रचंड मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी तरूण पिढी ब्राऊन शुगर,कोकेन,चरस गांजा यांच्या सेवनाकडे वळली आहे.गेल्या काही वर्षांत ऍम्स्टामाईन,एलएसडी,एक्‍सटसी,एमएमडीए अशा अंमली पदार्थांच्या सेवनातही प्रचंड वाढ झाली आहे.यापुर्वी समाजातील उच्चभ्रु घटकातील व्यसनाधिनता आता सर्वसामान्य कुटुंबातील तरूण पिढीतही चांगचीच फोफावत आहे.
मुंबईसारख्या महानगरांतील युवावर्गात व्यसनाधिनता पसरविण्यासाठी संघटीत टोळ्या कार्यरत आहेत.देशात राजस्थान व मध्यप्रदेश येथून मुंबईत हेरॉईन,ब्राऊनशुगर तर काश्‍मिर,मनिला,नेपाळ येथून चरस सारखे अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने मुंबईत येतात.दक्षिण अमेरिका,पेरू,बोलूविया येथे उत्पादन होणाऱ्या कोकेनच्या व्यसनाकडे उच्चभ्रु समाजात फॅशन म्हणून पाहिले जाते.या पदार्थांचा मुंबईसारख्या महानगरातील व्यापार कोट्यावधी रूपयांचा आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2007 साली 477 ठिकाणी केलेल्या कारवायांत 445 किलो 361 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला.यावेळी पोलिसांनी 2764 आरोपींना अटक केली असून या साठ्याची भारतीय बाजारातील किंमत 75 लाख 12 हजार रूपये एवढी आहे.यंदा 19 जूनपर्यंत पोलिसांनी केलेल्या 375 कारवायांत 1456 आरोपींना अटक झाली आहे.त्यांच्याकडून 136 किलो अंमली पदार्थ जप्त केले असून या साठ्याची किंमत सुमारे 71 लाख रूपये आहे.या कारवायांतर्गत अटक झालेल्या आरोपींत सेवनार्थींची संख्या लक्षणीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरूण पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाया करणे तसेच उच्चभ्रु समाजात अंमली पदार्थ पुरविणाऱ्या संघटीत टोळ्या नेस्तनाबुत करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक प्राधान्य देणार आहे.व्यसनाधिनतेत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी 125 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे या पथकाचे प्रमुख पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.लहान मुलांमध्ये व्यसनाधिनतेसाठी औषधांचा उपयोग करण्याचे प्रकार वाढत आहेत.या प्रकारांना आळा घालण्यासाठी अशा औषधांचा अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अंतर्भाव करण्याकरीता वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
------------------------------------------

2007 मध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर केलेल्या कारवाया

अंमली पदार्थ प्रकार - दाखल गुन्हे - अटक आरोपी - वजन - किंमत

1) ब्राऊन शुगर - 24 - 51 - 9 किलो 407 ग्रॅम- 26,65700 रूपये
2) चरस - 53- 121 - 102 किलो 995 ग्रॅम- 28,60,850
3) कोकेन - 11- 30 - 217 ग्रॅम- 7,11,000
4) गांजा - 21- 60 - 330 किलो 450 ग्रॅम- 4,59,000
5) अफु - 1 - 8 - 280 ग्रॅम - 5600
------------------------------
19 जून 2008 पर्यंतच्या कारवाया पुढीलप्रमाणे

अंमली पदार्थ प्रकार - दाखल गुन्हे - अटक आरोपी - वजन - किंमत
1) ब्राऊन शुगर - 15 -48- 17 किलो 222 ग्रॅम - 48,82,000
2) चरस - 19 - 37- 10 किलो 503 ग्रॅम - 2,84,600
3) कोकेन - 8 - 18 - 456 ग्रॅम - 18,13500
4) गांजा - 14- 48- 107 किलो 950 ग्रॅम - 1,12,450

Friday, June 20, 2008

ज्ञानेश
-----
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 20 ः ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झालेल्या बाम्बस्फोटप्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पेण आणि सातारा येथील तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा हस्तगत केला. पेण येथील छाप्यात दहशतवाद विरोधी पथकाने गावचा पोलिस पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला मुंबईत आणण्यात येत असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात "आम्ही पाचपुते' या नाटकाचा प्रयोग सुरु असताना 4 जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने सनातन संस्थेच्यारमेश हनुमंत गडकरी व (50) व मंगेश दिनकर निकम (37) यांना 14 जून रोजी अटक केली.यानंतर पोलिसांनी पनवेलच्या सनातन आश्रमात छापा घालून दिड हजारहून अधिक कार्यकर्त्यांची चौकशी केल्यानंतर संतोष सीताराम आंग्रे (26, रा. लांजा) आणि विनय भावे (26,रा. पेण) या दोघांना अटक केली. "आम्ही पाचपुते' या नाटकात हिंदू देवादिकांचे विडंबन होत असल्याच्या निषेधार्थ हा स्फोट घडविल्याची कबूली आरोपींनी दिली होती.या आरोपींचा पनवेल येथील सिनेराज चित्रपट गृहात झालेल्या स्फोटात तसेच वाशीच्या विष्णदास भावे नाट्यगृहात बॉम्ब पेरल्याच्या प्रकरणात सहभाग आढळला होता.
या तीन्ही घटनांचा सुत्रधार समजल्या जाणाऱ्या विनय भावे याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती. गावात विहीर खोदण्यासाठी जिलेटिन व डिटोनेटरचा वापर करणाऱ्या विनयच्याच घरात ठाणे, वाशी व पनवेल येथील स्फोटांसाठी आवश्‍यक असणारे बॉम्ब बनविण्यात आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यामुळे सतत दोन दिवस पनवेलच्या देवत येथील सनातन संस्थेत छापे घालून तेथील कार्यकर्त्यांची विचारपुस करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री विनय राहत असलेल्या पेणच्या वरसई गावात छापा घातला. विनयच्या चौकशीत उपलब्ध झालेल्या माहितीवरून पोलिसांनी बहिरीदेवी डोंगराजवळ असलेल्या त्याच्या शेतात एका ठिकाणी गाडण्यात आलेले 20 डिटोनेटर, 19 जिलेटीनच्या कांड्या, रिमोट सह 2 सर्कीट,2 टायमर,1 सर्कीट असा मोठा स्फोटक साठा हस्तगत केला.तसेच येथील बाणगंगा नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला साठाही यावेळी जप्त करण्यात आला.या साठ्यात रिमोटसह 3 सर्कीट , 1 सर्कीट , 12 बॅटरी, 1 टायमर हा साठा सापडला.गावचा पोलिस पाटील असलेला हरीभाऊ दिवेकर याने विनयच्या सांगण्यावरून हा साठा नदीच्या पात्रात टाकला होता.पोलिसांनी दिवेकर याला ताब्यात घेतले असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात येत असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.पेण येथील छाप्यांसोबत पोलिसांनी आरोपी मंगेश निकम याच्या चौकशीत उघडकीस आलेल्या माहितीवरून सातारा येथेही छापा घातला.या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर डिटोनेटर, बॅटरी व टायमर अशी स्फोटके सापडल्याचेही सिंग यांनी सांगितले.दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी अद्याप घटनास्थळावर असून पोलिस पाटील दिवेकर यांच्या चौकशीत आणखी काही महत्वपुर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Friday, June 6, 2008

मारियानेच नीरजला आग्रह करून थांबविले

राकेश मारिया ः नीरज ग्रोव्हरची हत्या पूर्वनियोजित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज आणि नौदलात लेफ्टनंट असलेला तिचा प्रियकर एमिल मॅथ्यु यांनी सिनर्जी ऍडलॅब्जचा क्रिएटीव्ह हेड निरज ग्रोव्हर याची केलेली हत्या पुर्वनियोजीत होती. तीघांच्या मोबाईल फोनवर झालेल्या संभाषणातून हे उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश यांनी आज पत्रकारंशी बोलताना दिली.
मालिकांत काम मिळविण्यासाठी मुंबईत आलेली दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिने तिचा प्रियकर एमिल जेरॉम मॅथ्यु याच्या सोबतीने नीरज ग्रोव्हर याची 7 मे रोजी सकाळी अमानुषपणे हत्या केली. मालाडच्या धीरज सॉलिटर या इमारतीतील मारियाच्या घरात झालेल्या या खून प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली होती. हत्येनंतर नीरजच्या मृतदेहाचे बारीक तुकडे केल्यावर ते तीन बॅगेत भरून मनोरच्या जंगलात नेऊन जाळले होते.या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 20 मे रोजी मारिया व तिचा प्रियकर मॅथ्यु याला अटक केली.

नीरजच्या हत्येनंतर गुन्हे शाखेचे पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तत्पुर्वी गेल्या आठवड्यात मारियाने न्यायालयापुढे केलेल्या गुन्ह्याची मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर इन कॅमेरा कबुली दिली होती. पोलिसांना तीघांच्या मोबाईल फोनचे रेकॉर्डस नुकतेच मिळाले आहेत. या रेकॉर्डसनुसार 6 मेच्या रात्री साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दोन वेळा मारियाने नीरजला स्वतः फोन करून तीच्या घरी बोलावले होते. दुसऱ्या दिवशी काम असल्याने नीरज जाण्यास तयार नव्हता. मात्र मारियाच्या आग्रहामुळेच तो तीच्या घरी गेला होता. नीरज घरी आल्यानंतर तीने कोची येथे असलेला तिचा प्रियकर मॅथ्यु याला फोन केला. नीरज आपल्याशी लगट करीत असल्याचे तीने मॅथ्युला सांगितले होते. नीरज घरात असल्याचे कळल्यानंतर साडेअकरा वाजता मॅथ्युने दुसऱ्या मित्राच्या नावाने विमानाचे तिकिट ऑनलाईन काढले आणि सकाळी पावणेचार वाजता तो मुंबईत दाखल झाला. यानंतर त्याने मारियाच्या घरात असलेल्या नीरजचा मारियाच्या सोबतीने खून केला. या सगळ्या घटनाक्रमावरून नीरजची झालेली हत्या मारिया आणि मॅथ्यु यांनी रचलेला पुर्वनियोजीत कट होता हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्याच्या कलमांत वाढ केली असून त्यात पुर्वनियोजनाची कलमेही टाकल्याचे सह पोलिस आयुक्त मारिया म्हणाले.
...
(चौकट)
हत्येमागे "कास्टिंग काऊच'चा वाद
मालिकेत रोल देण्याच्या निमित्ताने नीरजने आपल्याशी संबंध ठेवले. प्रत्यक्षात मात्र कोणतीच भूमिका न देता त्याने फक्त आपला वापर केला. म्हणूनच मॅथ्युच्या सोबतीने त्याचा खून केल्याची कबुली तीने पोलिसांना दिल्याचे समजते. या प्रकरणामुळे नीरज ग्रोव्हरची हत्या कास्टिंग काऊच प्रकरणातून झाली असावी का याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.