Monday, March 30, 2009

आता पोलिसांनाही मिळणार चकाचक सरकारी फ्लॅट्‌स..!

जुनाट आणि नादुरूस्त इमारतींत दहा बाय अठराच्या खुराडेवजा घरात आयुष्य घालवाव्या लागणाऱ्या सामान्य पोलिसांनाही आता खासगी गृहनिर्माण प्रकल्पांसारखेच आधुनिक पद्धतीने बांधलेले चकाचक सरकारी फ्लॅट्‌स मिळणार आहेत. चांगली आणि दर्जेदार सरकारी निवासस्थाने उपलब्ध नसल्याने खासगी घरांत राहण्याकडे पोलिसांचा असलेला कल लक्षात घेता राज्यातील किमान 70 टक्के पोलिसांना गृहनिर्माण महामंडळाकडून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी सरकारी घरे उपलब्ध करून देण्याकरीता पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यात 2 हजार 663 घरांच्या निर्मितीचे 14 गृहनिर्माण प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबई सारख्या शहरांत कार्यरत असणारे पोलिस वरळी, नायगाव, शिवडी, नामजोशी मार्ग येथे असलेल्या वसाहतींत वास्तव्याला आहेत. पोलिसांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थाने देणे आवश्‍यक असल्याने ब्रिटिशांनी कैद्यांना ठेवण्याकरिता बांधलेल्या या बराकींनाच नंतर पोलिस वसाहतींचे स्वरूप आले. प्रत्येकी 180 चौरस फुटाच्या खुराड्यांसारख्या या घरांत सामान्य पोलिसांनी आपल्या सेवाकाळातील उभी हयात घालविल्याची स्थिती आहे. या घरांच्या दुरुस्ती व डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मात्र, या खात्याकडून पोलिसांच्या घरांच्या देखभाल दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या 43 हजार 242 अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी फक्त 20 हजार 630 जणांनाच घरे उपलब्ध असल्याचे धक्कादायक चित्र आहे. देखभाली अभावी नादुरुस्त आणि कमी क्षेत्रफळाच्या घरांनी त्रस्त असलेल्या कितीतरी पोलिसांनी या घरांत राहण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे सध्यस्थितीला मुंबईतील 1542 घरे वापराविना पडून आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे,नवी मुंबई यांच्यासह राज्यातील अन्य शहरी भागात काम करणाऱ्या पोलिसांची घरांच्या निवडीबाबतची स्थिती कायम आहे. 180 चौरस फुटांच्या या घरांकडे पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांना शेजारी असलेली दोन घरे देण्यास गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरवात झाली. सरकारी घरांत राहण्याकडे पोलिसांनी भर द्यावा यासाठी त्यांना वाढीव क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या योजनांत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवीन क्षेत्रफळानुसार घरे दिली जाणार आहेत. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पाच गटांत ढोबळ विभागणी करण्यात आली आहे. नवीन प्रकल्पांत सामान्य प
ोलिस कर्मचाऱ्याला अत्याधुनिक सोयींनी युक्त असे किमान 475 चौरस फुटाचे (कार्पेट एरिया) घर दिले जाणार आहे.
पोलिस वसाहतींतील अनेक वर्षांच्या वास्तव्याने कंटाळलेले पोलिस पै पै गोळा करून अद्ययावत सुविधा आणि प्रशस्त असे स्वतःचे घर घेऊन राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना पुन्हा सरकारी घरांची ओढ लावण्याचे मोठे आव्हान राज्य पोलिस गृहनिर्माण विभागावर आहे. सध्या सांताक्रूझ, सोलापूर, रायगड, ठाणे आणि मलबार हिल मुंबई येथे 139 कोटी 20 लाख रुपये खर्चाचे 5 गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याच्या कामाच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तर औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, ठाणे ग्रामीण , घाटकोपर, वरळी, वाडीबंदर आणि माहीम मच्छीमार कॉलनी येथे 1 हजार 569 घरे बांधण्याचे काम सुरू करणे प्रस्तावित आहे. नऊ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 238 कोटी 77 लाख रुपये खर्च होणार आहेत. सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या पोलिसाला त्याचे हक्काचे आणि सुनियोजित असे घर मिळण्यासाठी पोलिसांच्या गृहनिर्माण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत असून येत्या काही वर्षांत राज्य पोलिस दलात असलेल्या सर्वच पोलिसांना हक्काचा निवारा मिळून देण्याचा प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिस महासंचालक एस.एस.विर्क यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.


नवीन योजनेनुसार पोलिसांची करण्यात आलेली गटवारी आणि त्यांना मिळणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ पुढीलप्रमाणे -

1) पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक - 474 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
2) सहाय्यक पोलिस निरीक्षक ते पोलिस निरीक्षक - 538 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
3) सहाय्यक पोलिस आयुक्त ते पोलिस उपायुक्त - 828 चौरस फूट ( कार्पेट एरिया )
4) पोलिस अधीक्षक ते पोलिस उपमहानिरीक्षक - 1506 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
5) पोलिस महानिरीक्षक ते पोलिस महासंचालक - 1925 चौरस फूट ( कार्पेट एरिया)

(sakal,8april)

आता पोलिसांनाही मिळणार चकाचक सरकारी फ्लॅट्‌स..!

जुनाट आणि नादुरूस्त इमारतींत दहा बाय अठराच्या खुराडेवजा घरात आयुष्य घालवाव्या लागणाऱ्या सामान्य पोलिसांनाही आता खासगी गृहनिर्माण प्रकल्पांसारखेच आधुनिक पद्धतीने बांधलेले चकाचक सरकारी फ्लॅट्‌स मिळणार आहेत. चांगली आणि दर्जेदार सरकारी निवासस्थाने उपलब्ध नसल्याने खासगी घरांत राहण्याकडे पोलिसांचा असलेला कल लक्षात घेता राज्यातील किमान 70 टक्के पोलिसांना गृहनिर्माण महामंडळाकडून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी सरकारी घरे उपलब्ध करून देण्याकरीता पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यात 2 हजार 663 घरांच्या निर्मितीचे 14 गृहनिर्माण प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबई सारख्या शहरांत कार्यरत असणारे पोलिस वरळी, नायगाव, शिवडी, नामजोशी मार्ग येथे असलेल्या वसाहतींत वास्तव्याला आहेत. पोलिसांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थाने देणे आवश्‍यक असल्याने ब्रिटिशांनी कैद्यांना ठेवण्याकरिता बांधलेल्या या बराकींनाच नंतर पोलिस वसाहतींचे स्वरूप आले. प्रत्येकी 180 चौरस फुटाच्या खुराड्यांसारख्या या घरांत सामान्य पोलिसांनी आपल्या सेवाकाळातील उभी हयात घालविल्याची स्थिती आहे. या घरांच्या दुरुस्ती व डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मात्र, या खात्याकडून पोलिसांच्या घरांच्या देखभाल दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या 43 हजार 242 अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी फक्त 20 हजार 630 जणांनाच घरे उपलब्ध असल्याचे धक्कादायक चित्र आहे. देखभाली अभावी नादुरुस्त आणि कमी क्षेत्रफळाच्या घरांनी त्रस्त असलेल्या कितीतरी पोलिसांनी या घरांत राहण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे सध्यस्थितीला मुंबईतील 1542 घरे वापराविना पडून आहेत. पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे,नवी मुंबई यांच्यासह राज्यातील अन्य शहरी भागात काम करणाऱ्या पोलिसांची घरांच्या निवडीबाबतची स्थिती कायम आहे. 180 चौरस फुटांच्या या घरांकडे पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांना शेजारी असलेली दोन घरे देण्यास गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरवात झाली. सरकारी घरांत राहण्याकडे पोलिसांनी भर द्यावा यासाठी त्यांना वाढीव क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या योजनांत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवीन क्षेत्रफळानुसार घरे दिली जाणार आहेत. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पाच गटांत ढोबळ विभागणी करण्यात आली आहे. नवीन प्रकल्पांत सामान्य प
ोलिस कर्मचाऱ्याला अत्याधुनिक सोयींनी युक्त असे किमान 475 चौरस फुटाचे (कार्पेट एरिया) घर दिले जाणार आहे.
पोलिस वसाहतींतील अनेक वर्षांच्या वास्तव्याने कंटाळलेले पोलिस पै पै गोळा करून अद्ययावत सुविधा आणि प्रशस्त असे स्वतःचे घर घेऊन राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांना पुन्हा सरकारी घरांची ओढ लावण्याचे मोठे आव्हान राज्य पोलिस गृहनिर्माण विभागावर आहे. सध्या सांताक्रूझ, सोलापूर, रायगड, ठाणे आणि मलबार हिल मुंबई येथे 139 कोटी 20 लाख रुपये खर्चाचे 5 गृहनिर्माण प्रकल्प बांधण्याच्या कामाच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तर औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, ठाणे ग्रामीण , घाटकोपर, वरळी, वाडीबंदर आणि माहीम मच्छीमार कॉलनी येथे 1 हजार 569 घरे बांधण्याचे काम सुरू करणे प्रस्तावित आहे. नऊ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 238 कोटी 77 लाख रुपये खर्च होणार आहेत. सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या पोलिसाला त्याचे हक्काचे आणि सुनियोजित असे घर मिळण्यासाठी पोलिसांच्या गृहनिर्माण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत असून येत्या काही वर्षांत राज्य पोलिस दलात असलेल्या सर्वच पोलिसांना हक्काचा निवारा मिळून देण्याचा प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिस महासंचालक एस.एस.विर्क यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.


नवीन योजनेनुसार पोलिसांची करण्यात आलेली गटवारी आणि त्यांना मिळणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ पुढीलप्रमाणे -

1) पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक - 474 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
2) सहाय्यक पोलिस निरीक्षक ते पोलिस निरीक्षक - 538 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
3) सहाय्यक पोलिस आयुक्त ते पोलिस उपायुक्त - 828 चौरस फूट ( कार्पेट एरिया )
4) पोलिस अधीक्षक ते पोलिस उपमहानिरीक्षक - 1506 चौरस फूट ( कार्पेट एरिया)
5) पोलिस महानिरीक्षक ते पोलिस महासंचालक - 1925 चौरस फूट ( कार्पेट एरिया)

चाकूधारी चोरट्यावर जिगरबाज तरुणाची झडप

चोरट्याला मुस्क्‍या ः ओव्हल मैदानाने अनुभवला थरार

संध्याकाळची कातरवेळ. चर्चगेटचं प्रसिद्ध ओव्हल मैदान. गप्पा-गोष्टींत गढून गेलेले गिरी दाम्पत्य. अशा वेळी एकट्याच बसलेल्या या दाम्पत्याजवळ तीन अनोळखी व्यक्ती येतात. लकाकते चाकू बाहेर काढतात आणि त्याच्या धाकाने गिरी दाम्पत्याकडील पाच हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून ते पळून जाऊ लागतात; पण तेवढ्यात तपन गिरी प्रसंगावधान दाखवतात. एका चोरट्याला झडप घालून पकडतात आणि चोप देत पोलिस ठाणे गाठतात...

चर्चगेट येथील "ए' रोडवर पुष्पाकुंज इमारतीत राहणारे तपन अनिल गिरी (32) एका खासगी कंपनीत कामाला आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते त्यांची पत्नी पूजा हिच्यासोबत महर्षी कर्वे रोडवरील प्रसिद्ध ओव्हल मैदानात बसले होते. पत्नीशी हितगूज करीत असतानाच त्यांच्या पुढ्यात उभ्या राहिलेल्या तिघा चोरट्यांकडील लखलखता सुरा बघून एक क्षण त्यांचीही गाळण उडाली. चोरट्यांनी त्यांना धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा सात हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि पळायला सुरवात केली. या वेळी त्यांच्यातील एक जण मागे राहिल्याची संधी साधून तपन गिरी यांनी त्याला काही कळायच्या आत पुढच्याच क्षणी त्याच्यावर झडप घातली. तपन गिरीनी चोरट्याची चांगलीच धुलाई करायला सुरवात केली. तोपर्यंत हा प्रकार त्यांची पत्नी पूजा (28) हिने तिथे असलेल्या काही मंडळींच्या कानावर घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांच्या मदतीने गिरी यांनी या चोरट्याला आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. दिनेश वासुदेव भारसाणी (23) असे त्याचे नाव आहे. गिरी यांना धमकावण्यासाठी वापरलेला चाकू भारसाणी याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. चर्चगेट परिसरातच भुरट्या चोऱ्या करणाऱ्या भारसाणीने पोलिसांना त्याच्या साथीदारांची नावे सांगितली आहेत. थापा, आझाद अशी त्याच्या पळून गेलेल्या साथीदारांची नावे आहेत. आझाद मैदान पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने चोरट्याला पकडणाऱ्या गिरी यांचे पोलिस आणि चर्चगेट परिसरातील नागरिक कौतुक करीत आहेत.

(sakal,28 march)

पोलिसांचे टेन्शन दुपटीने वाढणार

निवडणूक सुरक्षा ः केंद्राने अतिरिक्त कुमक नाकारल्याचा परिणाम


राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता उपलब्ध असलेले पोलिस बळ अपूर्ण असल्याने अतिरिक्त कुमक मिळण्याच्या राज्याच्या मागणीला केंद्रीय गृहखात्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. निवडणूक काळातील सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाच्या 80 कंपन्यांची राज्याच्या गृहखात्याने केलेली मागणी धुडकावून लावत अवघ्या 15 कंपन्यांवर राज्याची बोळवण केली आहे. केंद्राकडून अतिरिक्त पोलिस बळ देण्यास मिळालेल्या नकारानंतर राज्यातील पोलिसांवर या काळात बंदोबस्ताचा ताण वाढणार असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात 16, 23 आणि 30 एप्रिल रोजी एकूण 80 हजार मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची अधिसूचनादेखील जारी केली आहे. या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता राज्यभरातील पोलिस यंत्रणा सुसज्ज झाली आहे. राज्यातील निवडणुकांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलिस महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांनी यासंबंधी सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची नुकतीच एक बैठकही घेतली. राज्य पोलिस दलात पावणेदोन लाख पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 टक्के पोलिस कार्यालयीन कामकाज करतात. उपलब्ध पोलिसांपैकी आजारपणासह टाळता न येणाऱ्या कारणांकरिता रजा घेणाऱ्या पोलिसांचे प्रमाणही अधिक आहे. निवडणुका घेण्यासाठी उपलब्ध पोलिस बळाच्या पाचपट पोलिस तैनात करणे आवश्‍यक असते. त्यामुळे ऐन निवडणूक काळात राज्यात पुरेसे पोलिस बळ उपलब्ध होण्यासाठी गृहखात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने निवडणूक काळात देशभरातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या जीवाला दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याच्या सूचना दिल्याने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही पोलिसांवर आहे. राज्यातील एकूणच परिस्थितीचा विचार करता निवडणूक काळात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवता यावा, यासाठी गृहखात्याने 120 जवानांची प्रत्येकी एक अशा 80 कंपन्यांची केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा बलाची कुमक मागितली होती; मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचे कारण पुढे करीत केंद्रीय गृहखात्याने राज्याला अर्धसैनिक सुरक्षा बलाच्या फक्त 15 कंपन्या पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र केंद्र सरकारकडून गृहखात्याला प्राप्त झाले आहे. केंद्राकडून मिळणाऱ्
या अपूर्ण पोलिस बळावर राज्यात निवडणुका घेणे जिकिरीचे असल्याने केंद्राने या निर्णयाचा फेरविचार करावा, असा आग्रह राज्य सरकारने केंद्राकडे धरला आहे. सामान्य परिस्थितीत प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन पोलिस बंदोबस्तासाठी ठेवले जातात. नक्षलग्रस्त अथवा संवेदनशील ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर कमी पोलिस ठेवणे शक्‍य नसते. त्यामुळे केंद्राकडून मिळणारे अर्धसैनिक बलाचे जवान नक्षलग्रस्त भागासह राज्यातील संवेदनशील मतदारसंघांत तैनात करण्याचे राज्य पोलिसांनी ठरविले होते. याशिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मतदान यंत्रांची सुरक्षितता यांचा विचार करता केंद्राकडून अतिरिक्त पोलिस बळ मिळाल्याशिवाय निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे राज्य पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याचे गृहखात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

(sakal,26 march)

महागडे "व्हर्टू' मोबाईल चोरणाऱ्यांना अटक

सहआयुक्तांची माहिती : आरोपी विमानतळावरील लोडर

चित्रपट कलावंत, उद्योजक, राजकारणी अशा देशभरातील निवडक धनाढ्यांकरिता लंडनहून मागविण्यात येणाऱ्या "व्हर्टू' या ख्यातनाम मोबाईल कंपनीचे तीन मोबाईल चोरल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहार एअरपोर्टवरील दोघा लोडरना अटक केली आहे. प्रत्येकी साडेपाच लाख रुपये किंमत असलेले हे मोबाईल फोन प्रत्येकी अडीच लाख रुपयांना विकले जाणार होते, असे तपासात उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. पोलिसांनी चोरीला गेलेले हे मोबाईल हस्तगत केले आहेत.

बाबू करीअप्पा कावटी (22, रा. दहिसर) आणि अखिलेश मिश्रा (21, रा. विलेपार्ले) अशी या दोघा लोडरची नावे आहेत. लंडन येथे बनविण्यात येणाऱ्या या मोबाईल फोनचे वितरण भारतात भिवंडी येथील "मेट्रिक्‍स ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड' या एजन्सीमार्फत केले जाते. जगप्रसिद्ध फरारी स्पोर्टिंग कार कंपनीसोबत टायअप असलेल्या व्हर्टू कंपनीने बनविलेले हे निवडक मोबाईल फोन मुंबईत 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान विक्रीकरिता आणण्यात आले. सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गोतून उतरविण्यात आलेल्या या मोबाईलचे कार्टन केंद्रीय सीमा शुल्क विभागाकडे तपासणीकरिता गेले. मॅट्रिक्‍स कंपनीसाठी विमानतळावरील क्‍लिअरिंग व फॉर्वर्डिंग करणाऱ्या ओमेगा कंपनीत काम करणारे लोडर बाबू कावटी आणि अखिलेश मिश्रा यांनी या कार्टनमधील तीन मोबाईल फोन काढून घेतले. कार्टनमधून झालेल्या या चोरीची माहिती मॅट्रिक्‍स कंपनीत फार उशिरा उघडकीस आली. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या युनिट- 9 च्या पोलिसांना दोघे तरुण अतिशय महागडे मोबाईल फोन अर्ध्याहून कमी किमतीत विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून कावटी आणि मिश्रा या दोघांना अंधेरीच्या वैभव हॉटेलजवळ बोलावून घेतले. तेथेच त्यांना अटक केल्याचे मारिया यांनी सांगितले. निवडक लोकांकडेच असणाऱ्या "व्हर्टू' या मोबाईल फोनद्वारे जगात कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी हॉटेल बुकिंग, विमानाच्या तिकिटांचे बुकिंग यांसारख्या अनेक सुविधा विनामूल्य मिळतात, असे सूत्रांनी सांगितले.

(sakal,25 march)

खंडणीप्रकरणी शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे यांना अटक

अन्य सहा जण जेरबंद ः पांडवपुत्र टोळीसाठी खंडणी मागितली

घरखरेदीच्या एका व्यवहारात 13 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भुलेश्‍वर येथील शिवसेना नगरसेवक विजय वाशिर्डे (वय 60) यांच्यासह सात जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. वाशिर्डे यांनी ही खंडणी पांडवपुत्र टोळीसाठी मागितल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक- 217 चे नगरसेवक असलेल्या वाशिर्डे याच्यासोबत अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे मुकेश सौदागर (32), झाकीर शेख (32), निसार शेख (43), तबरेज मकबुल ( 28), लक्ष्मण किरण (27), सिद्धार्थ मयेकर ऊर्फ सिद्धू (30) अशी आहेत. दोन महिन्यांपूर्वी कुंभारवाडा येथील एका घराच्या विक्रीचा व्यवहार 25 लाख रुपयांना करण्यात आला होता. घर खरेदी करणाऱ्याने त्याच्या मूळ मालकाला व्यवहाराची सगळी रक्कम दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतरच देणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे घराच्या मालकाने दुरुस्तीचे काम करायला सुरुवातही केली. याच इमारतीत राहणारा पांडवपुत्र टोळीचा सदस्य सौदागर याने ही माहिती टोळीचा सूत्रधार सिद्धार्थ मयेकर ऊर्फ सिद्धू याला दिली. यानंतर सिद्धूने घराच्या मूळ मालकाकडे दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यासाठी 13 लाख रुपयांची खंडणी मागितली. घरमालकाने सिद्धूला सुरुवातीला 20 हजार रुपये देण्याची संमती दर्शविली. त्यानुसार सिद्धूने त्याच्याकडून 20 हजार रुपये घेतले; मात्र खंडणीची पूर्ण रक्कम मिळेपर्यंत काम थांबविण्यासाठी त्याने घराला टाळेही ठोकले. यानंतर त्रस्त घरमालकाने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानुसार आज घरमालकाने सिद्धूला खंडणीची रक्कम देण्यासाठी काळबादेवी येथील हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी सिद्धूने त्याचे साथीदार सौदागर, झाकीर आणि निसार यांना पाठविले. या वेळी आपल्याकडे पुन्हा खंडणीची मागणी करणार नाही अशी खात्री घरमालकाने या गुन्हेगारांकडून मागितली. तेव्हा त्यांनी घरमालकाला नगरसेवक वाशिर्डे बसलेल्या अन्य एका हॉटेलमध्ये नेले. तेथे खंडणीची रक्कम घेत असताना वाशिर्डे आणि तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाशिर्डे यांनी ही रक्कम सिद्धूसाठी घेतल्याची कबुली पोलिस
ांना दिल्याचे सहपोलिस आयुक्त मारिया यांनी या वेळी सांगितले.

(sakal,24 march)

मुलांवर सुरीहल्ला करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन मुले जखमी ः पतीवरील राग निरागस मुलांवर

दोन दिवसांपासून पती घरात न जेवल्याने संतापलेल्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना चाकूने भोसकून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली येथे घडली.
कांदिवली पश्‍चिमेला संजयनगर परिसरात काल सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेम गुप्ता (30) हा त्याची पत्नी संगीता (20) हिच्याशी गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ वादामुळे बोलत नव्हता. दोन दिवसांपासून तो घरात जेवतही नव्हता. काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो उठला आणि पाणी भरून तो स्नेहल (5 वर्षे ) आणि शिवम ( 7 वर्षे) यांच्यासोबत पुन्हा झोपला. पती बोलत नसल्याचा राग आल्याने संगीताने भाजी चिरण्याच्या सुरीने मुलगी स्नेहल आणि मुलगा शिवम यांच्यावर वार केले. मुलीच्या पोटात दोन वार केल्यानंतर ती मुलाकडे वळली. त्याच्यावर पहिला वार केल्यानंतर तो जोरात ओरडल्यामुळे त्याच्या शेजारी झोपलेला प्रेम लगेचच उठला. मुलावर दुसरा वार करणार तोच त्याने पत्नी संगीताला अडविले. त्यानंतर संगीताने स्वतःच्या हातावर एक वार करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणारे काही नागरिक त्यांच्या घराकडे धावत आले. त्यांनी जखमी अवस्थेतील दोन मुलांना आणि संगीताला भगवती रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्रकुमार जैस्वाल यांनी दिली.
प्रेम याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संगीताच्या पोटात दुखत होते; मात्र त्याकडे आपले दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे वेडसरपणाच्या झटक्‍यात तिने हे कृत्य केले असावे. यापूर्वीही दोन-तीनदा तिने असाच प्रकार केला होता, असेही जैस्वाल यांनी सांगितले.


(sakal,23 march)

दोन्ही पाय गमावण्याची महिला डॉक्‍टरवर वेळ

मृत्यूशी झुंज ः रेल्वेरूळ ओलांडताना अपघात

घाई-गडबडीत रेल्वेरूळ ओलांडताना धावत्या लोकलखाली आल्याने ऍन्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका महिला डॉक्‍टरवर दोन्ही पाय गमवावे लागण्याची वेळ आली आहे. वडाळा रेल्वेस्थानकात आज सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत जखमी झालेल्या डॉक्‍टरवर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला डॉक्‍टरची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
ज्योती गणेश शेट्टी (33) असे या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. शेट्टी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास टॅक्‍सीने वडाळा रेल्वेस्थानकात आल्या. त्यानंतर घाईघाईत लोकल पकडण्यासाठी त्यांनी रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुळामध्ये चप्पल अडकल्याने त्या रुळावरच पडल्या. या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर रेल्वेरुळाच्या शेजारीच पडलेल्या ज्योती शेट्टी यांना काही प्रवासी व रेल्वे पोलिसांनी उचलून शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचे दोन्ही पाय काढण्याबाबतचा निर्णय डॉक्‍टर घेतील, अशी शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, या डॉक्‍टरची प्रकृती गंभीर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक असल्याच्या सूचना केंद्रीय मध्यवर्ती सूचना कक्षाकडून वारंवार केल्या जातात; मात्र अनेकदा उच्चशिक्षित व्यक्तीही या सूचनांकडे डोळेझाक करून रेल्वेरूळ ओलांडत असतात. अशाच प्रकारे वेळ वाचविण्याचा प्रयत्न केल्याने डॉ. शेट्टी यांना पाय गमवावे लागणार आहेत, अशी माहिती रेल्वेचे पोलिस उपायुक्त वसंत कोरगावकर यांनी दिली.


(sakal,23 march)

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शोधात पोलिस

तणाव नियोजन ः जीवनशैलीच्या आजारांनी त्रस्त


नोकरीच्या अनियमित वेळा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सततचा बंदोबस्त, सीआर खराब होणार नाही, या भीतीपोटी वरिष्ठांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्याकरिता सुरू असलेली सततची दगदग यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतचे पोलिस सतत तणावाखाली असतात. पोलिसांवरील हा तणाव कमी व्हावा, गरजेच्या वेळी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी व पर्यायाने त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता राज्य सरकार वर्षाला 60 कोटी रुपये खर्च करते. सरकारी उपाययोजनांच्या या मलमपट्टीनंतरही पोलिसांवर असलेला तणाव कमी होण्याची सुतराम चिन्हे दिसत नसल्याने आता पोलिस दल मेडिटेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग व योगाभ्यासाकडे वळत असल्याचे आश्‍वासक चित्र आहे.
सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या जीविताची, तसेच मालमत्तेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसाला दैनंदिन कामकाजामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पाहायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये हृदयविकार व मेंदूच्या गंभीर व्याधींचे प्रमाण बळावत आहे. राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांपैकी गेल्या दोन वर्षांत 13 हजार 500 पोलिस व त्यांचे कुटुंबीय विविध गंभीर आजारांनी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यात तब्बल 1800 पोलिसांना हृदयविकाराने; तर एक हजारहून अधिक पोलिसांना मेंदूच्या आजारांनी ग्रासल्याची सरकारी आकडेवारी आहे. तणावमुक्तीसाठी केलेले मद्यपान आणि धूम्रपानामुळे कर्करोगासारख्या आजारावर गेल्या दोन वर्षांत एक हजारहून अधिक पोलिसांनी पोलिस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत.
कामाच्या वाढत्या ताणामुळे डोंगरी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक साठे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मानसिक ताणावाखाली येऊन पोलिसाने आत्महत्या केल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. कामाच्या अनियमित वेळा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक या कारणांमुळेही त्यांच्या खालोखाल असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वभावात चिडचिड निर्माण होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या घटना थांबविण्यासाठी राज्य सरकारसह गृह खात्यानेही आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. राज्यातील 11 पोलिस आयुक्तालये आणि नऊ जिल्हा अधीक्षक कार्यालयांच्या माध्यमातून विभागीय पातळ्यांवर विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात नियमित शारीरिक शिक्षण, परेड यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग, योगाभ्यासावर प्रकर्षाने जोर देण्यात येत आहे. व्यसनाधीन पोलिसांकरिता व्यसनमुक्ती शिबिरेही घेण्यात येत असल्याची माहिती गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शहरांतील पोलिस
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांतील पोलिसांची अवस्था ही अधिक क्‍लेशदायक असते. मुंबईतील विविध जाती-धर्मांचे सण-समारंभ, कार्यक्रम यासाठी पोलिस फौजफाटा राबत असतोच. लागोपाठ येणाऱ्या विविध धार्मिक सणांच्या दिवसांत तर सलग तीन महिने साप्ताहिक सुट्टी न घेता काम करणारे पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही पाहायला मिळतात. शहरातील या कामाच्या अतिरिक्त ताणाची आकडेवारीच अधिक बोलकी आहे.
सन- मृत्यू- आत्महत्या- हृदयविकाराच्या घटना
2008- 165 7 37
2007- 136 3 40
2006- 158 4 41
2005- 177- 4 51
मुंबईत 2005 पासून पोलिसांतील हृदयविकाराच्या रुग्णांचे आकडे घटत असले तरी मृत्युदर मात्र वाढलेला दिसतो. तर एकूण आत्महत्यांच्या तुलनेत वर्षभरात सात आत्महत्या किरकोळ असल्याचे मत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
चतुर्थ श्रेणीतील पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या अडचणी "सकाळ'कडे मांडताना सांगितले, की पोलिसांसाठी निःशुल्क सेवा मिळणाऱ्या आजारांच्या यादीत मलेरिया, डेंगी, लेप्टो या आजारांचा समावेश नाही. तासन्‌ तास उन्हात गाड्यांच्या धुरात ड्युटी करणाऱ्या पोलिसांना गुडघेदुखी, मणक्‍यांचे आजार, फुप्फुसांचे, डोळ्यांचे विकारही मोठ्या प्रमाणात होतात. मात्र या आजारांवर ओपीडी विभाग नसल्याने रुग्णालयात दाखल होऊनच उपचार करावे लागतात. दुसरीकडे काही डॉक्‍टरांनीही पोलिसांची बोलण्याची पद्धत योग्य नसल्याचे सांगितले. पोलिसांचे संपूर्ण प्रबोधनच झालेले नसते. त्यामुळे ते सर्वच आजारांवरील उपचारांसाठी सवलत मिळावी म्हणून हुज्जत घालतात. अनेकदा ऍडमिट होताना ते स्वतःची ओळखच सांगत नाहीत. त्यामुळे बिल तयार झाले, की पुन्हा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करताना मनस्ताप होतो. एकूणच पोलिसांसाठी गृह खात्याने अनेक सुविधा उपलब्ध केल्या तरी त्या पुरेशा प्रमाणात खालच्या श्रेणीतील पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत नसल्याचे निदर्शनास येते.


(sakal,22 march)

प्राणघातक हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

सहा महिन्यांपूर्वी भोईवाडा येथे राहायला आलेल्या वृद्ध दाम्पत्यावर मारेकऱ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. जखमी पत्नीवर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोईवाडा येथील मोराचीवाडी परिसरात असलेल्या इमारतीत ही गंभीर घटना घडली. गेल्या सहा महिन्यांपासून पंढरीनाथ नारायण कुलकर्णी (67) हे पत्नी प्रेरणा (57) हिच्यासोबत येथे राहत होते. 1984 मध्ये मिलमधील नोकरीवरून निवृत्त झालेले पंढरीनाथ कुलकर्णी यापूर्वी पत्नी प्रेरणासह बोरिवली येथे त्यांचा मुलगा मिलिंद याच्या घरी राहत होते. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दोघांना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेवटचे पाहिले. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा आणि घरात अंधार असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात डोकावून पाहताच दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना दिली. जखमी अवस्थेतील प्रेरणा कुलकर्णी विव्हळत पडल्याचे पाहताच पोलिसांनी त्यांना के.ई.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पंढरीनाथ कुलकर्णी हे मात्र जागीच ठार झाले होते. या दोघांवर अनोळखी मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी प्रेरणा कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर आहे. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडून या हल्ल्यासंबंधी माहिती मिळू शकेल. त्यानंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंबादास गदादे यांनी दिली.

(sakal,20 march)

आयपीएलवरून सरकार व पोलिस अधिकाऱ्यांतही दोन गट

राज्यातील सामने ः अजूनही तळ्यात मळ्यात

लोकप्रिय आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सामने महाराष्ट्रात आयोजित करण्यावरून राज्य सरकारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीप्रमाणेच पोलिस अधिकाऱ्यांतही दोन गट पडले आहेत. मतदानाच्या प्रत्यक्ष तारखा वगळता सामने आयोजित करण्यास मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांची काहीही हरकत नसली तरी राज्याचे पोलिस महासंचालक (निवडणूक) सुप्रकाश चक्रवर्ती यांना मात्र 30 एप्रिलचा मतदानाचा अखेरचा टप्पा होईपर्यंत हे सामने होऊ नयेत, असे ठामपणे वाटते. आपण तसा लेखी अहवाल सरकारला देणार असल्याचे चक्रवर्ती यांनी "सकाळ'ला सांगितले.
आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक आणि त्याची सुरक्षा यावरून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नकारात्मक भूमिका घेतल्यापासून या सामन्यांचे आयोजन अडचणीत आले आहे. विविध राज्यांत असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी त्याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या स्पर्धेचे संयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असल्याने आणि हे मंडळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रभावाखाली असल्याने महाराष्ट्र या स्पर्धांबाबत काय भूमिका घेतो, याला विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या स्पर्धेच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी भूमिका घेतली आहे; मात्र राज्याचा गृहविभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांच्याकडे असल्याने या प्रश्‍नावर मंत्रिमंडळातही संघर्ष उभा राहिला आहे. सामन्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी काल (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री पाटील हेही उपस्थित होते. दीर्घ चर्चेनंतर महाराष्ट्रात आयोजित व्हायच्या एकूण 18 सामन्यांपैकी 14 सामन्यांना वेळापत्रकानुसार "ना हरकत' देण्याचा आणि सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बीसीसीआयला पत्रही जाणे अपेक्षित होते; मात्र मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज रात्रीपर्यंत या पत्रावर सही केली नव्हती.
राज्यातील निवडणुकीची विशेष जबाबदारी सध्या चक्रवर्ती यांच्यावर आहे. त्यांचा मात्र निवडणूक काळात सामने आयोजित करण्याला विरोध आहे. राज्यातील पोलिस बळ मुळात अपुरे असताना ही जोखीम घेऊ नये अशी भूमिका त्यांनी "सकाळ'कडे मांडली. हे सामने मुंबईत ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आणि नागपूरच्या नव्या स्टेडियमवर होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मुंबईतील पोलिसांना मतदानाच्या वेळापत्रकानुसार राज्याच्या इतर भागांत पाठविले जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील पोलिस दल सामन्यांसाठी सुरक्षा पुरविण्यास अपुरे ठरेल, असे त्यांचे मत आहे. "कोणत्याही कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याप्रमाणेच माझी भूमिका आहे. 30 एप्रिलचा मतदानाचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर मात्र हे सामने घेण्याला आपली हरकत नाही', असेही त्यांनी सांगितले.
मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांना मात्र या सामन्यांना सुरक्षा पुरविण्यात काही अडचण येईल असे वाटत नाही. "सामन्यांचे निश्‍चित वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे आमच्या सूचना गृहित धरूनच मंडळ सामन्यांचे वेळापत्रक आखेल. ऐन मतदानाच्या काळात सामने आयोजित केले नाहीत तर काही अडचण येईल असे वाटत नाही', असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

(sakal,20 march )

23 कोटी रुपयांची वीजचोरी

पुण्यातील दोघा बड्या उद्योजक कंपन्यांनी 23 कोटी रुपयांच्या विजेचा अनधिकृतरीत्या वापर केल्याचे उघडकीस आले आहे. विजेचा हा अनधिकृत वापर उघडकीस आणणाऱ्या महावितरणच्या दक्षता आणि सुरक्षा संचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येरवडा परिसरात असलेल्या मे. जेस्को कॉर्पोरेशन या कंपनीने औद्योगिक वापरासाठी वीज घेऊन त्यांच्या युनिटच्या जवळच असलेल्या जीई प्लाझा या व्यापारी संकुलातील व्यावसायिक ग्राहकांना अनधिकृतरीत्या वीज जोडण्या दिल्या होत्या. या संकुलात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र मीटर जोडून देऊन त्यानुसार जेस्को कॉर्पोरेशन कंपनी वीजबिल वसुली करीत होती. एका समांतर वीज वितरण कंपनीप्रमाणे व्यवहार करणाऱ्या जेस्को कंपनीने किमान 21 कोटी 63 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर केल्याचे उघडकीस आले. विजेचा गैरप्रकार उघडकीस येण्याची राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी घटना आहे. याच प्रकारे पुण्यातील मे. साजदा इंडस्ट्रीज या ग्राहकाने एक कोटी 29 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर केल्याचेही उघडकीस आले आहे. हे दोन्ही गैरप्रकार उघडकीस आणणारे पुणे परिमंडळाचे दक्षता, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदूलकर, फिरत्या पथकाचे उपकार्यकारी अभियंते एस. आर. शिरोलीकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (संचालन) विजय सोनवणे आणि विशेष पोलिस महानिरीक्षक व महावितरणचे दक्षता व सुरक्षा मंडळाचे संचालक हेमंत नगराळे उपस्थित होते.

(sakal,18 march)

Wednesday, March 18, 2009

निवडणुकांची जबाबदारी सुप्रकाश चक्रवर्तींवर

पोलिस महासंचालकपद ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियुक्ती

मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील निवडणुकांचे कामकाज पाहण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांची पोलिस महासंचालक (निवडणुका) या पदावर नियुक्ती करण्यात आली. राज्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यात येतील. निवडणुकांत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास कोणत्याही पक्षाचा कितीही मोठा नेता असो, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी बोलताना केले.

उच्च न्यायालयाने निवड अवैध ठरविल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी एस. एस. विर्क यांची सरकारने नेमणूक केली; मात्र विर्क यांना निवडणुकीच्या कामकाजात भाग घेण्यास निवडणूक आयोगाने मनाई केल्याने अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांच्याकडे ही जबाबदारी सरकारने सोपविली. त्यातच कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजीव दयाल हे दीर्घकालीन रजेवर गेले. राज्य पोलिस दलातील एकंदरीत स्थिती पाहता सबंध राज्याच्या निवडणुकीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी महासंचालकपदाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार या पदावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांची नेमणूक करण्यात आली. तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्याच्या पोलिस महासंचालकपदी अनामी रॉय यांच्या झालेल्या नियुक्तीच्या विरोधात चक्रवर्ती यांनी "कॅट'मध्ये व पुढे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चक्रवर्ती यांच्या न्यायालयीन लढाईमुळेच राज्य सरकारला रॉय यांच्या जागी एस. एस. विर्क यांच्या रूपात नवीन पोलिस महासंचालकाची निवड करावी लागल्याचे बोलले जाते. पोलिस महासंचालक कार्यालयात आज सकाळी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. याच वेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यावर भर दिला जाईल. अतिशय निर्भय आणि मोकळ्या वातावरणात या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी संवाद साधताना सांगितले. निवृत्तीला काही महिने असतानाच राज्य निवडणूक आयोगाने दिलेली ही जबाबदारी अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत. निवडणुकीच्या काळात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. निवडणुकांत कसल्याही गैरप्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.


अमानी रॉय नियुक्तीच्या प्रतीक्षेत


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून दूर केल्यानंतर रजेवर गेलेले माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून अधिकृत नियुक्ती होण्याची सध्या आपण वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया रॉय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय सध्या रजेवर आहेत. नियुक्तीचे नवीन आदेश निघेपर्यंत ते रजेवरच राहण्याची शक्‍यता गृह खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तविली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची बदली अथवा नियुक्ती करण्यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. रॉय यांची नवीन पदावर निवड करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू असली तरी त्यांच्या नेमणुकीबाबतचे आदेश निवडणुकीनंतरच निघतील, अशी पोलिस वर्तुळात चर्चा आहे. विर्क यांची पोलिस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर रिक्त असलेल्या गृहनिर्माण खात्याच्या महासंचालकपदावर अनामी रॉय यांची नियुक्ती होण्याचे अथवा केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर जाण्याचे विकल्प उपलब्ध असल्याचे बोलले जाते.

दहावीच्या विद्यार्थिनीची नैराश्‍यातून आत्महत्या

पेपर अवघड गेल्याचा अंदाज


घाटकोपर येथील पंतनगरमधील एका दहावीच्या विद्यार्थिनीने ती राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आज आत्महत्या केली. परीक्षेचा पेपर अवघड गेल्यामुळे आलेल्या तणावातून तिने ही आत्महत्या केल्याचे समजते; परंतु पोलिसांनी आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले. आत्महत्येच्या प्रकारानंतर पंतनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भावी दीपक देसाई (वय 16) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. घाटकोपर पूर्वेला असलेल्या शांतीपार्क सोसायटीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आज सकाळी भूगोल व अर्थशास्त्र या विषयाचा पेपर देऊन ही विद्यार्थिनी घरी परतली. ती गरोडियानगर येथील पुणे विद्याभवनच्या शाळेत शिकत होती. शांतीपार्क सोसायटीतील सरिना अपार्टमेंटमध्ये परतल्यानंतर घरी न जाता ती थेट गच्चीवर गेली. तेथून तिने उडी मारून आपले जीवन संपविले. भावीच्या वडिलांचा रसायन वाहतुकीचा व्यवसाय आहे. आई-वडील आणि तीन बहिणी असे कुटुंब असलेली भावी घरातील सर्वांत धाकटी आणि हुशार मुलगी होती. मात्र परीक्षेचे पेपर अवघड गेल्यामुळे ती निराश झाली होती. या नैराश्‍यातूनच तिने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला आहे. आत्महत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेच्या अधिक चौकशीसाठी तिच्या शाळेत जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

(sakal,17 march)

वायुदलातील अधिऱ्याच्या मुलीचे अपहरण

तरुणीला अटक ः तिच्या साथीदाराचा शोध सुरू

अंधेरी येथे राहणाऱ्या वायुदलातील एका उच्चाधिकाऱ्याच्या तेरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणीला अटक केली आहे. या प्रकरणी तिच्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक अहमदाबाद येथे रवाना झाले आहे. या वायुदल अधिकाऱ्याची ओळख सांगण्यास वर्सोवा पोलिसांनी मात्र नकार दिला.

चांदणी राजू अरोरा (20) असे या मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. वर्सोवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात बंगला येथे राहणाऱ्या या वायुदलातील अधिकाऱ्याला मनाली (15) आणि सोनाली (13, बदललेली नावे) या दोन मुली आहेत. चांदणी अरोरा ही तरुणी या अधिकाऱ्याच्या घरात मुलींची देखभाल आणि घरकाम एक वर्षापासून करीत होती. चांदणी मुलींच्या खोलीतच राहत असे. गेल्या काही दिवसांपासून आठवीला असलेल्या सोनालीची परीक्षा सुरू आहे. 13 मार्चला गणिताचा पेपर अवघड गेल्यामुळे आई-वडिलांचा रोष सहन करावा लागणार, अशी भीती तिला होती. त्यामुळे आदल्या रात्री तिने चांदनीला परीक्षेचा पेपर अवघड गेल्याचे सांगितले होते. आई-वडिलांचा ओरडा खायचा नसेल, तर घर सोडून निघून जाऊया, अशी योजना चांदणीने आखली. दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या पेपरच्या दिवशी सकाळी चांदणी आणि सोनाली या दोघी लवकरच उठल्या आणि घरातून निघून गेल्या. धाकटी मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे वायुदलात बड्या पदावर असलेल्या सोनालीच्या वडिलांनी शोधाशोध करायला सुरवात केली. या वेळी त्यांच्याकडे येणाऱ्या दूधवाल्याने चांदणी आणि सोनालीला अंधेरीला जे.पी. रोडच्या दिशेने सकाळी जाताना पाहिल्याचे सांगितले. यानंतर या वायुदल अधिकाऱ्याने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांताक्रूझ येथील सॉल्वेशन आर्मीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चांदणीच्या बहिणीकडे चांदणीबाबत विचारणा केली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून चांदणी सोनालीला सुरवातीला सुरत येथे घेऊन गेल्याचे कळाले. त्यानंतर ती अहमदाबाद येथे गेल्याचे समजले. वर्सोवा पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांशी संपर्क साधून तेथे सापळा रचून चांदणीला अटक केली. या वेळी तिच्यासोबत असलेल्या सोनालीला ताब्यात घेतले. चांदणीच्या चौकशीत तिचा सा
थीदार रोहित ऊर्फ दीपक याच्या मदतीने ती सोनालीचे अपहरण करणार होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांचे एक पथक अहमदाबाद येथे रोहितच्या शोधासाठी गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश नलावडे यांनी दिली. या प्रकरणी चांदणीला अटक केली असून सोनाली सुखरूप तिच्या आई-वडिलांकडे असल्याचेही नलावडे या वेळी म्हणाले.

(sakal,15 march)

Tuesday, March 17, 2009

सुमन मोटेल्स'च्या सुरेंद्र खंदारला जामीन


गुंतवणूकदारांची फसवणूक ः पत्नी, मुलाचीही सुटका


हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला सुमन मोटेल्स कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र खंदार, त्याची पत्नी भारती व मुलगा तेजस या तिघांची भोईवाडा येथील सुटीकालीन न्यायाधीशांनी जामिनावर सुटका केली. अजामीनपात्र गुन्ह्यातून कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत स्वतःची सुटका करून घेणाऱ्या खंदार आणि त्याच्या संचालक मंडळाविरुद्ध विविध राज्यांतून येणाऱ्या अटक वॉरंटस्‌ व समन्समुळे स्थानिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
माटुंगा-पूर्वेला तेज गौरव हाऊस येथे राहणाऱ्या सुरेंद्र, त्याची पत्नी भारती खंदार यांच्याविरुद्ध गुजरात राज्यातील मेहसाणा, अलाहाबाद व अंधेरी न्यायालयातून समन्स व अटक वॉरंट बजावण्यात आले होते. हे वॉरंट देण्यासाठी गेलेल्या माटुंगा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरेंद्र खंदार व त्याची पत्नी भारती यांना पोलिसांनी पकडले. या वेळी सुरेंद्र खंदार व त्याचा मुलगा तेजस यांनी पोलिसांनाच मारहाण केली. या तिघांना अटक केल्यानंतर भोईवाडा न्यायालयाने पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी 10 हजार रुपये; तर वॉरंटप्रकरणी प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. या वेळी न्यायालयाने गुजरात, अलाहाबाद व अंधेरी येथील तारखांना हजर राहण्यासंबंधीचा बॉण्ड लिहून घेतला.
"सुमन मोटेल्स'च्या संचालक मंडळाविरुद्ध देशभरातील 62 हजार 552 गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गुंतवणूकदारांना देशोधडीला लावणाऱ्या "सुमन मोटेल्स'च्या संचालक मंडळाविरुद्ध देशभरातील न्यायालयातून आजवर 500 च्यावर अटक वॉरंट व समन्स बजावण्यात आली आहेत. माटुंगा येथे गेली अनेक वर्षे वास्तव्य असलेला सुरेंद्र खंदार विविध राज्यांतून बजावण्यात आलेली वॉरंट देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सापडतच नाही. अनेकदा खंदार यांचा मुलगाच पोलिसांच्या हाती सापडतो. त्याशिवाय "सुमन मोटेल्स'च्या विविध ठिकाणी असलेली कार्यालये सुरेंद्र खंदारने भाडेतत्त्वावर दिले असल्याने देशभरातून आलेल्या न्यायालयाच्या नोटिसादेखील तशाच परत जातात. कायद्याप्रमाणे महिलांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने सुरेंद्र खंदार व त्याची पत्नी अनेकदा रात्रीचेच घरी येतात आणि सूर्योदयापूर्वी निघून जातात. अटक वॉरंट अथवा समन्स नसल्यावर काही वेळा आरोपी समोर असले तरी त्यांच्यावर कारवाई करणे अवघड होते. कायद्यातील पळवाटांमुळे या आरोपींचे फावत असल्याचे माटुंग्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
"सुमन मोटेल्स'च्या हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांचा लढा अद्याप सुरू आहे. ग्राहक न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे गुंतवणूकदार चेतन कोठारी यांना त्यांनी गुंतविलेल्या तीन लाख रुपयांच्या मोबदल्यात पाच लाख रुपये मिळाले आहेत; मात्र फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या पदरी अद्याप फुटकी कवडीदेखील पडली नसल्याचे चित्र आहे. या गुंतवणूकदारांनाही त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार चेतन कोठारी यांनी व्यक्त केली.


(sakal,12 march)

सोळावर्षीय युवतीकडून एलआयसी एजन्टचा खून

दारूचे व्यसन जडलेल्या सोळावर्षीय तरुणीने पैशांसाठी आपल्या साथीदाराच्या मदतीने दारूच्या नशेतच एका एलआयसी एजन्टचा वसईच्या बाफना फाटा येथे बांबूने आणि दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट -12 च्या पोलिसांनी आरोपी युवतीला पकडून माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बोरिवलीच्या काजूपाडा परिसरात राहणारा एलआयसी एजन्ट रत्नाकर कोंडलकर (50) यांचा मृतदेह माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 मार्चला सापडला होता. या वेळी मारेकऱ्यांनी कोंडलकर यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि चिनी बनावटीचा मोबाईल चोरून नेल्याचे तपासात उघडकीस आले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोंडलकर यांचा मोबाईल दहिसर पूर्वेला आपल्या आजी आजोबांसह राहणाऱ्या गुडिया नावाच्या सोळा वर्षांच्या युवतीकडे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती दारूचे व्यसन असलेल्या गुडियाने जेवणाकरिता पैसे मिळावेत या उद्देशाने साथीदार रिक्षाचालक दिनेश चतुर्वेदी ऊर्फ मनोज चौबे (35) याच्यासोबत कोंडलकर यांची हत्या केल्याची कबुली दिली. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी केलेल्या दुसऱ्या विवाहामुळे आजी-आजोबांकडे राहणाऱ्या गुडियाला दारूचे व्यसन जडले होते. त्यासाठी अनेकदा ती अनोळखी व्यक्तींसोबतही मैत्री करायची. 4 मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दारू पिण्याकरिता ती तिच्या ओळखीच्या दिनेश चतुर्वेदीसोबत गेली होती. दारू पिल्यानंतर दोघांना जेवणासाठी पैसे हवे होते. त्यासाठी दिनेशने त्याच्या ओळखीच्या असलेल्या कोंडलकर यांना वसई येथे माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाफना फाटा येथे नेले. त्यानंतर तेथे दोघांनी कोंडलकर यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देत नसल्याचा राग मनात धरून दोघांनी कोंडलकर यांना दगड आणि बांबूने बेदम मारहाण करून ठार मारले.
याप्रकरणी दिनेश चतुर्वेदी अद्याप फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(sakal,12 march)

स्वतःच्या मुलाची हत्या करणाऱ्या केशवराव भोसलेंना पश्‍चाताप

19 मार्चपर्यंत कोठडी ः गोळ्या घालून मुलाची हत्या

मालमत्तेच्या वादातून स्वतःच्या दोघा मुलांवर गोळीबार आणि त्यातील एकाची हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते केशवराव भोसले यांना मलबार हिल पोलिसांनी काल अटक केली. आज न्यायालयात हजर करण्यात आलेल्या भोसलेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. दरम्यान, मुलांवर केलेल्या गोळीबारप्रकरणी आता केशव भोसलेंना पश्‍चाताप होत असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली.

मलबार हिल येथील "पार्श्‍व' इमारतीत राहणाऱ्या केशवराव भोसले यांनी पहिल्या पत्नीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच राजेश आणि गणेश या दोन मुलांवर 6 मार्चला गोळीबार केला होता. या गोळीबारात गणेश भोसले छातीत आणि डोक्‍यात गोळ्या लागल्याने ठार झाला, तर दुसरा मुलगा राजेश याच्यावर अद्याप सेंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांनी हातावर तलवारीने वार केल्यामुळे जखमी झालेल्या केशवराव भोसलेंवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रुग्णालयातून बाहेर पडलेल्या भोसलेंना मलबार हिल पोलिसांनी अटक केली. आज सकाळी त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. पत्नीच्या निधनानंतर दोन मुलांवर अतोनात प्रेम करणाऱ्या भोसलेंनी महालक्ष्मी रेसकोर्सवर दोघांची लग्ने मोठ्या धडाक्‍यात केली होती. गेल्या शुक्रवारी लहानशा वादातून उद्‌भवलेल्या गोळीबाराच्या गंभीर प्रकरणानंतर भोसलेंना पश्‍चातापाशिवाय काहीच करता येत नसल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. राजभवन येथील तस्करी प्रकरणात गुंतलेले भोसले गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय सहभागी झाले होते. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर खेड येथून विधानसभेची निवडणूकही लढविली होती. गेल्या काही दिवसांपासून ते कॉंग्रेस पक्षात सामील झाले होते.


(sakal,12 march)

रजा रद्द तरी कर्तव्यासाठी सज्ज

पोलिसांवर तिहेरी ताण : शिवजयंतीपर्यंत उसंत नाही

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा नेहमीच सज्ज असते. सणासुदीला तर पोलिस अहोरात्र काम करताना दिसतात. या महिन्यात पोलिसांवर तिहेरी ताण पडला आहे. होळी, ईद-ए मिलाद आणि तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती असे सण-उत्सव एकामागोमाग आल्याने पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र "सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद तंतोतंत पाळत पोलिस आपले काम चोख बजावत आहेत. कोणतीही कुरबूर न करता ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत.
नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईत सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडतात. उत्सव काळात घातपात घडवून अधिकाधिक हानी घडविण्याचे दहशतवादी संघटनांचे मनसुबे असतात. म्हणूनच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना सतत जागता पहारा ठेवावा लागतो. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तर सुरक्षिततेसंबंधी पोलिसांना अधिक खबरदारी घ्यावी लागत आहे. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांना गेल्या तीन महिन्यांत खूप कमी रजा मिळाल्या आहेत. मुंबई हल्ल्याचे आरोपपत्र दाखल होईपर्यंत काही पोलिसांच्या साप्ताहिक रजाही बंद करण्यात आल्या होत्या.
मुंबईत होळी, धुळवड, ईद ए मिलाद आणि तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची कसून चौकशी केली. ईद-ए मिलादनिमित्त मुस्लिमबहूल भागातून जुलूस निघतात. यामध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते. यानंतर धुळवडीच्या दिवशीही हा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. रंग लावण्यावरून होणाऱ्या वादाचे पर्यवसान मोठ्या घटनांत होऊ नये यासाठी काही ठिकाणी पोलिस होळी खेळणाऱ्या तरुणांना हा उत्सव शांततेत साजरा करण्याची समज देतानाही दिसत होते. पोलिसांचा बंदोबस्त शिवजयंतीपर्यंत तसाच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत पोलिसांना उसंत मिळण्याची चिन्हे कमीच आहेत.

--------

पोलिस उपनिरीक्षकाचे ठाण्यातच निधन


डोंगरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाचे पोलिस ठाण्यातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. मधुकर किसन साठे (43) असे त्यांचे नाव आहे. कर्तव्यावर असताना अशा प्रकारे अधिकाऱ्याचे निधन झाल्यामुळे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या ताणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डोंगरी पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले मधुकर किसन साठे (43) काल रात्रपाळीला कामाला होते. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पोलिस ठाण्यातच त्यांच्या छातीत कळा यायला लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढच्याच क्षणात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍यामुळे त्यांचे निधन झाले. कळवा येथे राहणारे पोलिस उपनिरीक्षक साठे गेली काही वर्षे डोंगरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कळवा येथील घरी नेण्यात आला. साठे यांच्या पार्थिवावर त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ऐन धुळवडीच्या दिवशी साठे यांचे कर्तव्यावर निधन झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांवर असलेल्या कामाच्या ताणाबाबत पुन्हा एकदा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

(sakal,11 march)

सुमन मोटेल्सच्या व्यवस्थापकीय संचालकास अटक

गुंतवणूकदारांची फसवणूक : कोट्यवधी रुपयांचा गंडा

हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी पोलिसांना हव्या असलेल्या सुमन मोटेल्सच्या व्यवस्थापकीय संचालकासह तिघा जणांना माटुंगा पोलिसांनी आज अटक केली. वॉरन्ट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आल्याचे माटुंगा पोलिसांनी सांगितले.

माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सुमन मोटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र खंदार, त्यांची पत्नी व संचालक भारती खंदार यांच्याविरुद्ध न्यायालयातून आलेले वॉरंट बजावण्यासाठी आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिस गेले होते. या वेळी घरात असलेल्या सुरेंद्र खंदार आणि त्यांचा मुलगा तेजस यांनी पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. धक्काबुक्कीनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तिघांना पोलिसांनी अटक केली.

देशभरातील गुंतवणूकदारांना फसविल्याप्रकरणी सुमन मोटेल्सच्या संचालक मंडळाविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही वर्षांत सुमन मोटेल्सविरुद्ध विविध राज्यांतून दीडशेहून अधिक अटक वॉरंट आणि तेवढेच समन्स आले होते. हॉलिडे होम्स, वृक्षलागवड आणि रिसॉर्टस्‌च्या 12 आकर्षक योजनांच्या माध्यमातून 62550 गुंतवणूकदारांना कोट्यवधींना फसविल्याचा सुमन मोटेल्सचा मोठा घोटाळा 2001 मध्ये उघडकीस आला होता.

(sakal,11 march)

कसाबच्या सुरक्षेसाठी 175 जवान

जयंत पाटील ः केंद्र सरकारची प्रस्तावाला मंजुरी


मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसचे 175 जवान पाठविण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहा अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांच्या ताब्यात आहे. लष्कर-ए-तय्यबाशी संबंध असलेल्या कसाबने या हल्ल्यासंबंधिची इत्थंभूत माहिती भारतीय तपास यंत्रणांना दिली आहे. त्यामुळे त्याच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. अंडरवर्ल्ड टोळ्या तसेच लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्‍यांकडून कसाबचा घात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या कसाबला उच्च दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्ध असलेला एकमेव पुरावा म्हणून कसाबच्या सुरक्षिततेचा विचार करता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केली होती. राज्य सरकारची ही विनंती केंद्राने मान्य केली असून पावणेदोनशे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसचे पावणेदोनशे जवान मुंबईत पाठविण्यात येणार असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले. ऑर्थर रोड कारागृहात कसाबवरील खटला सुरू असताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.


(sakal,9 march)

कॉंग्रेसनेते केशवराव भोसलेंचा स्वतःच्याच मुलांवर गोळीबार

मालमत्तेचा वाद ः एकाचा मृत्यू; दुसऱ्याची मृत्यूशी झुंज

पहिल्या पत्नीच्या दोघा मुलांसोबत मालमत्तेच्या विभागणीवरून झालेल्या वादात कॉंग्रेसचे नेते केशवराव भोसले आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी परस्परांवर रिव्हॉल्व्हर आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक मुलगा ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी मलबार हिल येथे घडली. या वेळी तलवार हल्ल्यात जखमी झालेले भोसले आणि गोळ्या लागलेला एक मुलगा या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या पत्नीच्या श्राद्धाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे भोसले यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाळकेश्‍वर येथील बाणगंगा परिसरात असलेल्या "पार्श्‍व' अपार्टमेंटमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केशवराव यांच्या पहिल्या पत्नीच्या आज असलेल्या वर्षश्राद्धासाठी त्यांची दोन मुले राजेश (28) आणि गणेश (30) हे उपस्थित होते. श्राद्धाचा कार्यक्रम झाल्यानंतर केशवराव त्यांच्या दोघा मुलांसोबत बसले होते. या वेळी मालमत्तेच्या विभागणीवरून बाप-लेकांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान काही क्षणातच हाणामारीत होऊन मुलांनी भोसले यांना मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी एकाने घरात असलेल्या तलवारीने भोसले यांच्यावर वार केला. त्यानंतर रागाच्या भरात भोसले यांनी स्वतःकडील रिव्हॉल्व्हर काढून गणेश आणि राजेशच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. दोन गोळ्या गणेशच्या छातीत आणि डोक्‍यात शिरल्या, तर राजेशच्या पोटात आणि गालाला गोळ्या लागल्या. "पार्श्‍व' इमारतीत पहिल्या व सहाव्या मजल्यावर त्यांचे एकूण तीन फ्लॅट आहेत. येथील एका बंद खोलीत घडलेली ही घटना इमारतीतील रहिवाशांना कळण्यास फारसा वेळ लागला नाही. जखमी अवस्थेतील तिघांनाही नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. गोळ्या लागलेल्या गणेशचा सेंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर जखमी राजेशवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांच्या तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या केशव भोसलेंवर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसले यांच्या उजव्या हातावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. भोसले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. भोसले यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा परवाना खेड येथून मिळविलेला असून, पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने खेड येथून 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविलेले भोसले मुंबई पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होते. 1984 मध्ये राजभवन परिसरात झालेल्या एका तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या भोसले यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेलेले भोसले गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला सारले गेले होते. काही वर्षांपूर्वी भोसले यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही मुलांची लग्ने महालक्ष्मी रेसकोर्सवर थाटामाटात केली होती. आज त्यांनी याच मुलांवर मालमत्तेच्या वादातून गोळीबार केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी दिली.

(sakal,6 march)

गुन्हेगारीचे बदलते चित्र मन हेलावणारे

राकेश मारिया : पोलिसांसोबत नागरिकांचा पुढाकार गरजेचा

बाबरी मशिदीच्या पतनानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डला धार्मिक रेषेने विभागले. यापूर्वी घातपाती कारवायांकरिता अशिक्षित आणि गरजूंचा वापर केला जात असे; मात्र इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना अटक केल्यानंतर या कारवायांसाठी उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील तरुणांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्हेगारीविश्‍वाचे हे बदलते चित्र मन हेलावणारे असून, शांतता प्रस्थापित होण्यासाठी आता पोलिसांसोबत नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्‍यक झाल्याचे मत गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केले.

"प्रेस क्‍लब ऑफ मुंबई'च्या वतीने "मुंबईतील गुन्हेगारीचे बदलते स्वरूप' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राकेश मारिया बोलत होते. गेल्या दोन दशकांपासून मुंबई दहशतवाद्यांचे मुख्य टार्गेट झाले आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर झालेला हल्ला सर्वसामान्यांच्या विचारापलीकडचा आहे. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी जगतात झालेल्या बदलांमुळे गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांसमोरही बरीच आव्हाने निर्माण होत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले.
...............
रामपुरी ते एके-47
1960 पासून रामपुरी चाकूने सुरू झालेला मुंबईतील गुन्हेगारीचा अध्याय आता एके-47 पर्यंत पोहोचल्याचे विशद करताना हाजी मस्तान, करीम लाला, युसूफ पटेल यांच्या गुन्हेगारी टोळ्यांची माहितीही त्यांनी दिली. 22 व 23 नोव्हेंबर 1969 च्या मध्यरात्री पहिल्यांदा गुन्हेगारी विश्‍वात रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला. त्या वेळी दारू, वेश्‍याव्यवसाय, मटका यांसारख्या व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी दादागिरी सुरू असायची. यानंतरचा काळ वरदराजन, दाऊद, शरद शेट्टी, बडा राजन, करीम लाला यांसारख्या गुन्हेगारांनी गाजविला. 1990 मध्ये मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी खंडण्या उकळायला सुरुवात केली. 1992 नंतर मात्र गुन्हेगारीचे स्वरूप पुरते बदलून गेल्याचे मारिया यांनी सांगितले.
..............
धार्मिक दुही
6 डिसेंबर 1992 ला झालेले बाबरी मशिदीचे पतन आणि त्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबईतील अंडरवर्ल्डचे धार्मिक दुहीत विभाजन केले. मार्च 93 ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर मुंबईवर दहशतवादी कारवायांना सुरुवात झाली. या कारवायांसाठी सीमेपलीकडे बसलेल्या घातपाती शक्तींनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचाच वापर केला. गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी आणि दहशतवादी घडामोडींत आमूलाग्र बदल झाले. आता अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये खबऱ्यांची संख्याही कमी झाल्यामुळे अनेकदा पोलिसांना पक्की माहिती मिळत नसल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

(sakal,5 march)

भारतीय नौदलाचा "सिंदबाद' जगप्रवासाला

लाटांवर स्वार ः 15 ऑगस्टपासून समुद्र सफरीला प्रारंभ

भारतात तयार करण्यात आलेल्या बोटीतून खवळलेल्या समुद्राच्या लाटांवर स्वार होत पृथ्विप्रदक्षिणा करण्यासाठी भारतीय नौदलाचा एक अधिकारी सज्ज झाला आहे. गोव्याहून मुंबईतील नौदलाच्या पश्‍चिम विभागीय नौदल तळावर पोचलेला दीपक दोंदे हा नौदल अधिकारी आवश्‍यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर येत्या 15 ऑगस्टपासून मुंबईतूनच जगप्रवासाला निघणार आहे.

भारतीय नौदलाच्या "सागर परिक्रमा' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर सागरी मार्गाने एकट्याने प्रवास करणारा दीपक दोंदे पहिला भारतीय नौदल अधिकारी ठरणार आहे. तीन वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पासाठी गोवा येथे "म्हादाई' ही बोट बनवून आज याच बोटीने दीपक दोंदे मुंबईत पोचले. नौदलाचे पश्‍चिम विभागीय प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी एका कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा केली. मुंबईत असलेल्या नौदल तळावर दोंदे प्रवासाकरिता आवश्‍यक असलेले प्रशिक्षण घेणार आहेत. नऊ महिन्यांच्या या प्रवासात दोंदे ऑस्ट्रेलियाच्या फ्रेमेन्टस, न्यूझीलंडच्या ख्रिस्तचर्च, दक्षिण अमेरिकेत पोर्ट सॅटन्ली आणि दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन या चार ठिकाणी थांबणार आहेत. या प्रवासात खाण्याचे साहित्य, प्रथमोपचारसासाठी आवश्‍यक ती औषधे, आपत्कालीन वेळी बोटीची दुरुस्ती करण्यासाठीची उपकरणे यांच्यासह खूपशी पुस्तके नेण्याचा आपला मानस असल्याचे दोंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
सुमारे एकवीस हजार नॉटिकल मैलांच्या या जगप्रवासाच्या प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या बोटीसाठी परदेशातूनही आवश्‍यक ते साहित्य मागविण्यात आले आहे. मुंबईतील प्रशिक्षण काळात दोंदे मॉरिशस येथे बोटीने जाऊन परत मुंबईत येणार आहेत. यापूर्वी नौदलाच्या आयएनएस - तारांगिनी या बोटीसह ते अमेरिकेला गेले होती, अशी माहितीही पश्‍चिम विभागीय नौदलाचे प्रमुख वॉइस ऍडमिरल जे. एस. बेदी यांनी पत्रकारांना दिली. दोंदे यांच्या या प्रवासाची इत्थंभूत माहिती व्हावी, यासाठी बोटीवर कॅमेरे लावण्यात येणार असल्याचेही बेदी या वेळी म्हणाले.

(sakal,5 march)

नग्नावस्थेतील छायाचित्रांद्वारे डॉक्‍टर तरुणीला ब्लॅकमेलिंग

सायबर क्राईम ः आयटी तंत्रज्ञाला पुण्यातून अटक

इंटरनेटवर ओळख झालेल्या मुंबईतील डॉक्‍टर तरुणीला लग्नाच्या आमिषाने पुण्यात बोलाविल्यानंतर तिला मद्यातून गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेत तिची छायाचित्रे काढणाऱ्या बड्या आयटी कंपनीच्या सहायक उपाध्यक्षाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. समीर परीजा (40) असे या तंत्रज्ञाचे नाव आहे.

नोकरीसाठी पुण्यात वास्तव्याला असलेल्या समीर परीजा याला वार्षिक साडेसतरा लाख रुपये पगार होता. आर्थिक मंदीमुळे दीड महिन्यापूर्वी त्याला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. इंटरनेटवर चॅटिंग करताना मुंबईतील एका एमबीबीएस डॉक्‍टरशी त्याची ओळख झाली. या तरुणीशी राज नावाने चॅटिंग करणाऱ्या समीरने तिला लग्नाची मागणी घालत तिचे अर्धनग्न छायाचित्र इमेलवर पाठविण्यास सांगितले. फक्त चॅटिंगवरून झालेल्या ओळखीमुळे सुरवातीला तिने स्वतःऐवजी एका मॉडेलचे अर्धनग्न छायाचित्र त्याला पाठविले. आपल्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुण्यात भेटायला त्याने बोलावले. एप्रिल 2008 मध्ये ही तरुणी राजची सर्व माहिती घेण्यासाठी समीरला भेटायला पुण्यात गेली. पुण्यात एका प्रसिद्ध तारांकित हॉटेलमध्ये दोघेही एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. या वेळी त्याने डॉक्‍टर तरुणीच्या मद्यात गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध केले. यानंतर त्याने तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून समीर या तरुणीला या छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करीत होता. अखेर या तरुणीने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी समीर याला बंगळुरू येथून अटक केली. समीरचे दहा वर्षांपूर्वीच लग्न झाले असले, तरी त्याने यापूर्वी अशा प्रकारे अनेक तरुणींना फसविल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले

(sakal,3 march)

पोलिस महासंचालकाचे नाव आज जाहीर होणार

जयंत पाटील : रॉय यांचे नावही चर्चेत

राज्याचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पोलिस महासंचालकांच्या नावाची घोषणा उद्या (ता. 4) करण्यात येणार आहे. या पदाकरिता गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असले, तरी विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांचेदेखील नाव चर्चेत असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. खुद्द गृहमंत्री जयंत पाटील यांनीही या पदासाठी उद्या घोषणा करणार असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.
तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्य सरकारने अनामी रॉय यांची गेल्या वर्षी पोलिस महासंचालकपदावर निवड केली. उच्च न्यायालयाने ही निवड बेकायदा ठरवीत या पदावर नव्या अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली. या आदेशानंतर सरकारकडून पुढील निर्णय होईपर्यंत राज्याचे विद्यमान पोलिस महासंचालक दीर्घ रजेवर गेले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या पदावर तातडीने नियुक्ती होणे आवश्‍यक असल्याचे लक्षात घेता या पदावर नवीन अधिकाऱ्याची उद्या घोषणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन पोलिस महासंचालक पदासाठी रॉय यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात या पदाकरिता फक्त गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क आणि विद्यमान पोलिस महासंचालक अनामी रॉय यांच्यातच स्पर्धा असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले

(sakal,3 march)

सुरक्षित मुंबईसाठी "जागृत मुंबईकर' मोहिमेला सुरुवात

गुन्हेगारीबाबत प्रबोधन : पोलिस, अग्निशमन दल, युरोका फोर्ब्सचा उपक्रम

"ये सरकार का प्रॉब्लेम है.. मेरे घर को तो कोई छू भी नही सकता..! ' सामान्य नागरिकांच्या डोळ्यात त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी जळजळीत अंजन घालणारी ही जाहिरात वाहिनीवर नेहमीच झळकताना दिसते. स्वतःच्या सुरक्षिततेसंबंधी बेफिकीर असणाऱ्या सामान्य नागरिकांना शहरातील वाढती गुन्हेगारी आणि घातपातांच्या घटनांची जाणीव करून त्या रोखण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या "जागृत मुंबईकर' या उपक्रमाची आज सुरुवात झाली. मुंबई पोलिस, अग्निशमन दल आणि युरेका फोर्ब्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात युरेका फोर्ब्सचे सात हजार कर्मचारी (युरोचॅम्प) मुंबईकरांना सुरक्षिततेचे धडे देणार आहेत.

स्वतःच्या घराबाहेर घडणारे गुन्हे, अतिरेकी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, आगीसारख्या घटनांबाबत सामान्य नागरिक उदासीन असतात. हा प्रकार स्वतःबाबत झाल्यावर त्यांचे गांभीर्य लक्षात येते. या घटनांबाबत नागरिकांमध्ये दक्षता निर्माण होण्यासाठी युरेका फोर्ब्सचे "युरोचॅम्प' मुंबईतील किमान शंभर घरे असलेल्या प्रत्येक सोसायटीत पोचणार आहेत. या सोसायट्यात तेथील नागरिकांना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या असामाजिक घटना रोखण्यासंबंधी मार्गदर्शन करतील. "निश्‍चितपणे सुरक्षित राहा' असे घोषवाक्‍य घेऊन मुंबईकरांना त्यांच्या सुरक्षिततेचे धडे देणाऱ्या या युरोचॅम्पसोबत अनेकदा मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान असतील. घरात नोकर ठेवताना घ्यायच्या दक्षता; तसेच रस्त्यावर फिरताना कान आणि डोळे उघडे ठेवून एखाद्या घातपाती कारवाईला आळा कशा प्रकारे घालावा यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाईल. पोलिस आयुक्त हसन गफूर, अग्निशमन दलाचे प्रमुख पी. डी. करगोप्पीकर व युरेका फोर्ब्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एल. गोकलानी यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानात वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून सामान्य नागरिकांपर्यंत सुरक्षिततेचा संदेश दिला जाणार आहे. अनेकदा दैनंदिन गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांना प्रबोधन करणे गरजेचे असते. युरेका फोर्ब्सच्या माध्यमातून हा प्रयत्न पूर्ण होईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी व्यक्त केला.आयपीएल'साठी कडक


---------


मुंबईतील क्रिकेटपटूंची सुरक्षितता वाढविणार

कराची येथे श्रीलंकन क्रिकेटपटूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांकरिता येणाऱ्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेसंबंधी अधिक कडक उपाययोजना करण्यात येतील. याशिवाय मुंबईत राहणाऱ्या क्रिकेटपटूंच्या संरक्षणात आवश्‍यकता भासल्यास वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली.
मुंबईत होणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच प्रचंड गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेच्या वेळी हजारहून अधिक गणवेशधारी पोलिस मैदानात तैनात केले होते. साध्या वेशातील पोलिस प्रेक्षकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी नेमले होते. क्‍लोज सर्किट टीव्हीच्या मदतीने मैदान आणि परिसरातील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांचे लक्ष होते. या प्रकारच्या अत्युच्च दर्जाची सुरक्षितता मुंबईत होणाऱ्या आयपीएलच नव्हे, तर अन्य आंतरराष्ट्रीय आणि प्रचंड गर्दी असणाऱ्या स्पर्धांकरिता दिली जाणार असल्याचे गफूर यांनी सांगितले.

कसाबचे संरक्षण

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस दलाच्या पोलिसांना त्याच्या सुरक्षिततेसाठी पाचारण केले जाणार आहे. पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत कसाबच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आवश्‍यक ती खबरदारी घेत असल्याचे सांगितले. कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात हलविण्यापूर्वीच येथील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याचेही गफूर या वेळी म्हणाले.


(sakal,3 march)

खंदकांचे जड झाले ओझे...

कमी पोलिस बळ ः खंदक झाले सायकलींचे स्टॅण्ड


मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यांसारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत; तसेच अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून मुंबई व ठाणे शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या खंदकांत पोलिसच तैनात नसल्याने हे खंदक आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ आणि रेल्वेस्थानकांवर असलेल्या या खंदकांमुळे नागरिकांना साधे चालणेही शक्‍य होत नाही.

सागरी मार्गाने आलेल्या "लष्कर-ए-तैयबा'च्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत थैमान घातले होते. तीन दिवस चाललेल्या अतिरेक्‍यांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांत आत्मविश्‍वास निर्माण व्हावा; तसेच अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या वेळी तातडीने कारवाई करणे शक्‍य व्हावे, यासाठी मुंबई शहरात 400 ठिकाणी कायमस्वरूपी खंदक उभारण्यात आले आहेत. या खंदकांमध्ये दिवसरात्र शस्त्रधारी पोलिस तैनात करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन पोलिसांनी दिले होते. मुंबईतील हल्ल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रेल्वेस्थानके, विमानतळ, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे यांच्यासह शहरात असलेल्या संवेदनशील ठिकाणी रेतीने भरलेल्या गोण्यांच्या साह्याने उभारण्यात आलेल्या या खंदकांमध्ये शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले; मात्र काही दिवसांतच बहुतांश ठिकाणी असलेल्या खंदकांत पोलिसांनी उभे राहणेच बंद केले आहे. खंदकांमध्ये पोलिसांनी थांबणे बंद केल्यामुळे काही ठिकाणी खंदकांची दुरवस्था झाली आहे. या खंदकांसाठी वापरलेल्या गोणी रस्त्यात अस्ताव्यस्त पडल्या आहेत. काही ठिकाणी या खंदकांचा उपयोग सायकली उभ्या करण्यासाठी होताना दिसतो. एका खंदकासाठी दिवस आणि रात्रपाळी असे मिळून प्रत्येकी आठ पोलिस ठेवण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना किमान चार शस्त्रधारी पोलिस या खंदकांमध्ये कायमस्वरूपी दिसत असत. डोळ्यांत तेल घालून मुंबईत पहारा करणारे हे पोलिस पाहून नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती; शिवाय गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांनाही या पोलिसांचा धाक निर्माण झाला होता. मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत निर्माण झालेली भीती ओसरल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असलेल्या या खंदकांत पोलिस तैनात करणे बंद करण्यात आल्याचे समजते. न
ागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण कटिबद्ध आहोत; मात्र शहरातील संवेदनशील ठिकाणी उभारण्यात आलेल्या या खंदकांत दिवसरात्र पोलिस तैनात करणे कमी मनुष्यबळामुळे शक्‍य होत नसल्याचे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-------

मुंबई हल्ल्यानंतर नागरिकांत असलेली भीती दूर करण्यासाठी हे खंदक उभारण्यात आले; त्यात आता 24 तास पोलिस उभे राहण्याची आवश्‍यकताही नाही. घातपाती कारवाया करणाऱ्यांसोबत मुकाबला करताना खंदक बांधणे शक्‍य होत नाही. अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांना तातडीने "पोजिशन' घेता यावी यासाठी संवेदनशील ठिकाणी हे खंदक उभारण्यात आले आहेत. तसेच अल्प मनुष्यबळाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडे चार हजार नवीन पदे भरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- विजयसिंग जाधव (पोलिस उपायुक्त, मुख्यालय)

(sakal,2 march)