Wednesday, March 31, 2010

शिक्षण क्षेत्रात ऑल इज नॉट वेल

गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रे..
गिव्ह मी अनादर चान्स, आय वान्ना ग्रोन अप वन्स अगेन..!


आमीर खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "थ्री इडियटस्‌' या चित्रपटातलं हे गाणं. पालक, शिक्षक आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडन्टच्या तोंडून येणारे हे गाणे आजच्या शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेवर अतिशय उत्तमरीत्या भाष्य करणारे आहे. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या मार्कांच्या स्पर्धेला कंटाळून दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिरात सातवीत शिकणारा सुशांत पाटील हा विद्यार्थी आणि नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर यांनी आत्महत्या करून त्यांचे आयुष्य संपविल्याच्या घडलेल्या प्रकारानंतर शिक्षण क्षेत्रातली ही स्पर्धा दिवसेंदिवस प्राणघातक ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या बेसुमार स्पर्धेमुळे विद्यार्थी हा घटक मार्क मिळविण्याचे मशीन झाला आहे. त्यातूनच शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी असलेल्या आपल्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याचा प्रकार पालकांत गेल्या काही वर्षांत वाढीला लागला आहे. अनेकदा विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता त्याच्याकडून 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविण्याचा पालकांचा हव्यास मुलांसाठी प्राणघातक ठरू पाहत आहे; तर काही वेळा गुणवत्ता असूनही पालक, शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना फक्त मार्कांच्या दबावाखाली ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांकडून स्वतःला संपविण्याचे प्रकार घडत आहेत.
"थ्री - इडियटस्‌' या चित्रपटात इम्पीरिअल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणारा "जय' नावाचा विद्यार्थी त्याचा फायनल इयरचा प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी प्राचार्यांकडून काही दिवसांची मुदत वाढवून मागतो. हेलिकॉप्टरमध्ये क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविण्याचा जयचा प्रोजेक्‍ट पूर्ण झाल्यानंतर त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण होणार असते. मात्र, प्राचार्य त्याच्या प्रोजेक्‍टची मुदत वाढवून देत नसल्याने नापास होण्याच्या चिंतेत जय दडपणाखाली येतो. दडपण सहन न झाल्याने तो कॉलेजच्या होस्टेलमध्येच आत्महत्या करतो. हा प्रकार त्यानेच तयार केलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविलेल्या हेलिकॉप्टरमधून आमीर खान आणि त्याच्या मित्रांना दिसतो. हुशार असूनही एका उदयोन्मुख अभियंत्याने अशा प्रकारे आयुष्य संपविल्याचा हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. दादर आणि पवई येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या चित्रपटातील याच प्रसंगातून प्रेरणा घेऊन केल्याचे सांगण्यात येत आहे. नेरूळच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या फर्स्ट ईयरला असलेल्या भजनप्रीतकौर बुलेर या विद्यार्थिनीने अनुत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या खोलीत आत्महत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात तिच्या खोलीच्या भिंतीवर "मला 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवायचेच आहेत'; तसेच "मला परीक्षेत चांगले गुण मिळवायचेच आहेत' असे लिहून ठेवले होते. दहावीला 48 टक्के आणि बारावीला जेमतेम 56 टक्के गुण मिळविणाऱ्या भजनप्रीतकौरला तिच्या वडिलांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र, पहिल्या टर्ममध्ये चार आणि दुसऱ्या टर्ममध्ये तीन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तिचा मोठा भाऊ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे; तर तिच्या मोठ्या बहिणीने स्वित्झर्ल
ंड येथे पायलट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. क्षमता नसतानाही केवळ आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून फिजिओथेरपी करणारी बुलेर अनुत्तीर्ण झाली. पाल्यावर अपेक्षांचे ओझे न टाकता त्याला त्याच्या क्षमतेला साजेसे; मात्र तितकेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची पद्धत सुरू होणे, ही सध्या काळाची गरज होत चालली आहे. हसत खेळत चांगल्या दर्जाचे, दबावविरहित शिक्षण मिळालेली भावी पिढी अधिक चांगली घडू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्याही पाल्यावर त्याच्या पालक व शिक्षकांचा धाक असावा. मात्र, तो जीवघेणा ठरण्याइतपत कधीही नसावा, असा मतप्रवाह वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न ठेवणे हेच खऱ्या अर्थाने "ऑल इज वेल'चे लक्षण ठरणार आहे.


(sakal,5th january)

No comments: