Wednesday, March 31, 2010

24 तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

मुंबई हादरली; तीव्र स्पर्धेत मागे पडल्याने संपविले आयुष्य

पालकांच्या अपेक्षांचे वाढते ओझे व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने आज सातवीतील एका विद्यार्थ्याने आणि फिजिओथेरपीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःला संपविले. या हृदयद्रावक घटनेने शिक्षण क्षेत्रालाही जबरदस्त हादरा बसला असून आपल्या अपेक्षा मुलांवर बिनदिक्कत लादणाऱ्या पालकांवर अंतर्मुख होण्याची वेळ आणली आहे.

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत सातवीत शिकणाऱ्या सुशांत पाटील याने चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने; तर नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैजंतीकौर बुलेर हिने 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मार्क मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने शाळेच्या स्वच्छतागृहात; तर वैजंतीकौर हिने आपल्या पवई येथील घरी स्वतःला संपविले.

डिलाईल रोड येथील बावला मशीद चाळीत राहणारा सुशांत आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत गेला. वर्गात दप्तर ठेवून प्रसाधनगृहात गेलेला सुशांत बराच वेळ परतला नाही. शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन शिकवायला सुरुवात केली. सुशांतच्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्याने तो शाळेत आल्याचे यावेळी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर शाळेचे शिक्षक आणि शिपायांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली; तेव्हा शाळेच्या एका प्रसाधनगृहाचे दार बराच वेळ बंद असल्याचे एका विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितले. यानंतर काही शिक्षक प्रसाधनगृहात गेले असता सुशांतने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना आढळले. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. शाळा-व्यवस्थापनाने या प्रकाराची माहिती सुशांतचे वडील एकनाथ पाटील आणि दादर पोलिसांना दिली. काही वेळाने पोलिसांनी सुशांतच्या वडिलांच्या उपस्थितीत शौचालयात लोंबकळत असलेला त्याचा मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनाकरिता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविला. या घटनेची माहिती प्रसिद्धिमाध्यमांत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शारदाश्रम विद्यामंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेसमोर गोळा झाले. शाळेत पहिल्यांदाच घडलेल्या अशा प्रकारामुळे पालक आणि शिक्षकांत घबराट पसरली. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात शाळेत नुकत्याच झालेल्या परीक्षेत तो चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने गेले काही दिवस तो तणावाखाली होता, अशी माहिती दादरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उंडे यांनी दिली. अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षकांनी सुशांतला त्याच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते; मात्र बावला मशीद चाळीतच मेडिकलचे दुकान चालविणा
रे त्याचे वडील एकनाथ पाटील शाळेत गेले नव्हते. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या तणावामुळेच सुशांतने त्याचे आयुष्य संपविल्याचे सांगण्यात येते.

पवई येथील घटनेत वैजंतीकौर भूपेंद्रसिंह बुलेर (वय 20) या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पवई येथील चैतन्यनगर परिसरात साई सोसायटी इमारतीत राहणारी वैजंतीकौर नेरूळच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिला 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे गेले काही दिवस ती तणावाखाली होती. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ती जेवून तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत ती खोलीच्या बाहेर न आल्याने तिचे आई-वडील तिच्या खोलीकडे गेले. बराच वेळ हाक मारल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या वडिलांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे तिने हा प्रकार केल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. तिच्या खोलीत एका भिंतीवर "यापुढे आपण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवू', असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले आहे.


तो तणावग्रस्त होता
सुशांत पाटील हा विद्यार्थी नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेत चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने तणावाखाली होता. अनुत्तीर्ण झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या पालकांना भेटायला बोलावले होते. मात्र, ते अनेक दिवस शाळेत शिक्षकांना भेटायला आले नाहीत. आज सकाळी शाळेत आला तेव्हाही तो नेहमीप्रमाणे तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याची माहिती शारदाश्रम संस्थेचे सचिव श्रीनिवास नेरुरकर यांनी पत्रकारांना दिली.

(sakal,5th january)

No comments: