Wednesday, March 31, 2010

कुर्ल्यात मुलीची आत्महत्या

गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला आलेले वैफल्य सहन न करू शकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनीने आज तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात घडला. या घटनेनंतर आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. आत्महत्येपूर्वी तिने वहीत लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने हा प्रकार केल्याचे तपासात कुठेही निष्पन्न झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरूनगर परिसरात श्रमजीवीनगर येथे ही घटना घडली. मेरी जसमन नाडर (17) असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या मेरीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर ती आईसोबत श्रमजीवीनगर येथील घरात राहत होती. पतीच्या मृत्यूला आठ वर्षे झाली तरीही तिची आई रात्री-अपरात्री त्यांची आठवण काढून रडायची. आईचे हे नैराश्‍य मेरीला सहन होत नव्हते. तिची आई जवळच असलेल्या एका गार्मेंट कंपनीत काम करून स्वतःचा तसेच मेरीचा उदरनिर्वाह करीत होती. आज सकाळी आई नेहमीप्रमाणे कमाला गेली असताना मेरी तिच्या चाळ क्रमांक- 155 च्या खोली क्रमांक 85 येथील घरात एकटीच होती. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला; तेव्हा मेरीचा मृतदेह पंख्याला लोंबकळत असल्याचे त्यांना आढळले. या प्रकाराची माहिती त्यांनी नेहरूनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला. मेरीने मृत्यूपूर्वी अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर इंग्रजी आणि तमीळ भाषेत लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले आहे. "वडिलांच्या आठवणींनी आईचे रडणे मला सहन होत नाही. त्यामुळेच मी वडिलांना भेटायला जात आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,' असा या पत्रातील मजकूर आहे. या पत्रात तिने महाविद्यालयातील काही मित्र-मैत्रिणींची नावेही लिहिली आहेत. तिच्या पश्‍चात तिच्या आईला मदत करण्याचे आवाहनही तिने मित्रमंडळींना केले असल्याची माहिती नेहरूनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली. आतापर्यंतच्या तपास
ात अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार झाल्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविले जाणार असल्याचेही काळे या वेळी म्हणाले.

दरम्यान, मेरी नाडरच्या मृत्यूनंतर मुंबईत आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. दादरच्या शारदाश्रम शाळेतील सातवीचा विद्यार्थी सुशांत पाटील, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर, चेंबूर येथील बारावीचा विद्यार्थी विनीत मोरे, भांडुप येथील आयआयटीचा अभियंता ज्ञानेश्‍वर नायक आणि मुलुंडच्या रेश्‍मा धोत्रे यांचा यात समावेश आहे.

(sakal,10th january)

No comments: