Sunday, October 26, 2008

राज्यभरात एसटीच्या 305 बसेसची तोडफोड

मनसेचा उद्रेक : 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनात संतप्त जमावाने राज्य परिवहन उपक्रमाच्या 305 बसेसची तोडफोड केली; तर चार बसेस जाळल्या. हिंसाचाराच्या या घटनांत परिवहन उपक्रमाचे 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चेतना महाविद्यालयात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी 21 ऑक्‍टोबरला पहाटे अटक केली. या अटकेचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ झाली. यात सर्वप्रथम "लक्ष्य' नेहमीप्रमाणेच राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसना करण्यात आले. समाजकंटकांनी राज्यात सर्वत्र केलेल्या या तोडफोडीत तब्बल 305 बसेसची तोडफोड झाली. याशिवाय कल्याण, बार्शी, जालना व औरंगाबाद या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवाशांना खाली उतरवून संतप्त जमावाने त्या पेटवून दिल्या. तोडफोडीच्या घटनांत आंदोलकांनी बसेसच्या पुढच्या, मागच्या; तसेच खिडक्‍यांच्या काचा फोडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. हिंसाचाराच्या या घटनांत राज्य परिवहन उपक्रमाचे तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जाळपोळ आणि तोडफोडीच्या या प्रकारांत सामान्य प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झालेली नसल्याचेही राज्य परिवहन उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
-----------------------
राजकीय पक्षांना आवाहन
राज्यभरात उसळणाऱ्या दंगली; तसेच अनुचित प्रकारांचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन उपक्रमाला बसतो. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाला पुरेशी सेवा देता येत नाही. उपक्रमाला होणारे हे नुकसान टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनांत बसेसची तोडफोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे पत्र उपक्रमाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी सर्व पक्षांना काही दिवसांपूर्वी दिल्याची माहितीही जनसंपर्क अधिकारी धस यांनी या वेळी दिली.

No comments: