Wednesday, October 1, 2008

सुरक्षिततेच्या कारणावरून घेतलेली पाण्याची बाटलीच जीवावर बेतली

मंत्रालयातील घटना : महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 30 ः मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागत महिलेकडील पाण्याची बाटली सुरक्षिततेच्या कारणावरून महिला कॉन्स्टेबलने काढून घेतली. त्याच बाटलीतील पाणी महिला कॉन्स्टेबल प्यायली. या पाण्यामुळे विषबाधा होऊन तिचा आज सकाळी सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद झाली. महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतरही मरीन ड्राईव्ह पोलिस रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.
अलका तानाजी गायकवाड असे महिला पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विषबाधेनंतर चार दिवस सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गायकवाड यांनी आज सकाळी आपले प्राण सोडले. 26 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा बंदोबस्ताला त्या उभ्या होत्या. या वेळी त्यांच्या सहकारी कॉन्स्टेबल पुकळे यांनी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या तपासणीनंतर सुरक्षिततेच्या कारणावरून राजेश्री बोटे या महिलेच्या पिशवीतील पाण्याची बाटली काढून घेतली. बराच वेळ बंदोबस्ताच्या ठिकाणी उभ्या असलेल्या अलका गायकवाड या वेळी तेथे आल्या. प्रचंड तहान लागल्याने बाटलीतील पाणी त्या प्यायल्या. कीटकनाशक मिश्रित पाण्यामुळे गायकवाड यांना चक्कर व उलट्या होऊ लागल्या. काही क्षणातच काळ्या-निळ्या पडलेल्या कॉन्स्टेबल गायकवाड यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरू होते; मात्र पाण्यात मिसळलेल्या कीटकनाशकातील विष जहाल असल्याने आज सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पाण्याची बाटली घेऊन येणाऱ्या राजेश्री बोटे या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.

No comments: