Tuesday, October 14, 2008

अतिरेकी करणार होते पुण्यातील बिल्डर्स, ज्वेलर्सचे अपहरण

खंडणीची पूर्वतयारी : भूल आणणाऱ्या औषधांमागचे गमक उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 ः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांकडून जप्त केलेल्या भूल आणणाऱ्या औषधांच्या साठ्यामागचे गमक उघडकीस आले आहे. या औषधसाठ्याचा उपयोग पुण्यातील प्रतिष्ठित बिल्डर आणि ज्वेलर्सचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी करण्यात येणार होता, अशी माहिती या अतिरेक्‍यांच्या चौकशीत स्पष्ट झाल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. खंडणीतून येणारा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरण्यात येणार होता, असेही ते या वेळी म्हणाले.

सिमीपासून वेगळे होऊन गेल्या तीन वर्षांत देशभर घातपात घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. इंडियन मुजाहिदीनची मीडिया विंग संभाळणाऱ्या तीन संगणकतज्ज्ञांसह पाच अतिरेक्‍यांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील अशोका म्युज इमारतीतून अटक करण्यात आली. या वेळी पोलिसांना कॅटामाईनसारख्या भूल येणाऱ्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा सापडला होता. या औषधसाठ्यासंबंधी अतिरक्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी या औषधसाठ्याच्या मदतीने पुण्यातील प्रतिष्ठित बिल्डर व ज्वेलर्सच्या अपहरणाची कबुली दिली. अपहृतांना अशोका म्युजमधील कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात येणार होते. तेथे त्यांना या औषधांची भूल देऊन त्यांच्या नातेवाईकांकडून खंडणी उकळण्यात येणार होती. त्यासाठी या अतिरेक्‍यांनी जानेवारीमध्येच काही बिल्डर्सच्या कार्यालयांची तसेच ज्वेलर्सच्या दुकानांची टेहळणीदेखील केली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे.

गेल्या तीन वर्षांत देशभरात झालेल्या स्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ याने इंडियन मुजाहिदीनला अतिरेकी कारवायांकरिता पैसा उभा करण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे सह पोलिस आयुक्त मारिया यांनी सांगितले. इंडियन मुजाहिदीनचा मुख्य नियंत्रक आमीर रझा याच्या संपर्कात असलेला अफताब अन्सारी याने पश्‍चिम बंगालमध्ये अशी पद्धत राबविली होती. इंडियन मुजाहिदीनचे आर्थिक स्रोत तपासण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक काम करीत असल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

------------

अतिरेक्‍यांचा "राजधानी'तून प्रवास
अहमदाबादला 26 जुलै रोजी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांनी राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये आरक्षण केले होते. आठ प्रवाशांसाठीचे हे आरक्षण निजामुद्दीन रेल्वेस्थानकातून 24 जुलैला करण्यात आले. दिल्ली ते अहमदाबाद 24 जुलै रोजी गेलेले हे अतिरेकी स्फोट घडविल्यानंतर 26 जुलैला आधीच आरक्षित असलेल्या राजधानी एक्‍स्प्रेसच्या डब्यांत बसून अहमदाबाद ते दिल्ली असे परतले होते. यात दिल्लीच्या जामियानगर येथे पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमधील अतिरेक्‍यांचाही समावेश होता, अशी माहिती आज गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

No comments: