Thursday, October 2, 2008

महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूचा उपायुक्तांमार्फत तपास

हसन गफूर : घटनास्थळावरील पोलिसांचीही चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 1 ः मंत्रालयातील महिला कॉन्स्टेबलने विषारी पाणी प्यायल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. याप्रकरणी महिला अभ्यागतावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरील पोलिसांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. दरम्यान, महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नाशिक येथील मूळ गावी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजेश्री बोटे या महिलेकडील पाण्याची बाटली सुरक्षिततेच्या कारणावरून पुकळे या महिला कॉन्स्टेबलने काढून घेतली. ही बाटली पोलिसांकडे देताना राजेश्री बोटे यांनी त्यात झुरळाचे औषध असल्याचे सांगितले होते; मात्र बंदोबस्तावर असलेल्या अलका गायकवाड यांना बाटलीतील विषारी द्रव्याबाबत कसलीच माहिती नव्हती. तहान लागल्यानंतर बाटलीतील विषारी पाणी प्यायल्याने अलका गायकवाड यांना चक्कर व उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्रालयातील काम उरकून बाटली घेण्यासाठी आलेल्या बोटे यांचा पोलिसांसोबत वादही झाला. सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गायकवाड काल सकाळी मरण पावल्या.
पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी राजेश्री बोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2004 मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या गायकवाड यांचा मृतदेह त्यांच्या मोठ्या भावाच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments: