Tuesday, September 16, 2008

रस्ता खचून ट्रक कलंडल्याने तिघे चिरडले

रस्ता खचून ट्रक कलंडल्याने तिघे चिरडले

एक जखमी ः कंत्राटदार, पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 15 ः पेव्हर ब्लॉकचा वापर करून बनविलेला रस्ता पाच फूट खचल्याने भरधाव ट्रकला झालेल्या अपघातात तीन पादचारी ठार, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. सातरस्ता येथील जेकब सर्कलजवळ धोबीघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. सी. खंडागळे यांनी सांगितले. लाकडी ओंडक्‍यांची वाहतूक करणारा ट्रक या रस्त्यावरून जात असताना रस्ता पाच फूट खचला. त्यात ट्रकचे मागील चाक अडकल्याने त्यातील ओंडके पादचाऱ्यांवर पडले. ओंडक्‍यांखाली चिरडून झिनल गणेश सावला (37), झेबुन्नीसा कासमभाई कामदार (35) आणि एक अनोळखी पुरुष असे तिघे ठार झाले. या अपघातात उज्ज्वला शैलेंद्र गायकवाड (22) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा रस्ता खोदून त्याच्यावर महापालिकेने पेव्हर ब्लॉक बसविले होते. अपघातानंतर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या कामात कंत्राटदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात वापरण्यात आलेल्या साहित्याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडागळे यांनी दिली.
दरम्यान, अपघातानंतर या मार्गावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. येथील वाहतूक चार तासांहून अधिक काळ एकाच मार्गावरून चालविण्यात येत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने या मार्गावर पडलेले ओंडके बाजूला केले. दुपारी साडेतीन वाजता अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.
......................................

No comments: