Tuesday, September 30, 2008

पस्तिस नवरात्रोत्सव मंडळांना बीडीडीएसचे सुरक्षा कवच

नवरात्रोत्सवासाठीही पोलिस सज्ज

कडेकोट सुरक्षा ः मंडळांच्या ठिकाणी बॉम्बशोधक, श्‍वान पथके

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांना अटक केल्यानंतरही मुंबईला असलेला दहशतवादी कारवायांचा धोका टळलेला नाही. अतिरेक्‍यांचा गट अद्याप शहरात फिरत असल्याने नवरात्रोत्सवात घातपात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील प्रमुख पस्तीस नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी बॉम्बशोधक व विनाशक आणि श्‍वान पथके तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कायदा व सुरक्षा विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी "सकाळ'ला दिली.

गेल्या तीन वर्षांत देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उघडकीस आला. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य असलेल्या मोहम्मद सादिक शेख याच्या चौकशीत त्याने प्रशिक्षण दिलेले 30 कडवे अतिरेकी मुंबईत फिरत असल्याचे उघडकीस आले. या अतिरेक्‍यांनी गणेशोत्सव काळात विध्वंसक कारवाया करण्यासाठी शहरातील प्रमुख मंडळांच्या मंडपांची पाहणी केल्याची कबुलीही त्याने दिली. उद्या (ता. 30) पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवावर दहशतवादाचे सावट असल्याने शहरात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरात 3300 सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. त्यातील 2950 ठिकाणी दांडिया व गरबा रास खेळला जातो. या सर्व नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची मंडपांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्‍टर, सीसीटीव्ही, हॅन्ड मेटल डिटेक्‍टरच्या साह्याने तपासणी करण्यात येणार आहे. भाविकांना मंडपात जाताना पिशव्या अथवा वस्तू सोबत नेण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिस तसेच खासगी महिला सुरक्षारक्षक ठेवण्यात येणार आहेत. भाविक व युवावर्गाची प्रचंड गर्दी असलेल्या शहरातील 35 प्रमुख सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी पोलिसांचे बॉम्बशोधक व विनाशक तसेच श्‍वान पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावर अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठकी घेण्यात आल्या असून त्यांनाही सुरक्षिततेसंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, शीघ्र कृती दल, गृहरक्षक दल यांच्यासह राखीव पोलिसांची मोठी कुमक शहरातील सुरक्षाव्य
वस्थेसाठी सज्ज ठेवण्यात येणार असल्याचेही प्रसाद यांनी या वेळी सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवरच शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल, लॉजसह संवेदनशील ठिकाणे, महालक्ष्मीसारख्या धार्मिक स्थळांवरही पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस ठेवण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
.....


गरब्याची वेळ
उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात पहिले आठ दिवस रात्री दहा वाजेपर्यंत रास गरबा व दांडिया खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. 8 व 9 ऑक्‍टोबरला दांडिया व गरबा खेळण्याची ही वेळ रात्री बारा वाजेपर्यंत असल्याची माहितीही के. एल. प्रसाद यांनी दिली.

No comments: