Wednesday, September 10, 2008

नाही कोणाच्या बापाची

नाही कोणाच्या बापाची
मुंबई सर्व देशवासीयांची!

के. एल. प्रसाद ः कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सर्व देशवासीयांचे आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी आवश्‍यक ते बळ वापरले जाईल, असे प्रतिपादन कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी चेंबूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
आरसीएफ पोलिस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना प्रसाद यांनी हे मत वक्तव्य केले. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा हातात घेणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रसाद यांनी या वेळी सांगितले. समाजवादी पक्षाच्या खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला. बच्चन कुटुंब महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत मनसेने आंदोलनाला सुरुवात केली. मनसेच्या आंदोलनामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये याकरिता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलिसांनी महिनाभरासाठी भाषणबंदी घातली आहे. आंदोलनाच्या काळात शहरातील वातावरण पुन्हा बिघडू नये यासाठी गेल्या तीन दिवसांत मनसेच्या दोन हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 26 ऑगस्टपासून तब्बल सहा हजार मनसे कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची कारवाई झाल्याचेही ते या वेळी म्हणाले.
....

No comments: