Thursday, July 16, 2009

भरकटलेल्या बोटीवरील पोलिसांची सुटका


नौदल, सीमा सुरक्षा दलाची मदत


वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उद्‌घाटनाच्या वेळी समुद्रात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली बोट आज पहाटे मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकल्याने खवळलेल्या समुद्रात भरकटली. सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्रात हेलकावे खाणाऱ्या या बोटीवर अडकलेले चार पोलिस व अन्य पाच जणांना नौदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
वांद्रे-वरळी सागरी सेतूचे मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यलोगेट पोलिस ठाण्याच्या पोलिसांची "ज्ञानेश्‍वर माऊली' ही गस्ती बोट वांद्रे-वरळी येथील समुद्रात तैनात करण्यात आली होती. सागरी सेतूच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा या गस्ती बोटीला तेथून पुन्हा यलोगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाऊच्या धक्‍क्‍यावर येण्यास सांगण्यात आले; मात्र समुद्र खवळलेला असल्याने या बोटीला समुद्रातील बंदोबस्ताचे ठिकाण सोडणे अशक्‍य झाले. रात्रभर समुद्रात घालविल्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही बोट पुन्हा भाऊच्या धक्‍क्‍याकडे जायला निघाली. या वेळी सागरी सेतूच्या वरळी येथील भागाजवळ मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात बोटीचा पंखा अडकला. पंखा फिरणे बंद झाल्याने बोटीचे इंजिन बंद पडले. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उडी मारून पंख्यात अडकलेले जाळे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच पुन्हा सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ही बोट वांद्रे येथील सीरॉक आणि हॉटेल ताज लॅण्ड एण्डच्या दिशेला भरकटू लागली. त्यामुळे पोलिस व खलाशांचा धीर सुटला. बोटीवरील सहायक पोलिस उपनिरीक्षक यलगोंडा पाटील (वय 49; रा. माहीम) यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बोट समुद्रात भरकटल्याची वर्दी देऊन तातडीने मदतीची विनंतीही केली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी ही माहिती तातडीने यलोगेट पोलिसांना कळविली. समुद्रात मोठमोठ्या लाटा येत असल्याने नौदल आणि सीमा सुरक्षा दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. सीमा सुरक्षा दल आणि नौदलाने परस्परांशी समन्वय साधून तासाभरातच समुद्रात अडकलेल्या या बोटीवरील पोलिस आणि खलाशांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठ
विले. काही वेळातच बोटीवर घरघरणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरमुळे बोटीवर अडकलेल्या पोलिस आणि खलाशांच्या जीवात जीव आला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरू केलेले हे "रेस्क्‍यू ऑपरेशन' अवघ्या दोन तासांत संपले. हेलिकॉप्टरने पाच फेऱ्यांमध्ये बोटीवर अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले.
सहायक पोलिस निरीक्षक यलगोंडा पाटील, पोलिस नाईक उत्तम पाटील (वय 45; रा. ऐरोली), हवालदार सूर्यभान भुमरे (52; रा. ऐरोली), ज्ञानेश्‍वर पवार (46; रा. वाशी), तांडेल नरेश कोळी ( 49; रा. मोरागाव), अजय मंडल (20; रा. पश्‍चिम बंगाल), गणेश म्हात्रे (20; रा. मुरूड), भोरून मंडल (23; रा. पश्‍चिम बंगाल) व दीपू रॉय (18) अशी या संकटातून सुखरूप सुटका झालेल्यांची नावे आहेत. यानंतर समुद्रात खोलवर जात असलेली ही बोट बाहेर काढण्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या जहाजाचा वापर करण्यात आला; मात्र बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीचा दोरखंड तुटून ती पुन्हा जुहू येथील गोदरेज बंगल्यामागील समुद्रात भरकटली. दुपारपर्यंत ही बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती यलोगेट पोलिसांनी दिली.


(sakaal, 1st july)

No comments: