Thursday, July 16, 2009

बेहरामपाड्यात दोन तास धुमश्‍चक्री

तुफान दगडफेक, दिवाण बिल्डर्स-नागरिकांमध्ये वाद

वांद्रे येथील बेहरामपाड्यात बांधकाम काढण्यावरून दिवाण बिल्डर्स आणि स्थानिक नागरिकांच्या गटांत झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या वेळी काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीत नमाज पढणाऱ्या नागरिकांवर पडल्याने काही क्षणातच येथे वाद पेटला. दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही धुमश्‍चक्री पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर थांबली. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण होते.

वांद्रे पूर्वेला बेहरामपाड्यात बेस्ट कंपाऊंडमध्ये अंबर हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या जागेवर रफिक कुरेशी यांनी बांधकाम केले आहे. या बांधकामावरून दिवाण बिल्डर्स आणि काही स्थानिक नागरिकांत वाद सुरू होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला जाऊन या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी अनंत काणेकर मार्गावर असलेल्या दिवाण बिल्डर्सच्या दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर दगडफेक करायला सुरुवात केली. नागरिकांकडून होत असलेल्या या दगडफेकीला दिवाण बिल्डर्सच्या लोकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीवर पडले. त्यामुळे या ठिकाणी प्रार्थना करणाऱ्या मुस्लिम बांधवांत गैरसमज झाला. यानंतर बाहेर पडलेल्या काही मुस्लिम बांधवांनीही नागरिकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगताच हा प्रकार थांबल्याचे निर्मलनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बागडे यांनी सांगितले; मात्र स्थानिक नागरिक आणि बिल्डरची माणसे यांच्यातील धुमश्‍चक्री दोन तासांहून अधिक काळ सुरू होती. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलिस दलाचा उपनिरीक्षक व एक पोलिस कर्मचारी यांच्यासह आठ नागरिक जखमी झाले. त्यांना सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दगडफेकीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत असून पोलिसांनी दोषींवर कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती परिमंडळ- 8 चे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.


(sakaal,8th july)

No comments: