Thursday, July 16, 2009

पैसा झाला खोटा




बनावट नोटांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर समित्या

भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी खोट्या पैशांचा मोठा पाऊस पाडण्याच्या पाकिस्तानच्या आएएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारस्थानांना प्रतिबंध करण्यासाठी आता महाराष्ट्रात जिल्हास्तरावरही समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुंवशी यांनी "सकाळ'ला दिली. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवरून भारतात मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येणाऱ्या बनावट चलनी नोटांच्या वितरणाला आळा घालण्याकरीता केंद्र सरकारच्या स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या छापखान्यात छापल्या जाणाऱ्या या बनावट नोटांच्या वितरणाचा व्यापार दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बांगलादेश आणि नेपाळमार्गे या बनावट नोटा आजही मोठ्या प्रमाणात येतात. मुंबईत राहणारे फेरीवाले, मजूर अशा काही दुर्लक्षित घटकांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या बनावट नोटांचे वितरण होते. एक लाख रुपयांच्या नोटांचे वितरण केल्यानंतर त्यातील 30 हजार रुपये या नोटांचे वितरण करणाऱ्या दलालाला दिले जातात. बनावट नोटांच्या या व्यापारातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांकरीता वापरला जात असल्याचे 11 जुलै 2006 रोजी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत स्पष्ट झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी बनावट नोटांचे हे जाळे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेमार्फत पसरविले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. 15 मे रोजी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव येथून तीन लाख 45 हजार रुपयांच्या बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपींकडून मिळालेल्या या नोटांची छपाई अतिशय उच्च प्रतीची होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या स्वाक्षरीच्या या बनावट नोटांची छपाई पाकिस्तानच्या शासकीय छापखान्यातच झाल्याचा अंदाज तपासयंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे नोटांच्या छपाईसाठी जर्मनीहून कागद आयात करतात. पाकिस्तानकडून मात्र त्यांना छपाईकरीता आवश्‍यक असलेल्या कागदापेक्षा 25 टक्के अधिक कागद मागविण्यात येतो. हाच अतिरिक्त कागद भारतीय चलनी नोटांची छपाईसाठी वापरला असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविण्यात आल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीमेपलीकडून भारतात बनावट चलनी नोटांच्या वाढत्या वितरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. याशिवाय राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्याही स्थापण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाया करण्यापासून सामान्य जनतेत नोटांविषयी जागृतीचे काम या समित्यांद्वारे केले जात आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही नोटांच्या छपाईच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यायला सुरवात केल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी सांगितले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी डोंगरी येथे छापा घालून साडेएकोणीस लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या होत्या. यावेळी पोलिसांनी "आयएसआय'शी असलेल्या कथित संबंधांवरून सुलेमान पटेल नावाच्या आरोपीला अटक केली होती. यापूर्वी पाकिस्तानात छपाई करण्यात आलेल्या नोटा दुबईमार्गे भारतात विमानाने पाठविल्या जात होत्या. पोलिसांनी हे रॅकेट उद्‌ध्वस्त केल्यानंतर हवाईमार्गाने बनावट चलनी नोटा आणणे थांबले. यानंतरच्या काळात भारतीय नोटांची छपाई बांगलादेशातही केली जात होती. या बनावट नोटांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून नवीन नोटांची छपाई केली होती. मात्र, या नोटांसारख्याच बनावट नोटांची पाकिस्तानच्या छापखान्यातून छपाई झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत उघड झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले.

(sakaal, 15 th july)

No comments: