Thursday, July 30, 2009

आता पोलिस नियंत्रण कक्षांत कमांड सेंटर

दोन महिन्यांत आमूलाग्र बदल घडविणार : शिवानंदन

आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिस नियंत्रण कक्षांतून विनाविलंब प्रतिसाद मिळावा, याकरिता या कक्षांतच कमांड सेंटरही तयार करण्यात येणार आहेत. येत्या काळात नियंत्रण कक्षांत होणाऱ्या या व अन्य आमूलाग्र बदलांकरिता 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.

तरुण पिढीसोबत सुसंवाद साधण्याकरिता मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या www.copconnect.in या वेबसाईटचे उद्‌घाटन आज चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी मुंबईच्या नगरपाल इंदू सहानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन तरुणाईत व्यसनाधीनता तसेच अमलीपदार्थांचे सेवन वाढत असल्याचे चित्र आहे. अशा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीकडे नेण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या वेबसाईटच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे. याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने प्रबोधन केले जाणार आहे.

एक कोटी 60 लाख लोकसंख्येच्या मुंबईत प्रत्येकाच्या कारवायांकडे मर्यादित पोलिस बळाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्‍य होत नाही. अशा वेळी तरुण पिढीने पोलिसांचे डोळे होऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन या वेळी शिवानंदन यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पोलिस नियंत्रण कक्षात येत्या दोन महिन्यांच्या काळात लक्षणीय सुधारणा घडविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांत संभाषण कौशल्य वाढावे याकरिता वांद्रे-कुर्ला संकुल येथे कार्यशाळा घेण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनेला चोख उत्तर देण्यासाठी पोलिस दलाला अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करण्यात येत आहे. आपत्कालीन स्थितीत बॉम्ब तसेच अत्याधुनिक स्फोटकांची ओळख व्हावी तसेच बॉम्बशोधक व विनाशक पथक येईपर्यंत ती हाताळता यावीत याकरिता तीनशे पोलिसांना नायगाव येथे विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दक्षतेचा इशाऱ्याने घबराट नको
मुंबई, दिल्ली यांसह जगभरातील प्रमुख शहरे नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असतात. या शहरांत घातपाती कारवायांची शक्‍यता कधीच नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच सतर्कता बाळगण्यात येते. पोलिसांनी दक्ष राहावे यासाठी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येतात. याचा अर्थ त्या शहराला लगेचच अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या अशा बातम्यांनी नागरिकांत नाहक घबराट पसरत असल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले
.

(sakaal,25 th juyl)

No comments: