Saturday, July 18, 2009
मुलीला सांभाळणाऱ्याची केवळ संशयावरून हत्या
चौघांना अटक; खारमधील दुहेरी हत्येचे गूढ उकलले
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयातून आठवडाभरापूर्वी खार येथे झालेल्या दोन तरुणांच्या हत्येप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हत्येची ही घटना 9 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली होती.
खार पूर्वेला असलेल्या एका झोपडपट्टीत वकील बुद्धीराम चव्हाण (25) याच्या घरात एक आठ वर्षांची मुलगी झोपली होती. वकील तिच्या शेजारीच होता. तो या मुलीशी अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयावरून जवळच राहणाऱ्या तरुणांच्या गटाने त्याच्यावर बांबू आणि सळईने हल्ला केला. वकील याला वाचविण्यासाठी त्याचा नातेवाईक अनिश चव्हाण (19) मध्ये पडला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीत पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे वकील आणि अनिश या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी तरुणांचा गट तेथून पळून गेला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वकील याच्या शेजारी राहणारा एक सुरक्षा रक्षक क्षयरोगावरील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याच्या आठ वर्षांच्या मुलीचा सांभाळ वकील करीत होता. या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. 9 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वकील याच्या झोपडीत लहान मुलगी झोपल्याचे काही तरुणांनी पाहिले. वकीलही तिच्या शेजारीच असल्याने तो तिच्याशी अतिप्रसंग करीत असल्याचा संशय या तरुणांना आला. त्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यात वकील आणि त्याचा नातेवाईक अनिश हे दोघेही मरण पावले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेंद्र धिवार, सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा कपिले यांचे पथक करीत होते. चौकशीअंती हा प्रकार झोपडपट्टीसमोरील कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांच्या गटानेच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिस या तरुणांचा शोध घेत होते. या प्रकरणातील आरोपी मालाडच्या गणेशनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री उशिरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अल्ताफ ऊर्फ छोटू निजाम हुसैन (19), मोहम्मद हनिफ खान (19), उस्मान ऊर्फ विरू ऊर्फ मोहम्मद शेख (23) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या माहितीवरून वांद्रे टर्मिनल येथून गणेश किसन गवळी (22) याला अटक करण्यात आली. केवळ गैरसमजातून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
(sakaal, 17th july)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment