Thursday, July 16, 2009

पोलिसांकडे लवकरच हेलिकॉप्टर ः चिदंबरम



मुंबईतील "एनएसजी तळा'चे उद्‌घाटन

मेगासिटी पोलिसिंग प्रकल्पाच्या पूर्णत्वासोबतच मुंबईसारख्या देशभरातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे हेलिकॉप्टर असतील, असे आश्‍वासक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) मुंबई तळाचा शुभारंभ आज सायंकाळी त्यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सागरी सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारमार्फत योजना राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
"एनएसजी'च्या मुंबई तळाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक एन. पी. एस. अलख, पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथे "एनएसजी'चे चार तळ उभारण्याचे भारतवासीयांना दिलेले वचन आज पूर्ण केल्याचेही पी. चिदंबरम म्हणाले. उद्या (ता. 1) चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथील तळांचा शुभारंभ केला जाणार आहे. सध्या सांताक्रूझ-पूर्वेला असलेल्या पोलिसांच्या जागेवर हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, येत्या नोव्हेंबरअखेर "एनएसजी' मरोळ येथील 23 एकर जागेवर स्थलांतरित होणार आहे. बेंगळूरु, जोधपूर व गुवाहाटी येथेही अशा प्रकारचे तळ उभारण्यात येतील.
चार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या तळांसाठी एक हजार 80 जवानांची भरती करण्यात आल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले.
गुजरात, महाराष्ट्र व गोव्याच्या किनारपट्टीहून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी तेथील सागरी सुरक्षिततेच्या अभ्यासाकरिता गुप्तचर विभागाने खबरदारीचा अहवाल दिला आहे. सागरी मार्गाने हल्ल्याचे सध्या तरी ठराविक असे कोणतेही "इनपुट' अद्याप नसल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. मुंबईत उभारण्यात आलेल्या "एनएसजी'च्या तळावर आपत्कालीन स्थितीत सबंध पश्‍चिम भारताच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यास राज्य पोलिस दल सक्षम होत आहे; मात्र अतिरेकी हल्ल्याच्या वेळी राज्य पोलिसांकडून मिळणाऱ्या आदेशाप्रमाणे एनएसजी त्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी सूत्रे हाती घेईल, असेही ते म्हणाले. "एनएसजी'चा तळ मुंबईत उभारण्यात आल्यामुळे मुंबईकरांत त्यांच्या सुरक्षिततेबाबत आत्मविश्‍वास वाढेल, असेही ते म्हणाले.


------------------

अर्ध्या तासाचा "रिस्पॉन्स टाइम'
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी "एनएसजी'चे कमांडो मुंबईत पोचण्यासाठी सहा तासांचा उशीर झाला होता. मणेसर येथून केवळ वेळेत विमान न मिळाल्याने हा हल्ला परतवून लावण्यासाठी एनएसजी कमांडोंना मुंबईत येण्यासाठी उशीर झाला. यापुढील काळात देशभरात उभारण्यात येणाऱ्या एनएसजी तळांमुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी एनएसजी कमांडो अवघ्या अर्ध्या तासात दाखल होतील, असे "एनएसजी'चे महासंचालक एन. पी. एस. अलख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



पोलिसांना सतर्कतेचा आदेश

अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर राज्यात दक्षतेचा आदेश देण्यात आल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. तीन दिवसांपूर्वी गुप्तचर खात्याकडून हे "इनपूट' मिळाले आहे. राज्यातील पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले


(sakaal,30th june)

No comments: