Thursday, July 30, 2009

रेल्वे आरक्षण मिळवून देणारे तीन दलाल "सीबीआय'च्या जाळ्यात


अधिकारी-कर्मचारी सामील असल्याचा संशय


रेल्वेने परगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून दलाली वसूल करून तिकिटांचे आरक्षण मिळवून देणाऱ्या तिघा दलालांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून ताब्यात घेतले. या दलालांकडून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांची सहाशे तिकिटे व दोन लाख रुपये जप्त केले आहेत. रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट सुरू असल्याची शक्‍यता सीबीआयचे अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी वर्तविली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या प्रमुख रेल्वेस्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटामागे दोनशे ते तीनशे जादा रुपये घेऊन "कन्फर्म' तिकिटे मिळवून देणारे रॅकेट सुरू असल्याची माहिती "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने आज दुपारी तिन्ही रेल्वेस्थानकांत छापे घातले. वांद्रे टर्मिनल येथे गुप्ता ट्रॅव्हल एजन्सी, मुंबई सेंट्रल येथील मुजावर ट्रॅव्हल एजन्सी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ए. के. ट्रॅव्हल्स ऍण्ड कन्सल्टंट या ठिकाणी या तिकिटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याचे आढळले. त्यानुसार "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी या एजन्सी चालविणाऱ्या दलालांना ताब्यात घेतले आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी प्रवाशांच्या तयार होणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस नावे टाकून त्या जागी ऐनवेळी नवीन नावे टाकून प्रवाशांना नाडले जात असल्याचेही "सीबीआय'चे अधीक्षक साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू असून, यात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचीही भूमिका तपासण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले दलाल सामान्य प्रवाशांना तत्काळ आरक्षणासाठी दोनशे रुपये, एसी कोचसाठी तीनशे; तर 90 दिवस आधी करावयाच्या आरक्षणासाठी शंभर रुपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गरज भासल्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल, असेही साळुंखे यांनी सांगितले.


(sakaal,25 th july)

No comments: