Thursday, July 16, 2009

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित

26-11 हल्ल्यासंदर्भात पोलिस करणार मंथन



महासंचालकांची माहिती; प्रमाणित कार्यचलन पद्धतीची अंमलबजावणी


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपत्कालीन स्थितीत सर्व पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करणाऱ्या प्रमाणित कार्यचलन पद्धतीची (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करून त्यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आल्याची माहिती विर्क यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुका शोधून काढण्याकरिता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सागरीमार्गाने आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत घातपात घडविला. या घातपाती हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता पोलिस प्रयत्नशील आहेत. राज्यात कुठेही दहशती हल्ल्यासारखी आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास संबंधित पोलिस आयुक्तालय अथवा जिल्हा अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठराविक जबाबदाऱ्यांची निश्‍चिती करण्यात आली आहे. यापूर्वी ही पद्धत फक्त मुंबईत वापरण्यात येत होती. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी मात्र या पद्धतीचा योग्य अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या प्रधान समितीने तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या नेतृत्व क्षमतेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यापुढील काळात आपत्कालीन स्थितीत स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. याकरिता संबंधित पोलिस आयुक्तालय आणि अधीक्षक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनांच्या वेळी कोणती भूमिका पार पाडावी, याची जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेले पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांकडून त्यांच्या हद्दीत नियुक्त आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांचा आराखडाच अहवालांच्या स्वरूपात मागवून घेतला आहे. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी निश्‍चित असल्याने एखाद्या जिल्ह्यात उद्‌भवलेल्या आणीबाणीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यास वेळ लागणार नाही, असेह
ी विर्क यांनी या वेळी सांगितले.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पोलिसांकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हल्ल्याच्या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी पोलिस खात्याअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुकांबाबत कोणालाही दोषी न धरता फक्त या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही विर्क यांनी या वेळी सांगितले.


(sakaal, 8th july)

No comments: