Thursday, July 16, 2009

खंडणीसाठी बालकाची हत्या करणाऱ्या तिघांना अटक

तीन महिन्यांपूर्वी कराड येथे कृष्णा कोयना नदीच्या पात्रात सापडलेल्या अंधेरी येथील सात वर्षांच्या बालकाची पंधरा लाख रुपयांच्या खंडणीकरिता झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत बालकाच्या इमारतीतच राहणारा तरुण आणि त्याची आई तसेच त्यांचा कराड येथील मावसभाऊ या तिघांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

अंधेरीच्या न्यू म्हाडा कॉलनीतील साईधाम इमारतीत राहणाऱ्या साहिल दळवी या बालकाचा मृतदेह कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या पात्रात 23 फेब्रुवारीला आढळला होता. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट- 10 चे पथकही तपास करीत होते. अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत दुसरीला शिकणारा साहिल 3 फेब्रुवारीपासूनच बेपत्ता होता. दररोज सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान साईधाम इमारतीतच पहिल्या मजल्यावर शिकवणीसाठी जाणारा साहिल 3 फेब्रुवारीला दुपारपर्यंत घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत होते; मात्र साहिलचा शोध न लागल्याने या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
साहिलचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साहिलचे वडील अंकुश दळवी यांना पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी दूरध्वनीवरून धमकी आली होती. आपण धारावीतून बोलतोय, खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला मारण्याचीही धमकी या दूरध्वनीवरून देण्यात आली होती. एका खासगी कंस्ट्रक्‍शन कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला असलेले साहिलचे वडील अंकुश दळवी यांचे मूळ गाव कराड परिसरातच असल्याने या हत्येमागे त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कोणी आहे का, याचाही शोध पोलिस घेत होते.
बरेच दिवस या प्रकरणाचा तपास न लागल्याने अंकुश दळवी यांनी 2 जुलै रोजी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या युनिट -10 च्या पोलिसांनी साहिल राहत असलेल्या परिसरात तपास करायला सुरवात केली होती. तपासाअंती खंडणीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनवरून एक कॉल साईधाम इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या उमेश जाधव (24) यांच्या भावालाही आला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी उमेश जाधव यांच्या कुटुंबीयांच्याही चौकशीला सुरवात केली होती. चौकशीअंती उमेश गणपत जाधव यानेच साहिलच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. या कटात त्याची आई छाया (54) आणि मावसभाऊ अतुल देसाई (20) यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले. घरची गरिबी घालविण्यासाठी खंडणीकरिता ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल उमेश जाधव याला अंधेरी येथून, तर अतुल देसाई याला कराड येथून अटक केली. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या उमेशने 3 फेब्रुवारीला दुपारी साहिलला कॉम्प्युटरवर गेम्स दाखवण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी नेले. यानंतर उमेश आणि त्याची आई या दोघांनी मिळून साहिलची हत्या केली. यानंतर उमेशने साहिलचा मृतदेह एका रेक्‍झीन बॅगेत भरून कराडला नेला. तेथे त्याने मावसभाऊ अतुल देसाई याच्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावली. जानेवारी महिन्यातच उमेश जाधव याने साहिलचा खंडणीसाठी हत्या करण्याचा कट आखला होता. हत्येनंतर त्याने अंकुश दळवी यांना खंडणीची मागणी करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल फोनवरून एक फोन मुंबईतच त्याच्या लहान भावाला केल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

(sakaal, 13 th july)

No comments: