Wednesday, December 10, 2008

महम्मद अजमल कसाबचा जबाब जसा च्या तसा ...!

मुंबई हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने पोलिसांपुढे दिलेला कबुली जबाब...!


" मी मोहम्मद अजमल अमिर कसाब (21), फरीदकोट, तालुका- दिपालपुर, जिल्हा- उकाडा ,सुबा पंजाब, पाकिस्तान येथे माझ्या जन्मापासून राहतो. सरकारी प्राथमिक विद्यालयात चौथीपर्यंत माझे शिक्षण झाले आहे. 2000 मध्ये शाळा सोडल्यानंतर मी लाहोर येथे राहणारा भाऊ अफजल याच्याकडे राहायला गेला. गल्ली क्रमांक-54,घर क्रमांक-12, मोहल्ला- तोहित आबाद, .यादगार मिनार जवळ ,लाहोर असा त्याच्या घराचा पत्ता आहे.2005 पर्यंत मी ठिकठिकाणी मजुरीचे काम केले.या काळात मी अनेकदा माझ्या मूळ गावी जात असे.2005 मध्ये वडिलांसोबत माझा वाद झाला. यामुळे मी घर सोडून लाहोरच्या अली हजवेरी दरबार या अन्नछत्रात दाखल झालो.याठिकाणी घर सोडून राहणारी बरीचशी मुले राहत होती.याठिकाणाहून मुलांना ठिकठिकाणी कामधंद्यासाठी पाठविण्यात येते. एके दिवशी साफीक नावाचा व्यक्ती याठिकाणी आला आणि तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. मूळचा झेलमचा असणाऱ्या साफीकचा केटरिंगचा व्यवसाय होता.मी त्याच्याकडे रोजंदारीवर कामाला सुरवात केली.तो मला दिवसाला 120 रुपये द्यायचा.माझे काम पाहून त्याने काही दिवसांनी माझा पगार दिवसाला 200 रुपये केला.मी त्याच्याकडे 2007 पर्यंत काम केले. याच काळात मी मुझफ्फर लाल खान (22) या तरुणाच्या संपर्कात आलो. तो रोमिया गाव, तालुका व जिल्हा अटक, सरहद , पाकिस्तान येथील राहणारा आहे.आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळत नसल्याने आम्ही दोघांनी चोऱ्या आणि दरोडे टाकण्याचे ठरवून कॅटरींगचे काम सोडून दिले.
यानंतर आम्ही रावळपिंडी येथे गेलो.तेथील बंगश कॉलनीत आम्ही एक घर भाडेतत्त्वावर घेतले. याच परिसरात दरोडा घालण्यासाठी अफजलने एका श्रीमंत व्यक्तीचे घर शोधून ठेवले होते.आम्ही त्या घराचा संपूर्ण नकाशाही बनविला. दरोडा घालण्यासाठी आम्हाला रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्राची आवश्‍यकता होती. तेव्हा अफजलने त्याच्या गावी रिव्हॉल्व्हर मिळू शकेल असे सांगितले. मात्र या गावात नव्याने येणाऱ्यांची सातत्याने तपासणी केली जात असल्याने त्याच्या गावातून शस्त्र मिळविण्याचा नाद सोडून दिला. शस्त्राच्या शोधात असतानाच आम्ही बकरी ईदच्या दिवशी रावळपिंडीच्या रझाबाजारात गेलो. याठिकाणी लावण्यात आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या स्टॉलवर आम्ही शस्त्राबाबत विचारणा केली. स्टॉलवर असलेल्या माणसाने आम्हाला शस्त्र मिळण्याबाबत अनुकूलता दर्शविली. शस्त्र मिळाले तरी ते चालविता येणे आवश्‍यक होते.त्यामुळे आम्ही लष्कर ए तैय्यबा या संघटनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.स्टॉलवर केलेल्या चौकशीनंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी लष्कर ए तैय्यबाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. याठिकाणी असलेल्या माणसाने आमची नावे पत्ते विचारली. कुटुंबीयांबाबतही विचारणा केली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या कार्यालयात गेलो. यावेळी तेथे असलेल्या कालच्याच माणसाने आणखी एका माणसाची ओळख करून दिली. त्याने आम्हाला 200 रुपये आणि एक पावती दिली.यानंतर त्याने आम्हाला मुदरीके येथील मरकस तैय्यबा जवळ लष्कर ए तैय्यबाच्या सुरू असलेल्या ट्रेनिंग कॅम्पवर पाठविले. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही याठिकाणी बसने गेलो. गेटवर असलेल्या लोकांना आम्ही लष्करच्या माणसाने दिलेली पावती दाखविली. गेटवर असलेल्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या फॉर्मवर आमची पूर्ण माहिती लिहून घेतली आणि आम्हाला आत सोडण्यात आले. याठिकाणी आम्हाला सुरवातीला 21 दिवसांच्या ट्रेनिंग करिता निवडण्यात आले. या ट्रेनिंगचा " दौरा सफा ' असे म्हटले जाते. दुसऱ्या दिवसापासून आमचे ट्रेनिंग सुरू झाले. या काळातला आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे होता-
सकाळी 4.10 वा.- उठणे आणि नमाज
8.00 वा.- नाश्‍ता
8.30 ते 10.00 वा.- मुफ्ती सय्यद नावाच्या व्यक्तीकडून हदीस आणि कुराणवर व्याख्यान
10.00 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा. - नमाज
2.00 ते 4.00 वा. - आराम
4.00 ते 6.00 - शारीरिक शिक्षण , खेळ ( प्रशिक्षक - फादुल्ला)
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि इतर कामे
8.00 ते 9.00 वा. - रात्रीचे जेवण
ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आमची निवड "दौरा आम' साठी करण्यात आली. ही ट्रेनिंग पण 21 दिवसांचीच होती. त्यासाठी आम्हाला एका गाडीत घालून बुट्टल गाव येथील मनसेरा येथे नेण्यात आले. याच ठिकाणी आम्हाला शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीतील आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे.
4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक - अबू अनास)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा.- शस्त्र प्रशिक्षण ( प्रशिक्षक - अबू रहमान)
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 13.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा- नमाज
2.00 ते 4.00 वा.- आराम
4.00 ते 6.00 वा. - शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा.- रात्रीचे जेवण


हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अत्याधुनिक शस्त्रांसबंधीचे ट्रेनिंग नंतर दिले जाईल असे सांगण्यात आले.त्यासाठी आम्हाला दोन महिने "खिदमत' करण्यास सांगण्यात आले. खिदमत म्हणजे ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाते तेथील लोकांची सेवा करणे होय. आम्ही तेथे दोन महिने खिदमत केली.
दोन महिन्यांनंतर मला माझ्या पालकांना भेटायला पाठविण्यात आले. एक म महिनाभर मी माझ्या पालकांसोबत राहिलो. यानंतर मी मुझ्झफ्फराबाद येथील शैवैनाला येथे असलेल्या लष्कर च्या कॅम्पमध्ये आधुनिक शस्त्रांच्या ट्रेनिंगसाठी दाखल झालो.याठिकाणी त्यांनी माझे फोटो काढून घेतले.आणि काही कागदपत्रे भरून घेतली.यानंतर आम्हाला चहलबंदी पहाडी येथे दौरा खास साठी नेण्यात आले. हे ट्रेनिंग तीन महिन्यांचे होते.या ट्रेनिंगमध्ये शारीरिक व्यायाम, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण, हातबॉम्ब टाकणे, रॉकेट लॉंचर आणि मॉर्टर चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण काळातला दिनक्रम पुढील प्रमाणे
सकाळी 4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक- अबू मविया)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा- शस्त्र प्रशिक्षण , फायरिंग प्रॅक्‍टिस, हातबॉम्ब, रॉकेट लॉंचर, मॉर्टर,ग्रीन- ओ, उझ्झी, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर चालविण्याचे प्रशिक्षण ( प्रशिक्षक- अबू माविया )
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा.- नमाज
2.00 ते 4.00 वा - शस्त्र प्रशिक्षण आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांसंबंधी व्याख्यान
4.00 ते 6.00 वा- शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा. - नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा- रात्रीचे जेवण

या प्रशिक्षणासाठी 32 जणांना निवडण्यात आले. यापैकी फक्त 16 जणांची निवड भारतावर समुद्र मार्गे हल्ला करण्याच्या एका गुप्त ऑपरेशनसाठी करण्यात आली. हे ऑपरेशन झाकी उर रहमान ऊर्फ चाचा करणार होता. गुप्त ऑपरेशन साठी निवडण्यात आलेल्या 16 पैकी 3 जण नंतर पळून गेले. उरलेल्या 13 जणांना चाचाने कापा नावाच्या व्यक्तीकडे पाठविले.त्याचा कॅम्प मुदरीके येथे ठेवण्यात आला याठिकाणी आम्हाला समुद्रात पोहणे आणि तेथील प्रतिकूल वातावरणात राहायला शिकविण्यात आले.त्यासाठी काही मच्छीमारांचा वापर करण्यात आला. अनुभव घेण्यासाठी आम्हाला लॉंचच्या साहाय्याने समुद्रात लांबच लांब फेरफटकाही मारण्यासाठी नेले जायचे.या प्रशिक्षण काळात आम्हाला भारतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या व्हिडिओ क्‍लिप्स सीडी दाखविल्या जात. हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावी सात दिवस जायला दिले.सात दिवस गावी राहिल्यानंतर मी पुन्हा मुझफ्फराबाद येथील लष्कर च्या कॅम्पमध्ये दाखल झालो. यावेळी सुरवातीपासून ट्रेनिंग घेतलेले 13 जण उपस्थित होते. झाकी उर रहमानच्या निर्देशांनुसार काफा याने आम्हाला पुन्हा मुदरीके येथे नेऊन समुद्रात पोहण्याचे तसेच तेथील वातावरणाशी एकरूप होण्यासंबंधीचे प्रशिक्षण पुन्हा एकवार दिले. हे प्रशिक्षण एक महिनाभर चालले. यावेळी आम्हाला भारतीय सुरक्षा यंत्रणांसह रॉ. बाबतही सांगण्यात आले. पोलिस अथवा सुरक्षा यंत्रणांना फसविण्याचेही प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. भारतात गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये दूरध्वनी न करण्याचे सक्त निर्देशही आम्हाला देण्यात आले. या प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे- मोहम्मद अजमल ऊर्फ अबू मुजाहिदीन , इस्माईल ऊर्फ अबू उमर, अबू अली, अबू आकाशा, अबू उमेर, अबू शोएब, अब्दुल रहमान (बडा),अब्दुल रहमान (छोटा) , अफादुल्ला आण
ि अबू उमर

सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाकी उर रहमान ऊर्फ चाचा याने आमच्यातील अंतिम दहा जणांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. 15 सप्टेंबर 2008 ला आमच्या प्रत्येकाच्या दोघा जणांच्या जोड्या बनविण्यात आल्या. मला इस्माईल खान जोडीदार देण्यात आला.माझ्या जोडीला देण्यात आलेल्या कोडवर्डचे नाव वीटीएस असे होते.यानंतर आम्हाला गुगलअर्थ वर मुंबईचा नकाशा दाखविण्यात आला. मुंबईतील काही प्रमुख ठिकाणे तसेच प्रवेश करण्याचे मार्गही सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सायंकाळच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे व्हिडिओ क्‍लिपींगही यावेळी दाखविण्यात आले. आम्हाला सकाळी सात ते अकरा अथवा सायंकाळी सात ते अकरा यागर्दीच्या वेळांतच मुंबईवर हल्ला करण्याचे सांगण्यात आले. सीएसटीवर हल्ला केल्यानंतर तेथील प्रवाशांना ओलिस ठेवून त्यांना जवळच असलेल्या एखाद्या इमारतीत नेऊन सरकारकडून हव्या त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. त्यासाठी चाचा आम्हाला खासगी वृत्तवाहिनीचा दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक देणार होता. प्रसिद्धिमाध्यमांमार्फत सरकारपर्यंत चाचा सांगेल त्या मागण्या आम्ही पोचविणार असे सुरवातीला ठरले होते.हे ऑपरेशन 27 सप्टेंबरला होणार होते.मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे ऑपरेशन काही दिवस लांबविण्यात आले.आम्हाला कराचीलाच थांबविण्यात आले आणि आमचे स्पीड बोटीने समुद्रातून जाण्याचे प्रशिक्षण सुरू झाले. कराचीत आम्ही 23 नोव्हेंबर पर्यंत थांबलो. माझ्या जोडीशिवाय इतर चार जोड्या अबू अकाशा-अबू उमर, बडा अब्दुल रहमान-अबू अली,छोटा अब्दुल रहमान - अफादुल्ला आणि शोएब- अबू उमेर अशा होत्या.
23 नोव्हेंबरला आम्ही झाकी उर रहमान आणि कापा यांच्यासोबत कराचीचे अझीजाबाद सोडले. पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास समुद्रातून आमचा प्रवास एका लॉंच सुरू झाला. 22 ते 25 नॉटीकल माईल्स गेल्यानंतर आम्ही एका मोठ्या लॉंचमध्ये बसलो. एका तासाच्या सागरी प्रवासानंतर खोल समुद्रात आम्हाला अल हुसैनी या जहाजात बसविण्यात आले.यावेळी आम्हाला प्रत्येकाला 8 ग्रेनेड, 1 एके -47 रायफल, 200 काडतुसे, 2 मॅगझीन आणि संपर्क साधण्यासाठी प्रत्येकी 1 सेलफोन देण्यात आला. आम्ही सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालो. आम्ही भारताच्या सागरी हद्दीत शिरत असतानाच तेथे असलेली एक भारतीय बोट आम्ही हायजॅक केली. या बोटीतील खलाशांना अल हुसैनीत नेण्यात आले. तर एकाला बंदुकीचा धाक दाखवून मुंबईच्या दिशेने नेण्यास सांगितले. अल हुसैनीला मागे टाकत आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.तीन दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागलो.याठिकाणी इस्माईल आणि अफादुल्ला यांनी त्या भारतीय खलाशाला ( तांडेल) ठार मारून बोटीच्या इंजिन रूममध्ये टाकून दिले.यानंतर मिळालेल्या निर्देशांवरून आम्ही एका डिंगीतून बदवार पार्क जेट्टीवर पोचलो. बदवार पार्क येथे उतरल्यानंतर मी इस्माईल सोबत सीएसटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने टॅक्‍सीने निघालो. सीएसटीला पोचल्यानंतर मी आणि इस्माईल तेथील प्रसाधनगृहात गेलो आणि तेथे असलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. अचानक एक गणवेशधारी पोलिस अधिकारी आमच्या समोर आला आणि त्याने आमच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरवात केली. आम्ही पण त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि हातबॉम्ब फेकला. यानंतर आम्ही रेल्वे स्थानकात गेलो आणि तेथे गोळीबार करायला सुरवात केली. गोळीबार करता करता आम्ही स्थानकाच्या बाहेर पडलो आणि टेरेस असलेली एखादी इमारत मिळतेय का ते शोधायला
सुरवात केली. मात्र आम्हाला तशी इमारत सापडत नव्हती. यानंतर आम्ही तेथून एका गल्लीत पळत गेलो.जवळच असलेल्या एका इमारतीत आम्ही शिरलो.इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आम्ही गेलो तेथे ओलिस ठेवण्यासाठी लोकांचा शोध घेऊ लागलो,नंतर ती इमारत एका रुग्णालयाची असल्याचे कळाले.आम्ही इमारतीतून खाली उतरू लागलो तोच तेथे आलेल्या पोलिसांनी आमच्यावर गोळीबार करायला सुरवात केली. आम्ही प्रत्युत्तरादाखल त्यांच्यावर गोळीबार केला तसेच हातबॉम्बही फेकले. कसेबसे रुग्णालयातून बाहेर पडलो तोच एक पोलिसांची गाडी आमच्या दिशेने येत असल्याचे आम्ही पाहिले.रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात आम्ही लपून बसलो. पोलिसांची गाडी पुढे निघून गेल्यानंतर मागून आलेली आणखी एक पोलिसांची गाडी आमच्या पुढ्यात येऊन थांबली. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आमच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी माझ्या हाताला लागली आणि माझी एके -47 रायफल खाली पडली.मी ती उचलण्यासाठी खाली वाकलो तोच दुसरी गोळी माझ्या हाताला लागली. यानंतर इस्माईलने पोलिसांच्या त्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. काही क्षणातच गाडीतून होणारा गोळीबार थांबला. आम्ही दोघेही या गाडीच्या दिशेने गेलो.तेथे पडलेले तीन मृतदेह आम्ही खाली टाकले आणि इस्माईलने गाडी सुरू केली. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. आम्ही पुढे जात असताना काही पोलिस आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करीत होते.यावेळी इस्माईलने त्यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडल्या. आम्ही पुढे जात होतो अशातच रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या मैदानाजवळ आमच्या गाडीचा टायर पंचर झाला इस्माईल खाली उतरला आणि रस्त्याने येणारी एक कार त्याने थांबविली.बंदुकीच्या धाकाने कारमधील तीन महिलांना उतरविण्यात आले अन आम्ही या गाडीत बसलो.याचवेळी समुद्रकिनाऱ्याजवळ आमची गाडी पोलिसांकडून अडविण्यात आली. इ
स्माईलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्यात काही पोलिस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबारात इस्माईल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आम्हाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मी देखील जखमी होतो. शुद्धीवर आल्यावर इस्माईल पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे कळाले.तोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात असल्याची जाणीव मला झाली...'

1 comment:

Suyog Kamatkar said...

Horrible, Hats of to our brave Mumbai Police. Taxi driver should have alerted the police, Every one has to keep the vigil.