Monday, December 8, 2008

कसाबला लिहायचेय माता-पित्याला पत्र!

पोलिसांना विनंती : द्यायचीय चुकांची कबुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 ः कुटुंबीयांसोबत कोणतीही भावनिक गुंतागुंत नसल्याचे सांगत "इस्लाम'साठी काही तरी करण्याकरिता लष्कर-ए-तय्यबामध्ये दाखल होऊन मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहा जणांपैकी एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब याला आता आपले माता-पिता आठवू लागले आहेत. आई-वडिलांना पत्र लिहून आपली चूक कबूल करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्याने दिवस-रात्र चौकशी करणाऱ्या पोलिसांपुढे व्यक्त केली आहे.

कसाबच्या या भावनांशी पोलिसांना काहीच देणे-घेणे नाही. त्याने तशी इच्छा प्रदर्शित केली असली, तरी पोलिस ही बाब तपासून पाहत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 183 निष्पाप मुंबईकरांचे प्राण गेले, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 16 पोलिस अधिकारी-कर्मचारी, दोन एनएसजी कमांडो व 22 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या या 10 अतिरेक्‍यांपैकी नऊ जणांचा पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी खातमा केला. पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब आता पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देत आहे.

आठवण कुटुंबीयांची
लष्कर-ए-तय्यबात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सामील झालेला अजमल मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या फरिदकोट या गावचा आहे. चौथीपर्यंत शिकलेला अजमल पोलिस कोठडीत आता आई-वडील आणि भावंडांची आठवण काढतो. आपण "लष्कर-ए-तय्यबा'च्या आहारी कशा प्रकारे गेलो, याची माहिती आई-वडिलांना करून देण्यासाठी तसेच केलेल्या चुकीची कबुली देण्यासाठी आई-वडिलांना पत्र लिहिण्याची इच्छा त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली.

सर्व अतिरेकी पंजाब प्रांतातील
मुंबईवर हल्ला करणारे सगळेच अतिरेकी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असून त्यांची मूळ नावे आणि वास्तव्याचे मूळ पत्ते पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी या संबंधीची सविस्तर माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्या बाबी पडताळून पाहत आहेत. दहा अतिरेक्‍यांत ओखाडा व मुलतान येथील प्रत्येकी तिघे, फैसलाबाद येथील दोघे, तर सियालकोट व डेरा इस्माईल खान येथील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या अतिरेक्‍यांचे नेतृत्व इस्माईल खान याने केले होते. इस्माईल खान याने यापूर्वीही "लष्कर-ए-तय्यबा'साठी काम केले होते. त्याला जीपीएस यंत्रणा आणि डिंगीच्या आऊटबोर्ड इंजिनची तांत्रिक माहिती होती. बोटीवर सापडलेल्या डायरीतील माहिती पोलिस तपासत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रसाठ्यापैकी 9 एमएमची पिस्तुले पेशावरच्या "डायमन्ड नेडी फ्रंटियर आर्म्स कंपनी'तून आल्याची माहिती सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

No comments: