Sunday, December 28, 2008

गुन्हे वार्षिकी - २००८

2008 मधील गुन्हेगारी जगतातील ठळक घडामोडी पुढील प्रमाणे -


- 6 जानेवारी 2008 -
देवनार येथे बौद्ध भिक्‍खू भदंत संघराज महाथेरो यांचा गूढ मृत्यू. एसआरए योजनेला केलेल्या विरोधामुळे त्यांची हत्या झाल्याची शंका व्यक्त झाल्याने या परिसरात दोन दिवस प्रचंड जनक्षोभ उसळला.या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी करीत भदंत कश्‍यप या भिक्‍खुने 18 जानेवारीला गोवंडी येथे आत्महत्या केली.

-13 फेब्रुवारी 2008 -
विक्रोळी येथील एका कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक व जामिनावर सुटका. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनाही अटक व सुटका.

- 21 एप्रिल 2008 -
प्रभादेवी येथील विकसकाकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन आमदार अरुण गवळी याला गुन्हे शाखेकडून अटक. या प्रकरणात गवळी आणि त्याच्या सात गुंडांना मोक्का लावण्यात आला. मोक्काखाली अटक झालेला गवळी दुसरा आमदार आहे.

- 20 मे 2008 -
बालाजी टेलिफिल्म्सचा माजी क्रिएटिव्ह हेड नीरज ग्रोव्हर याच्या हत्येप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्री मारिआ सुसायराज आणि नौदलात लेफ्टनंट असलेला तिचा प्रियकर एमिल जेरॉम मॅथ्यू यांना अटक. 7 मे रोजी मालाड येथील घरात दोघांनी नीरजचा खून करून मृतदेह ठाणे ग्रामीण येथे नेऊन जाळून टाकला.

- 13 जून 2008 -
अलिबाग न्यायालयात सहा जणांसोबत तारखेला गेलेल्या मटकाकिंग सुरेश भगत याची अलिबाग-पेण मार्गावर अपघाती हत्या. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची पत्नी जया, मुलगा हितेश, गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्ये यांना अटक केली. या प्रकरणी जया व हितेश यांच्यावर मोक्‍का लावण्यात आला .

- 16 जून 2008 -
वाशीचे विष्णुदास भावे व ठाण्याच्या गडकरी रंगायतन ही नाट्यगृहे तसेच पनवेलच्या चित्रपटगृहात बॉम्ब ठेवण्याप्रकरणी सनातन संघटनेच्या चौघांना दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक .

- 20 ऑगस्ट 2008 -
मार्च-1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी करीमुल्ला खान याला अटक. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्‍वासू साथीदार असलेला करीमुल्लावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस, तर सीबीआयचे पाच लाखांचे इनाम.

- 24 सप्टेंबर 2008 -
गेल्या तीन वर्षांपासून देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक. या अतिरेक्‍यांच्या माहितीवरूनच 6 ऑक्‍टोबरला आणखी पंधरा अतिरेक्‍यांना पुणे,कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून अटक. या अतिरेक्‍यांचा दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद येथील बॉम्बस्फोटांतही सहभाग.

- 7 ऑक्‍टोबर 2008 -
जुहूच्या बॉम्बे 72 डिग्री पबमध्ये सुरू असलेल्या रेव्हपार्टीवर अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा. 231 तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार त्यातील 89 टक्के जणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघडकीस. या प्रकरणी पंधरा जणांना अटक .

- 21 ऑक्‍टोबर 2008 -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीय व मराठी पाट्यांच्या मुद्‌द्‌यांवर छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक. वांद्रे न्यायालयातून जामिनावर मुक्त झालेल्या ठाकरे यांना लगेचच कल्याण येथ रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तरभारतीय तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी अटक .

- 24 ऑक्‍टोबर 2008 -
मालेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने सुरत आणि मध्यप्रदेश येथे छापे घालून अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित साध्वी प्रज्ञासिगं ठाकूर आणि तिच्या दोघा साथीदारांना अटक केली. तिच्या चौकशीनंतर या प्रकरणात एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली. यात लष्करात लेफ्टनंट कर्नलपदावर कार्यरत असलेला प्रसाद पुरोहित व कथित हिंदू धर्मगुरू दयानंद पांडे यांचाही समावेश आहे. या प्रकरणानंतर हिंदू दहशतवादाचा नवा चेहरा दहशतवाद विरोधी पथकाने उघडकीस आणला.

- 27 ऑक्‍टोबर 2008 -
अंधेरी ते कुर्ला दरम्यान धावणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये उत्तरप्रदेश येथून आलेला राहूलराज कुंदप्रसाद सिंग हा माथेफिरू तरुण पोलिस चकमकीत ठार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारायला आलेल्या या तरुणाच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशातील सर्व पक्षीय नेत्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

- 26 नोव्हेंबर 2008 -
सागरी मार्गाने पाकिस्तानहून मुंबईत आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत तब्बल तीन दिवस मृत्यूचे थैमान घातले. या हल्ल्यात अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यात 173 मुंबईकरांचा बळी गेला. यात दहशतवाद विरोधी पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासह 16 पोलिस, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार गजेंद्रसिंग व 22 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिस आणि एनएसजीच्या कमांडोनी 59 तास केलेल्या कारवाईत नऊ अतिरेक्‍यांचा खातमा केला, तर महम्मद अजमल आमीर कसाब या अतिरेक्‍याला पोलिसांनी जिवंत पकडले

No comments: