Thursday, December 25, 2008

मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम..!

हसन गफूर : अतिरेकी हल्ल्याला महिना पूर्ण


ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.25 ः मुंबईवरील अतिरेकी हल्ला हे पाकिस्तानने देशावर केलेले आक्रमणच होते. अतिरेक्‍यांशी झुंज देताना साध्या पोलिस शिपायापासून सहपोलिस आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी बलिदान देऊन मुंबईला अतिरेक्‍यांपासून वाचविले. यात एनएसजी, नौदल, होमगार्ड, अग्निशमन दलाच्या जवानांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. या हल्ल्यानंतर सामान्य मुंबईकरांत आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मुंबईकरांमध्ये असलेल्या स्पिरिटमुळे हे शहर पुन्हा रुळावर यायला फार वेळ लागला नाही. मुंबईकरांच्या याच स्पिरिटला आपला सलाम..! या भावना व्यक्त केल्या आहेत मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याला उद्या (ता.26) एक महिना पूर्ण होत आहे. यानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या घेतलेल्या आढाव्याबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त गफूर "सकाळ'शी बोलत होते. सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिस दलात करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत बोलताना गफूर यांनी, आधुनिकीकरणांतर्गत पोलिसांना एमपी-5, एमपी-15 सारखा अत्याधुनिक शस्त्रसाठा, बुलेटप्रूफ जॅकेट्‌ससह अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण देण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना निधी उपलब्ध होत आहे. शीघ्र कृती दल (क्‍यूआरटी) व कमांडो पथकांची क्षमता वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तब्बल तीन दिवस सबंध जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या या अतिरेकी हल्ल्यात अनेक सामान्य मुंबईकरांचे नाहक बळी गेले. मुंबईकरांत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील चारशेहून अधिक संवेदनशील ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिस तैनात आहेत. महत्त्वाचे रस्ते, इमारती, चौक आदी ठिकाणी बनविलेल्या बंकर्समधून हे पोलिस सातत्याने पहारा ठेवून आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून प्रमुख हॉटेल्स, लॉज या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय यापूर्वीच्या कटातील संशयितांना बोलावून त्यांच्या सध्याच्या कारवायांबाबत पोलिस त्यांची चौकशी करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

फोर्स-वन
राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)च्या धर्तीवर मुंबई पोलिस दलाचे "फोर्स-वन' हे अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र पथक सुरू होत आहे. मुंबई अथवा पुण्यात विमानतळानजीक या पथकाचा तळ ठेवला जाणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने एनएसजीची एक तुकडीच मुंबईत ठेवण्याचे ठरविल्याने हे शहर येत्या काळात अशा प्रकारच्या कृत्यांना तोंड देण्यासाठी समर्थ असेल, असेही गफूर यांनी या वेळी सांगितले. सागरी मार्गाने आलेल्या अतिरेक्‍यांनी मुंबईत केलेल्या या घातपाती कारवायांनंतर सागरी सुरक्षिततेबाबत पोलिस अधिक दक्ष झाले आहेत. कमकुवत असलेली सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर पोलिसांचे प्राधान्य आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी होड्या; तसेच लहान बोटी लागण्याकरिता जागा उपलब्ध आहे ती ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहेत. पोलिस बोटींसह भाडेतत्त्वावर घेतलेल्या बोटींतून या समुद्रकिनाऱ्यावर गस्त सुरू आहे. या सर्व ठिकाणांवर 24 तास सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पोलिसांकडे वायरलेस सेटही दिले आहेत. समुद्रात होणाऱ्या संशयास्पद हालचाली पोलिस नियंत्रण कक्षासह नौदल आणि तटरक्षक दलालाही कळविण्याचे काम हे पोलिस करणार असल्याचे गफूर यांनी या वेळी सांगितले.

No comments: