Tuesday, December 2, 2008

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट "लष्कर ए तैय्यबा'चा

राकेश मारिया : लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या निवडक तरुणांचाच वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः संबंध देशाला हादरविणाऱ्या मुंबईवरील दहशती हल्ला हा लष्कर ए तैय्यबाचा मोठा कट होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली आहे. या कटासाठी लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या काही निवडक तरुणांचाच वापर करण्यात आला. हा संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची मदत घेत आहेत. या पूर्वनियोजित हल्ल्याकरिता अतिरेक्‍यांना स्थानिकांची अथवा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कची मदत झाली का, याची तपासणी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

समुद्रमार्गे 26 नोव्हेंबरला आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईवर तब्बल तीन दिवस अतिरेकी हल्ला चढविला. या घातपाती हल्ल्यात 186 जणांचा बळी गेला, तर 300 हून अधिक जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी गिरगाव येथे अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने त्याच्या चौकशीत तो लष्कर ए तैय्यबाचा सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. दीड वर्षांपूर्वी लष्कर ए तैय्यबा संघटनेत दाखल झालेल्या कसाब याच्यासह निवडक दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. त्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले. कसाब याने पाकिस्तानमध्ये झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याचीही कबुली दिल्याचे यावेळी मारिया यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश केल्यानंतर हॉटेल ताज, ओबेरॉय व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शिरून तेथील लोकांना ठार मारायचे. पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी काहींना ओलिस ठेवायचे. या ओलिसांच्याच जोरावर जेवढे दिवस जगता येईल तेवढे दिवस जगायचे आणि पुढे मरायचे, अशी कार्यपद्धती या अतिरेक्‍यांकडून वापरण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हल्ल्याचे सीसीटीव्हीत झालेले रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे. ज्या छोट्या नावेतून हे अतिरेकी कुलाब्याच्या मच्छीमार कॉलनीत उतरले, त्यात पोलिसांना सापडलेल्या सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीमवरून त्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग पोलिस तपासत आहेत. या नावेच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. अतिरेक्‍यांनी ठार मारलेला नावेचा चालक अमरसिंग तांडेल दोन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात होता. त्याच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक गुजरात येथेही गेले असल्याची माहिती मारिया यांनी यावेळी दिली. पोलिसांना या अतिरेक्‍यांची नावे मिळाली असून त्यांची पडताळणी सुरू आहे. हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन इमारतीत शिरलेल्या सर्वच अतिरेक्‍यांचे एकमेकांशी मोबाईलवर सतत संपर्क सुरू असल्याची बाब पडताळून पाहिली जात आहे. शिवाय या अतिरेक्‍यांनी पाकिस्तानमधील अतिरेक्‍यांशी केलेल्या कथित संभाषणाचीही पडताळणी सुरू असल्याचे मारिया यांनी सांगितले.

No comments: