Tuesday, December 2, 2008

हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानातूनच आले

राकेश मारिया : महम्मद कासाबच्या चौकशीतून कट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः अतिरेकी हल्ला करण्यासाठी कराचीहून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी थेट संबंध आला आहे. प्रत्येकी दोन जण याप्रमाणे पाच गटांनी शहरात हा अतिरेकी हल्ला चढविला. पोलिसांनी गिरगाव येथून अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल महम्मद कासाब व त्याच्या साथीदारानेच दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि चकमकफेम पोलिस अधिकारी विजय साळसकर यांना गोळीबारात ठार मारल्याची कबुली कासाब याने चौकशीत दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी गेले तीन दिवस मुंबईत घातपाती कारवाया घडविल्या. 26 नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथील मच्छीमारनगरमध्ये उतरलेल्या या अतिरेक्‍यांचे प्रत्येकी दोन अशा पाच गटात विभाजन झाले. हे पाचही गट लिआपोल्ड कॅफे, हॉटेल ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा पाच ठिकाणी टॅक्‍सीने गेले. लिओपोल्ड कॅफे येथे गोळीबार करण्यासाठी गेलेला गट नंतर हॉटेल ताजमध्ये गेलेल्या गटात सामील झाला. महम्मद अजमल कासाब (21) या पाकिस्तानच्या फरीदकोट जिल्ह्यातून आलेल्या अतिरेक्‍याने त्याच्या साथीदारासोबत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शिरून तेथे गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्याचे कळताच ते कामा रुग्णालयात लपले. त्यानंतर काही क्षणातच तेथे पोहोचलेले सह पोलिस आयुक्त करकरे, अतिरिक्त आयुक्त कामटे आणि पोलिस निरीक्षक साळसकर असलेल्या गाडीवर त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तिघा अधिकाऱ्यांसह आणखी दोघे पोलिस शिपाई मरण पावले. त्यानंतर अतिरेक्‍यांनी त्यांचे मृतदेह खाली फेकून गाडी घेऊन पलायन केले होते. त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी गिरगाव येथे त्यांना अडविले. त्यातील एकाला तेथेच चकमकीत ठार मारले, तर महम्मद अजमलला अटक केली. पोलिसांच्या अटकेत असलेल्या अजमलने पोलिसांना हल्ल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती द्यायला सुरुवात केली आहे. कराचीहून समुद्र मार्गाने येत असताना पोरबंदर येथे एका बोटीतून हे अतिरेकी आले. त्यातील तिघा खलाशांना वाटेतच मारून फेकून दिले, तर दुसऱ्याला घेऊन हे अतिरेकी मुंबईत आल्याचे मारिया यांनी सांगितले. या संपूर्ण गटाला उच्च प्रतीचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुलीही अजमलने दिली आहे. या अतिरेक्‍यांकडून पोलिसांना 10 एके-56 रायफल्स, 1
0 पिस्तुले, हातबॉम्ब, दोन बॉक्‍समध्ये भरलेली 16 किलो स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठविण्यात आली आहेत. वाडीबंदर आणि विलेपार्ले येथे झालेले स्फोट हे टॅक्‍सीत राहिलेल्या स्फोटक साठ्यामुळेच झाल्याची शक्‍यता आहे. या कृत्यात त्यांना कोणत्या स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले का, याचा पोलिस शोध घेत असल्याचेही मारिया यांनी सांगितले. या सर्व अतिरेकी 19 ते 28 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना बोगस ओळखपत्रेही सापडली आहेत.

No comments: