Monday, March 30, 2009

मुलांवर सुरीहल्ला करून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन मुले जखमी ः पतीवरील राग निरागस मुलांवर

दोन दिवसांपासून पती घरात न जेवल्याने संतापलेल्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना चाकूने भोसकून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली येथे घडली.
कांदिवली पश्‍चिमेला संजयनगर परिसरात काल सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेम गुप्ता (30) हा त्याची पत्नी संगीता (20) हिच्याशी गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ वादामुळे बोलत नव्हता. दोन दिवसांपासून तो घरात जेवतही नव्हता. काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो उठला आणि पाणी भरून तो स्नेहल (5 वर्षे ) आणि शिवम ( 7 वर्षे) यांच्यासोबत पुन्हा झोपला. पती बोलत नसल्याचा राग आल्याने संगीताने भाजी चिरण्याच्या सुरीने मुलगी स्नेहल आणि मुलगा शिवम यांच्यावर वार केले. मुलीच्या पोटात दोन वार केल्यानंतर ती मुलाकडे वळली. त्याच्यावर पहिला वार केल्यानंतर तो जोरात ओरडल्यामुळे त्याच्या शेजारी झोपलेला प्रेम लगेचच उठला. मुलावर दुसरा वार करणार तोच त्याने पत्नी संगीताला अडविले. त्यानंतर संगीताने स्वतःच्या हातावर एक वार करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणारे काही नागरिक त्यांच्या घराकडे धावत आले. त्यांनी जखमी अवस्थेतील दोन मुलांना आणि संगीताला भगवती रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्रकुमार जैस्वाल यांनी दिली.
प्रेम याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संगीताच्या पोटात दुखत होते; मात्र त्याकडे आपले दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे वेडसरपणाच्या झटक्‍यात तिने हे कृत्य केले असावे. यापूर्वीही दोन-तीनदा तिने असाच प्रकार केला होता, असेही जैस्वाल यांनी सांगितले.


(sakal,23 march)

No comments: