Monday, June 29, 2009

अनाथालयातून पळालेल्या "त्या' मुली सापडल्या

अंधेरी येथील सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयातून पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुली चिपळूण रेल्वेस्थानकात सापडल्या आहेत. या मुलींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत परत आणण्यासाठी रत्नागिरी येथे पोलिसांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.
हीना तारासिंह (9), नंदिनी रविकुमार पाणीकर (9) , पूजा सुनील गोतपागर (13) आणि गीता रणजित कांडरे (10) अशी या पळून गेलेल्या मुलींची नावे आहेत. सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयाच्या मानखुर्द येथील शाखेतून या मुलींना दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी येथे पाठविण्यात आले होते. अंधेरीच्या अनाथालयात 500 पेक्षा अधिक अनाथ व गरजू मुली राहतात. या ठिकाणी संस्थेची दहावीपर्यंत शाळादेखील आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेच्या लहान प्रवेशद्वारातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे या चार मुलीदेखील अनाथालयाबाहेर पडल्या. सायंकाळी अनाथालयात असलेल्या मुलांची मोजणी करताना तेथील वार्डनच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी काही मुलांसह या चारही मुलींचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्या सापडल्या नाहीत. संस्थेतील अधिकाऱ्यांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ता असलेल्या या चारही मुलींची वर्णने पोलिसांनी वायरलेसवरून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविली होती. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वेस्थानकात या चारही मुली उतरल्या. या मुलींना रेल्वेस्थानकात फिरताना पाहून पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस सुरू केली. चौकशीनंतर त्यांनी मुंबईतील अनाथालयातून पळून आल्याचे कबूल केले. या मुलींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक चिपळूण येथे पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश घमंडे यांनी दिली. महिनाभरापूर्वीदेखील या अनाथालयात असाच प्रकार घडला होता. एका वीसवर्षीय अनाथ तरुणीने पळून जाऊन भाईंदर येथे एका तरुणाशी लग्न केल्याचेही घमंडे या वेळी म्हणाले.

(sakaal,27th june)

No comments: