Monday, June 29, 2009

पोलिसांना मिळणार हेलिकॉप्टर!

गृहमंत्री जयंत पाटील यांचे आश्‍वासन


पोलिस दलासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांचा पुरवठा केल्यानंतर शहरात उद्‌भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई पोलिस दलाला स्वतंत्र हेलिकॉप्टर मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबई पोलिस दलात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या तीन बुलेटप्रूफ रक्षक गाड्या, 20 जीप, 150 मोटरसायकल यांच्यासह 207 वाहनांच्या वितरणाचा कार्यक्रम गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी पोलिस दलासाठी हेलिकॉप्टर देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. मुंबईत रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे उडणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. पोलिसांकडे स्वतंत्र हेलिकॉप्टर असल्यास आपत्कालीन स्थितीतही शहरातील कायदा-सुव्यवस्था राखणे, तसेच शहराच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग होईल; याशिवाय जमिनीवर गुन्हेगार अथवा अतिरेक्‍यांकडून होत असलेल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांना लक्ष ठेवणे सहज शक्‍य होईल. हवाई मार्गाने होणाऱ्या संभाव्य हल्ल्यासंबंधीच्या गुप्तचर खात्याकडून विशिष्ट अशा कोणत्याही सूचना नसल्याचेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. परदेशात दहशतवाद, तसेच गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी तेथील पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना, तसेच अवलंबण्यात येणारे तंत्रज्ञान यांच्या अभ्यासासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पथक इस्राईल, इंग्लंड व चीन येथे पाठविले जाणार आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तेथील पोलिस दलात असलेल्या घोडदळाप्रमाणेच मुंबईतही पोलिसांचे असे घोडदळ तयार करण्याच्या सूचना आयुक्तांना करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या ताफ्यात 35 घोडेस्वार पोलिसांचे पथक ठेवले जाणार आहे. विविध आंदोलने आणि मोर्चासाठी आझाद मैदान आणि शहरातील काही ठिकाणी जमणाऱ्या आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे दल वापरले जाईल.
पोलिसांचे श्‍वान पथक सक्षम करण्यासाठी येत्या काळात आणखी 100 कुत्रे पोलिस दलात दाखल केले जाणार आहेत. या श्‍वानांना बॉम्ब शोधण्याचेही प्रशिक्षण दिले जाईल. पोलिसांना घरे देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वाढीव चटई क्षेत्र असलेल्या पोलिसांच्या इमारतींसाठी असलेल्या भूखंडांचा चार वाढीव चटई क्षेत्र दिले जाणार आहेत. येत्या तीन वर्षांत 50 हजार पोलिसांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून, सध्याच्या संख्येप्रमाणे ही घरे अतिरिक्त होतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले. आगामी काळात पोलिसांसाठी अत्याधुनिक सोई-सुविधांनी युक्त अशा पोलिस वसाहती बांधण्यात येणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.


(sakaal,22nd june)

No comments: