Monday, June 29, 2009

मुंबईवर पुन्हा हल्ल्याची शक्‍यता

आयुक्त डी. शिवानंदन यांचा इशारा; दहशतवाद्यांचा बीमोड करण्यास पोलिस दल सज्ज

मुंबईवर येत्या काळात हवाईमार्गे अथवा जमिनीवरून हल्ल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे संभाव्य हल्ले थोपविण्यासाठी पोलिस दल सुसज्ज आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक आणि कठोर प्रशिक्षण देण्यात येत असून, अवघ्या तासाभरात दहशतवाद्यांचा बीमोड करू शकतील, अशी क्षमता आपल्या पोलिसांत असल्याचे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी केले.

मुंबई पोलिस दलासाठी 207 अत्याधुनिक वाहनांचे वितरण गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मरिन लाइन्स येथील पोलिस जिमखाना येथे करण्यात आले. या वाहनांत तीन बुलेटप्रूफ रक्षक वाहने, 150 मोटारसायकल, 20 जीप, नऊ व्हॅन, 21 टोविंग क्रेन्स आणि चार बसचा समावेश आहे. या वेळी पोलिस आयुक्त शिवानंद यांनी सांगितले, की 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक परिमंडळात 100 पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रे चालविण्यासोबत घातपाती हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या अद्ययावत युद्धतंत्रांचेही प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यापुढील काळात मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज असतील असेही ते म्हणाले.

गुन्हेगार अथवा अतिरेक्‍यांच्या हल्ल्याच्या वेळी पोलिस वाहनांत बसलेल्या पोलिसांच्या जीविताचे रक्षण होण्यासाठी येत्या काळात पोलिसांच्या गस्ती वाहनांना बुलेटप्रूफ काचा बसविण्यात येणार आहेत. सध्या पोलिस दलात आलेल्या गाड्यांसाठी चार कोटी रुपये खर्च आला आहे. त्यापैकी तीन कोटी रुपये तीन बुलेटप्रूफ रक्षक गाड्यांसाठी खर्च झाले आहेत. येत्या काळात आणखी दोन रक्षक गाड्या पोलिस दलात दाखल होतील. पाच नियंत्रण कक्षांसाठी या गाड्या दिल्या जातील. याशिवाय आणखी 12 बसचा ताफा पोलिस दलात लवकरच दाखल होईल, असेही शिवानंदन या वेळी म्हणाले. सागरी सुरक्षिततेसाठी पोलिस दलात दोन हायस्पीड बोटी आल्या आहेत. सध्या रायगड आणि ठाणे पोलिसांकडे असलेल्या हायस्पीड बोटींसारखीच बोट मुंबई पोलिसांच्या ताफ्यातही येणार आहे. याशिवाय गोवा शिपयार्डातून आणखी काही बोटी सप्टेंबरअखेर मुंबईत दाखल होतील असेही त्यांनी सांगितले.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहने पुरविण्यासाठी राज्य सरकारने 90 कोटी रुपयांचा निधी दिला. याच निधीतून मुंबई पोलिस दलाकरिता मागविण्यात आलेल्या वाहनांच्या वितरणाचा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू झाला होता. या वेळी गृहमंत्री जयंत पाटील यांनी झेंडा दाखविल्यानंतर पोलिस दलात दाखल झालेल्या वाहनांचे संचलनही करण्यात आले. गृहमंत्र्यांनी स्वतः सर्व वाहनांची पाहणी करून समाधानही व्यक्त केले. गृहराज्यमंत्री नसीम खान, पोलिस आयुक्त डी. शिवानंदन, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.


(sakaal, 22nd june)

No comments: