Friday, January 30, 2009

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

केंद्राचा इशारा ः विमानतळांवर कडेकोट सुरक्षा, सर्व यंत्रणा सतर्क

विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केल्याने मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. केंद्राने राज्य सरकारला याबाबत सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यानुसार कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या, तसेच संवेदनशील ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राज्य सरकारला विमानतळांबद्दलचा इशारा देण्यात आला. अतिरेकी विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून घातपात करण्याची शक्‍यता असल्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
दहशतवादी लहान विमाने आणि हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच आंतरदेशीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडन्ट संजय प्रकाश यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. गुप्तचर यंत्रणेकडून या हल्ल्याबाबत नेमका तपशील मिळाला नसला तरी पुरेशी खबरदारी घेत आहोत, असेही प्रकाश यांनी या वेळी सांगितले.

मनसे, शिवसेनेला दंड
इंटरकॉंटिनेंटल हॉटेल आणि मुंबई विद्यापीठात केलेल्या तोडफोडप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांकडून दंडवसुली केली जाईल, तसा कायदाच सरकारने केला असल्याचेही पाटील यांनी या वेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने; तर हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसेनेने तोडफोड केली. त्यांच्याकडून राज्य सरकार कायद्यानुसार नुकसानभरपाई वसूल करील, असे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले.
भाषेला दुर्लक्षित करीत असल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठात केलेल्या आंदोलनात विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; तर अंधेरी येथील हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसैनिकांनी मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.

(sakal,29 jan)

No comments: